भाईंदर: मिरा-भाईंदर शहरातील भटक्या श्वानांसाठी व मांजरासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून विशेष रेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.यात जवळपास पाच हजार प्राण्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
मिरा-भाईंदर शहरात दरवर्षी सुमारे दीड ते दोन हजार लोकांना श्वानदंश होत असतो.यामुळे रेबीस सारखा गंभीर आजार होण्याची शक्यता असते. यावर उपचार म्हणून पाच ते सात रेबीज इंजेक्शन घ्यावी लागतात. यासाठी शहरातील भटक्या श्वानांना रेबीज लस देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. ही लस दिल्यानंतर श्वान पिसाळण्याची शक्यता कमी होते. तर त्यांचा दंश जरी झाला तरी पुढील रेबीज होण्याचा धोका ही टळतो. म्हणून येत्या महिन्या भरासाठी ही मोहीम महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहे.यात जवळपास ५ हजार श्वानांना लस देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेचा पशुवैद्यकीय विभाग व बंगळूर येथील वर्ल्ड व्हेटर्निटी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष लसीकरण मोहीम राबवली जात असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.
पथके नियुक्त
लसीकरणासाठी महापालिकेची तीन आणि संस्थेची सहा पथके स्थापन करण्यात आली आहे.प्रत्येक पथकात एक डॉक्टर, तीन सहायक व एक माहिती गोळा करणारा अशा पाच जणांचा समावेश आहे.त्यानुसार शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन य भटक्या श्वानांचे लसीकरण केले जात आहे.त्याचप्रमाणे ज्या लोकांनी महापालिकेकडे मागणी केली, त्यांच्याकडे असलेल्या भटक्या श्वानांनाही व मांजरांना ही लस देण्यात येत आहे.