वसई : वसई विरार शहरात शासकीय कार्यालये, महापालिका, सामाजिक संस्था यांच्या तर्फे गुरुवारी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी वसई विरार महापालिकेने ही शहरात १ लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे.गुरुवारी सकाळी वसई विरार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वसईच्या सनसिटी येथे वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी आमदार राजन नाईक, आयुक्त अनिलकुमार पवार, माजी महापौर नारायण मानकर, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यासह इतर पर्यावरणप्रेमीं नागरिक उपस्थित होते. यावर्षी महापालिकेने शहरातील विविध ठिकाणच्या भागात एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे.विशेषतः उद्याने, तलाव, स्मशानभूमी, दुभाजक, रस्त्याच्या दुतर्फा ६६ हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले जाणार असल्याचे महापालिकेने सांगितले.नागरिकांना व सेवा भावी संस्थांना ही वृक्ष रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
वृक्षलागवड करून ती जास्तीत जास्त झाडे जगली पाहीजेत यासाठी पालिकेने प्रयत्न करावे असे आमदार राजन नाईक यांनी यावेळी सांगितले तर महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी ही झाडांचे संगोपन करण्याच्या दृष्टीने पालिका प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.तसेच नागरिकांनी सुद्धा पर्यावरण रक्षणासाठी व त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही महापालिका आयुक्तांनी केले आहे.
तापमान वाढीचे संकट
पर्यावरणाचे संतुलन बिघडू लागले आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र तापमान वाढीची मोठी समस्या निर्माण होऊ लागली आहे.यामुळे ती कमी करण्यासाठी जास्तीत वृक्ष लागवड, प्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना आखणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.वसईचे हरित पण टिकवायचे असेल तर त्यासाठी येथील पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केले आहे.