वसई : विरारच्या ग्लोबल सिटी येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर शहरातील सर्व खासगी प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या खासगी सांडपाणी प्रकल्पाकडून सुरक्षेच्या नियमांचे आणि मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ग्लोबल सिटी मधील प्रकल्पही मागील ६ महिन्यांपासून नादुरूस्त असल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी विरारच्या ग्लोबल सिटी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (एसटीपी) टाकी मध्ये साफसफाई करण्यासाठी गेलेल्या ४ कामगारांचा टाकीतील विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला आहे. या सांडपाणी प्रकल्पांच्या सुरक्षेचा मुद्दा या निमित्त पुन्हा उपस्थित झाला आहे. २० हजार चौरस फुटांचे बांधकाम करणार्‍या विकासकांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधणे अनिवार्य आहे. हा प्रकल्प बांधल्यानंतर त्याच्या देखभाल दुरूस्तीचे काम अधिकृत कंपनीकडून करवून घेतले जाते. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे रुस्तमजी बिल्डरचे ३ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आहेत. त्यापेकी रुस्तमजी शाळेला लागून असलेल्या एका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात ही दुर्घटना घडली. या प्रकल्पात १४२ इमारतीच्या साडेतीन दशलक्ष लिटर्स सांडपाणार्‍यावर प्रक्रिया केली जाते. प्रकल्पात २० फूट उंचीच्या दोन टाक्या आहेत. या सांडपाणी प्रकल्पाच्या देखभालीचे काम पॉलिकॉम इन्हवायरो इंजिनिर्यस या कंपनीला देण्यात आले होते. गेल्या ६ महिन्यांपासून प्रकल्पात बिघाड झाला होता. सतत दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. मात्र कंपनीने योग्य उपाययोजना केल्या नाहीत. परिणामी ४ कामगारांना आपला जीव गमवावा लागला.

हेही वाचा… राज ठाकरेंच्या महायुतीच्या पाठिंबामुळे उत्तर भारतीय नाराज; मिरा भाईंदर भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला

खासगी सांडपाणी प्रकल्पांचा आमचा संबंध नसल्याचे पालिकेने सांगितले आहे. मात्र यावर आता जोरदार टिका होऊ लागले आहे. प्रकल्प जरी खासगी असला तरी त्यावर नियंत्रण ठेवणे हे महापालिकेचे काम आहे. ते आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असे भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष मनोज बारोट यांनी सांगितेल. या सांडपाणी प्रकल्पात मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जाते की नाही यावर पालिकेने देखरेख ठेवणे आवश्यक होते. ज्या प्रकल्पात दुर्घटना घडली तेथे ६ महिन्यांपासून दुर्गंघीच्या तक्रारी येत होत्या. पालिकेने तेव्हाच दखल घेऊन कारवाई का केली नाही, असा सवालही बारोट यांनी केला.

कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा

या दुर्घटनेप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी पॉलिकॉम कंपनीचा पर्यवेक्षक महादेव कुपटे याला निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम ३०४, ३४ तसेच हाताने मैला उचलणार्‍या सफाई कर्मचार्‍यांच्या सेवा योजनेस कर्मचार्‍यांच्या प्रतिबंध आणि पुर्नवसन अधिनिय २-२३ च्या कलम ८, ९ अन्वये गुन्हे दाखल करून अटक केली होती. त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पॉलीकॉन इन्हायरो इंजिनियर्स प्रा लि कंपनीच्या मालकाविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटनेच्या वेळी पर्यवेक्षक कुपटे घटनास्थळी नव्हता. आम्ही नेमके मार्गदर्शक तत्वे आणि नियम काय आहेत? त्याचा अभ्यास करत असून पुढील कारवाई केली जाईल असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा… Maharashtra News Live : दक्षिण मुंबईत महायुतीचा उमेदवार ठरेना, तीन इच्छुकांकडून प्रचार

.. म्हणून ५ वा कामगार वाचला

या दुर्घटनेेच्या वेळी एकूण ५ कर्मचारी प्रकल्पाच्या ठिकाणी होते. सकाळी साडेदहा वाजता एक कामगार आत गेला. तो न आल्याने त्याला बघण्यासाठी इतर कामगार एका पाठोपाठ ४ कामगार आत गेले आणि त्या चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. शुभम पारकर (२८), अमोल घाटाळ (२७) निखिल घाटाळ (२४) आणि सागर तांडेलकर (२९) अशी या दुर्घटनेत मरण पावलेल्या कामगारांची नावे आहेत. मात्र प्रकल्पावर उपस्थित असलेला ५ व्या कामगाराच्या पायाला दुखापत झालेली असल्याने तो टाकीत उतरला नाही. आपले ४ सहकारी न आल्याने त्याला शंका आली आणि मग त्याने अग्निशमन दलाच्या जवानांना कळवले. जर पायाला दुखापत नसती तर तो देखील आत मध्ये गेला असता आणि अनर्थ घडला असता.