वसई : पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन व दरड कोसळण्याच्या घटना घडतात. अशा घटना रोखण्यासाठी वसई विरार महापालिकेने सर्वेक्षण करून दरड प्रवण क्षेत्र निश्चित केली आहेत. यावर्षी केलेल्या सर्वेक्षणात दरड प्रवण क्षेत्रात वाढ झाली असून शहरात ३३ ठिकाणे भूस्खलन व दरड प्रवण क्षेत्र घोषित करण्यात आली असून अशा ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
वसई विरार शहरातील बहुतांश भाग हा डोंगर परिसराचा आहे. या डोंगराच्या पायथ्याशी व डोंगरावर ही नागरिकांच्या वस्त्या आहेत. तर काही ठिकाणी डोंगर पोखरून अगदी डोंगराच्या जवळपास भूमाफियांनी चाळी उभारल्या आहेत. अशा ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येने नागरी वस्ती आहे.काही वेळा पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे डोंगर भागातील माती पोकळ होऊन भूस्खलन होणे, दरड कोसळणे अशा घटना घडत असतात.यापूर्वी सुद्धा वसई पूर्वेच्या राजावळी वाघराळपाडा येथे दरड कोसळण्याची घटना घडली होती. पावसाळ्यात अशा घटना घडू नये यासाठी महापालिका सज्ज झाली आहे.
महापालिकेने शहरातील डोंगर माथ्याचे परिसर, व डोंगराला लागून असलेल्या भागांचे सर्वेक्षण केले आहे. यात शहरात ३३ ठिकाणे ही धोकादायक असून अशा ठिकाणी भूस्खलन व दरड कोसळण्याची शक्यता आहे. म्हणून महापालिकेने अशा ठिकाणांना भूस्खलन व दरड प्रवण क्षेत्र घोषित केले आहे.अशा ठिकाणांवर पालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले असून त्या ठिकाणी जनजागृती करणे, त्याभागात राहणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय सूचना फलक ही लावण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अशी आहेत दरड प्रवण क्षेत्र
मोरेगाव डोंगर नालासोपारा (पूर्व), कारगिल नगर टेपाचा पाडा. जिवदानी पाडा,आण्णा पाडा, राक्षसी पाडा, साईनाथ झोपडपट्टी,वैष्णव जिवदानी कॉम्प्लेक्स विरार पूर्व, जोसना अपार्टमेंट साईनाथ नगर,वनोठा पाडा, आचोळे डोंगरी, पडखळ पाडा,तुळींज सेवालाल नगर,निळेगांव डोंगरी, नालासोपारा (प), संतोषभवन,शिर्डीनगर,कानुपाडा,वालईपाडा,पाच आंबा,आझाद नगर, विष्णु नगर,शांतीनगर नवजिवन, गडगापाडा, धानिव,शिरसाड, इंदिरानगर वसाहत,बिलालपाडा, अलंगपाडा,सातीवली खिंड, गोखिवरे भागपाडा, गोखिवरे, बंजार पाडा भोयदापाडा, सातीवली डोंगरी, राजावळी, वाघरालपाडा,जानकीपाडा, गोखिवरे अशा ३३ ठिकाणे पालिकेने दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. यातील सर्वाधिक दरड प्रवण क्षेत्र ही पेल्हार आणि वालीव या दोन प्रभाग समिती कार्यक्षेत्रात येत आहे.
अग्निशमन दल सज्ज
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आपत्तीजनक घटना समोर येत असतात. विशेषतः पावसाळ्यात झाडे कोसळणे, दरड कोसळणे, पुराच्या पाण्यात अडकून पडणे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी व वेळेत मदत कार्य उपलब्ध करून देण्यासाठी अग्निशमन दल सज्ज झाला असल्याचे अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांनी सांगितले आहे.
यापूर्वी प्रमुख घटना
१) यापूर्वी रायगड येथील इर्शाळगडावरील ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर वसई विरार मधील भूस्खलन व दरड प्रवणक्षेत्रातून सुमारे दोन हजाराहून अधिक नागरिकांचे स्थलांतर केले होते.
२) जुलै २०२२ मध्ये पावसाळ्यात वसई पूर्वेच्या वाघराळपाडा परिसरात एका बैठ्या चाळीवर दरड कोसळून दुर्घटना घडली होती.या दुर्घटनेत अमित सिंग (३५) आणि त्यांची मुलगी रोशनी सिंग (१५) यांचा मृत्यू झाला होता.
३) सप्टेंबर २०२४ मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेच्या शिर्डी नगर वरून संतोष भुवन या ठिकाणी जाणाऱ्या रस्ता लगत असलेल्या भीम डोंगरी भागात भूस्खलन झाल्याची घटना घडली होती. सर्व माती रस्त्यावर आल्याने काही काळ हा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.