वसई: वसईच्या शेतकऱ्यांनी २०२३ -२४ मध्ये काढलेला आंबा फळ पीक विमा नुकसान होऊनही शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे येथील आंबा फळ बागायतदार शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित राहावे लागत आहे.वसई पूर्वेच्या भागात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वाडीत आंब्याची लागवड केली आहे. मात्र मागील काही वर्षांपासून वातावरणातील लहरीपणा, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा यासाठी प्रधानमंत्री फळ पिक विमा योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीत २०२३-२४ मध्ये वसई पूर्वेच्या खानिवडे येथील ८२ शेतकऱ्यांनी आंबा फळ पीक विमा उतरविला होता. यात सुमारे ३२ हेक्टर इतके क्षेत्र पीक विम्या खाली होते.त्या वर्षी अवकाळी पाऊस वादळी वारे यांने आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या नुकसानी नंतर येथील शेतकऱ्यांचे पंचनामे ही करण्यात आले होते. मात्र वर्ष भराचा कालावधी उलटून गेला तरीही अजूनही विम्याद्वारे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना सांगितले जाते मात्र जेव्हा नुकसान भरपाई देण्याची वेळ येते तेव्हा केवळ कारणे पुढे केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाला नसल्याने याची तक्रार बोईसरचे आमदार विलास तरे यांच्या जनता दरबारात शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
मांडवी मधील नोंदणी यंत्रप्रणाली कार्यान्वित नसल्याचा फटका
वसईच्या महसूल मंडळ – मांडवी मधील हवामान नोंदणी यंत्रप्रणाली अस्तित्वात नसल्या मुळे, हवामान नोंद प्राप्त झाली नाही, विमा जारी करताना हवामान यंत्रप्राणालीची नोंदणी आवश्यक आहे. ती नसल्याने विम्याची भरपाई देण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. या अडचणीमुळे
नुकसान भरपाई साठी नाहक शेतकऱ्यांना अजून ही वंचित राहावे लागले आहे .