वसई: वसई काँग्रेस मुख्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला काँग्रेसच्या ४ कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. हातात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिम घेऊन जय संविधानच्या घोषणा देत या कार्यकर्त्यांनी भाजप आंदोलनाला विरोध केला. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवून मुख्यालयात जाण्यापासून रोखले. रविवारी दुपारी वसईच्या पारनाका येथील काँग्रेस मुख्यालावर हा प्रकार घडला.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात अंमलबजाबणी संचलनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे. त्याविरोधात काँग्रेसने संपूर्ण देशभर ईडीच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे ईडीच्या समर्थनार्थ वसईतील भाजपा रस्त्यावर उतरली आहे. रविवारी दुपारी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वसईच्या पारनाका येथील काँग्रेसच्या कार्यालयावर निर्दशने केली. मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते जमा झाले होते. त्याला शह देण्यासाठी काँग्रेसचे ४ कार्यकर्ते जमा झाले. त्यांच्या हातात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा होत्या. त्यावर ‘जय भीम’ आणि ‘जय संविधान’ असे लिहिलेले होते. समोर भाजप कार्यकर्ते घोषणाबाजी देत असताना ४ कार्यकर्ते जय संविधानच्या घोषणा देत होते. त्यामुळे तणाव वाढला. भाजप कार्यकर्ते मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न करू लागले. पंरतु त्यांना वसई पोलिसांनी रोखले. कुलदीप दिनेश वर्तक, रवी भूषण, निखिलेश उपाध्यय, शंतनू शिह अझीम शेख आदी कार्यकर्त्यांनी भाजपाचा मुकाबला केला. या देशात संविधान आहे त्यामुळे प्रत्येकजण सुरक्षित आहे. मात्र भाजपने संविधानाची पायमल्ली करून दडपशाही लागू केली आहे. भाजपचे कार्यकर्ते आमच्या मुख्यालयात शिरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने घोषणा देत त्यांना रोखले असे कुलदिप वर्तक यांनी सांगितले. डॉ बाबासाहेब आंबेडकर ही आमची प्रेरण आणि आम्हाला लढण्याचे बळ देतात, असेही त्यांनी सांगितले.

न्यायालयाच्या आदेशानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीने दोषारोपत्र सादर केले आहे. परंतु काँग्रेसला न्यायालयावरही विश्वास राहिलेला नाही. काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आम्ही आंदोलन केले होते. काँग्रेसच्या मुख्यालयात शिरण्याचा आमचा प्रयत्न नव्हता, असे भाजप नेते मनोज पाटील यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन्य काँग्रेस कार्यकर्ते का आले नाहीत?

भाजपा आंदोलन करणार आहे, याची कुणकूण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लागली होती. काँग्रेसच्या पारनाका येथील मुख्यालयावर आजवर असे आंदोलन झाले नव्हते. त्यामुळे मोठ्या संख्यने काँग्रेस कार्यकर्ते विरोध करण्यासाठी उतरतील अशी अपेक्षा होती. पंरतु केवळ ४ कार्यकर्ते आले. त्याबद्दल उलटलुसट चर्चा सुरू आहे. जर आमच्या पक्षाच्या कार्यालयावर कुणी आंदोलन केले असते तर आम्ही ४ जण नाही तर शेकडो कार्यकर्ते जमा झालो असतो, असा टोलाही भाजप नेते मनोज पाटील यांनी लगावला.