वसई: श्रावणी सोमवार निमित्ताने कावड यात्रेसाठी गेलेल्या दोन तरुणांचा तुंगारेश्वर नदीत बुडून मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. सचिन यादव व हिमांशू विश्वकर्मा अशी या तरुणांची नावे असून ते नालासोपारा येथील संतोषभवन परिसरात राहतात.
श्रावणी सोमवार निमित्ताने नालासोपारा ते तुंगारेश्वर येथील महादेव मंदिर अशी कावड यात्रा काढण्यात आली होती. यात नालासोपारा येथील सात ते आठ तरुणांचा गट ही सामील झाला होता. यात सचिन व हिमांशू यांचा ही समावेश होता.
याच प्रवासादरम्यान तुंगारेश्वर येथील नदीच्या ठिकाणी ते विश्रांती साठी थांबले होते. यावेळी सचिन यादव हा पाण्यात पाय धुण्यासाठी उतरला आणि पाय घसरून नदीत पडला आणि हिमांशू विश्वकर्मा याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ही पाण्यात बुडाला.
दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला तिसरा इसमही नदीत बुडत होता. मात्र प्रसंगावधान राखून त्याला बाहेर काढले मात्र दोघे जण पाण्यात बुडाले.
या घटनेची माहिती पेल्हार पोलिसांना मिळताच अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना पेल्हार गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यापूर्वीचा त्यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नदीत बुडून झालेल्या मृत्यूच्या घटनेने नालासोपारा परीसरात शोककळा पसरली आहे.
यापूर्वीही आम्ही सांगितलेलं आहे की तुंगारेश्वरला जाताना अंघोळीसाठी पाण्यात उतरू नका. तसे आदेशही आम्ही काढलेत, पोलीस सतत याबाबत सूचना देत असतात. पण, असे हौशी लोक ऐकत नाहीत आणि दुर्घटना घडतात असे पेल्हार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले आहे. दर्शनाला येताना नदीत अंघोळीसाठी उतरू नका असे आवाहन ही त्यांनी नागरिकांना केले आहे.
बंदी असतानाही पाण्यात जाण्याचा प्रयत्न
पावसाळ्यात घडणाऱ्या बुडण्याच्या घटना लक्षात घेता तुंगारेश्वर अभयारण्यात पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे.मात्र श्रावण महिना सुरू असल्याने या तुंगारेश्वर मध्ये असलेल्या महादेव मंदिरात मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे ते या नदीत पाय धुणे, आंघोळ करण्यासाठी उतरत असल्याने अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत.