वसई: मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम आहे. याचा मोठा फटका किनार पट्टीच्या भागाला बसत आहे. शुक्रवारी सायंकाळी सुटलेल्या वादळी वाऱ्यात अर्नाळा किल्ला येथील घरांच्या वरील पत्रे उडून गेल्याने सात ते आठ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या ५ ते १० मिनिटे झालेल्या वादळाने होत्याचे नव्हते केले अशी प्रतिक्रिया येथील नुकसानग्रस्तांनी दिली आहे.
विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा किल्ला आहे. हे गाव एका बेटावर असल्याने येथील नागरीकांना बोटीतून ये जा करावी लागत आहेत. या भागातही मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव राहतात. गाव बेटावर असल्याने दररोजच येथील नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात या भागात विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत. मागील काही दिवसांपासून वसई विरार मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचे सत्र सुरूच आहे. नुकताच प्रादेशिक हवामान विभाग, मुबंई द्वारे पुढील काही दिवसात विजांच्या कडकडाटासह जोराचे वादळी वारे व पावसाचा इशारा देण्यात आला होता.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास किनार पट्टीवर जोराचे वादळी वारे आले. या वादळी वाऱ्यात अर्नाळा किल्ल्याच्या अगदी किनाऱ्या जवळ राहणाऱ्या घरांना याचा मोठा फटका बसला. अनेक घरावरील पत्रे उडून दुसऱ्यांच्या घरावर गेले त्यामुळे सात ते आठ घरांचे नुकसान झाले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. याशिवाय मंदिराजवळील ध्वज खांब ही वाकला आहे. समुद्र खवळलेला असल्याने लाटांचे तडाखे ही जोराने बसत होते. या झालेल्या नुकसान ग्रस्त नागरिकांचे शासनाने त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निनाद पाटील यांनी केली आहे.
वादळीवाऱ्याच्या इशाऱ्यानेच धडकी भरते
आतापर्यंत विविध प्रकारच्या वादळी वाऱ्याने किनार पट्टीच्या भागाचे फारच नुकसान केले आहेत. त्यातून ही सावरून पुन्हा उभे राहण्याची प्रयत्न येथील नागरिक करतात. परंतु पावसाळा व वादळी वारे याचा इशारा मिळताच धडकी भरते अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे. कारण किनार पट्टीवर वादळी व वारे व पाऊस फारच वेगाने कोसळतो. जर अगदी मोठे वादळ येते तेव्हा नुकसान होईल याची भीती सतावत असेही येथील नागरिकांनी सांगितले आहे.