वसई: वृक्षांची स्थिती माहीत व्हावी यासाठी दर पाच वर्षांनी वृक्ष गणना केली जाते. मात्र २०१६ नंतर वसई विरार शहरातील वृक्षांची गणनाच झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे  पालिकेने वृक्ष गणनेकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर वृक्ष गणना करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेला ही प्रतिसाद मिळाला नसल्याने ही वृक्ष गणना रखडली आहे.वसई-विरार शहराचे झपाटय़ाने नागरीकरण वाढू लागले आहे. यामुळे काही ठिकाणी वृक्षतोडही केली जाऊ लागली आहे. शहरातील वनीकरणाचा पट्टा वाढावा व पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी पालिकेकडून वृक्षारोपणासारखे विविध उपक्रम राबविले जात आहेत परंतु शहरात असलेल्या वृक्षांची माहिती पालिकेला मिळावी यासाठी वृक्ष गणना ही होणे गरजेचे आहे.

यामुळे शहरातील वृक्षांची आकडेवारी व माहिती समोर येत असते. यापूर्वी पालिकेने २०१६ मध्ये वृक्ष गणना केली होती. त्यावेळी पालिकेच्या कार्यक्षेत्रात १४ लाख  ४२५ वृक्षांची नोंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा वृक्ष गणनाच झाली नसल्याचे समोर आले आहे.  वृक्ष गणना करण्यासाठी पालिकेने २०२४ मध्ये निविदा ही काढली होती.या निविदेत दोन ते तीन ठेकेदार पुढे आले होते मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी ही त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे नऊ वर्षे झाली तरीही अजूनही शहरातील वृक्ष गणना होऊ शकली नाही. त्यामुळे शहरात एकूण किती वृक्ष आहेत व किती वृक्षांची कत्तल झाली याची माहिती पुढे येऊ शकली नाहीनिविदेला ही हव्या त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नसल्याने वृक्ष गणना झाली नाही असे वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आता वृक्ष गणना व्हावी यासाठीची प्रक्रिया सुरूच आहे असेही त्यांनी आहे.

भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे केली जाणार होती वृक्षगणना

२०२२ मध्ये राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे वृक्षगणना केली जाणार होती.या गणनेत वृक्षाची प्रजाती, नाव, फळजाती, उंची, वय, घेर, रंग, सुवास, वृक्षाची शास्त्रीय माहिती, त्याचा उपयोग अशा विविध अंगांनी माहिती नोंदविली जाणार होती. ती सुद्धा प्रक्रिया पुढे न सरकल्याने वृक्ष गणना रखडली आहे.

वृक्ष गणना महत्त्वाची

वसई विरार शहरात विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. विकास कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत असते. तर काही जण छुप्या मार्गाने वृक्ष तोड केली जाते त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असतो. पालिका वृक्ष लागवडीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करते मात्र त्यांच्या संवर्धनाच्या अनुषंगाने प्रयत्न होत नसल्याचा आरोप काँग्रेस पर्यावरण विभागाचे समीर वर्तक यांनी केला आहे.याशिवाय ज्यांना वृक्ष छाटणीच्या परवानग्या दिल्या जातात ते दिलेल्या नियमानुसार वृक्ष लागवड करतात की नाही याची सुद्धा तपासणी होत नाही अशा सर्व बाबी समोर येण्यासाठी वृक्ष गणना ही महत्त्वाची असल्याचे वर्तक यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७५ हजार वृक्ष लागवड करणार

वाढते अतिक्रमण, विकासकामात होणारी वृक्षतोड,  वातावरणातील बदल अशा विविध कारणांमुळे वसईचा हरित पट्टा नष्ट  होऊ लागला आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी ७५ हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. यात देशी प्रजतीची झाडे लावली जाणार आहे.यासाठी ६ कोटी रुपयांचे नियोजन केले आहे. या वृक्षांच्या देखभालीसाठी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे अशी माहिती महापालिकेने दिली.