वसई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात राजकीय पक्षांची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. आगरी समाजाची मतं आपल्या पारड्यात पडावी यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरू झाली आहे. आगरी सेनेचे दोन गट पडले असून दोघांचा पाठिंबा मिळावा यासाठी रस्सीखेच सुरू आहे.

पालघर, ठाणे, रायगड आणि नवी मुंबई या भागांत आगरी सेनेची प्रचंड ताकद आहे. पालघर जिल्ह्यात आगरी व कोळी समाजात आगरी सेनेची दीड लाखाहून अधिक मते आहेत. त्यामुळे आगरी सेनेची राजकीय समीकरणांत निर्णायक भूमिका राहिली आहे. त्यामुळे आगामी पालघर लोकसभा निवडणुकीत आगरी सेनेचे समर्थन मिळावे यासाठी विविध राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे. आगरी सेनेने अजूनही कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला नसल्याने राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराला पाठिंबा मिळेल यासाठी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा – वसई : सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू; राष्ट्रीय सफाई आयोगाकडून कारवाईचे निर्देश, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३० लाखांची मदत

आगरी सेना ही पालघर जिल्ह्याच्या वसई विरार, सफाळे, बोईसर अशा विविध ठिकाणच्या भागात सक्रिय आहे. आगरी सेनेची पालघर जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी व भूमीपुत्रांच्या हक्कासाठी करण्यात आलेल्या आंदोलनातूनही येथील स्थानिक भूमीपुत्रांची ताकद वेळोवेळी दिसून आली आहे. त्यामुळे येथील आगरी बांधवांची मतंसुद्धा आगामी लोकसभा निवडणुकीत महत्वाची ठरणार आहेत. यासाठी नुकतीच महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांनी आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांची भेट घेत आगरी सेनेचा पाठिंबा मिळावा अशी विनवणी केली आहे. या भेटीनंतर आगरी सेना आगामी पालघर लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – विरारमध्ये मिसळ दुकानाला भीषण आग, आगीत दुकान जळून खाक; शहरात आग दुर्घटना सुरूच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसई विरारमध्ये आगरी सेनेचे दोन गट

वसई विरारमध्ये आगरी सेनेतील अंतर्गत वाद यामुळे दोन गट तयार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे जनार्दन पाटील (मामा) यांचा एक गट तर दुसरीकडे कैलास पाटील यांचा दुसरा गट आहे. विशेषत: आगरी सेना यापूर्वी वसई विरार भागात बहुजन विकास आघाडीच्या विरोधात जात शिवसेनेला मदत केली होती. आता आगामी लोकसभा निवडणुकीत आगरी सेनेचे दोन्ही गट कोणत्या पक्षाच्या बाजूने उभे राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.