अरुण मळेकर

arun.malekar10@gmail.com

सुमारे दीडशे वर्षांच्या काळात ब्रिटिश आमदानीत राजकीय, सामजिक, शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामावर त्यांच्या संस्कृतीसह विचारसरणीची मोहोर भारतीय समाजमनावर उमटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे भारतीयांत नवीन, आधुनिक विचारसरणीसह दृष्टिकोनातही बदल झाला. त्याव्यतिरिक्त कलापूर्ण सुरक्षित बांधकामावरही त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव आजतागायत आहेच. त्यातील बऱ्याच वास्तू या प्रशसकीय इमारती असून, काही वास्तूंची निर्मिती ही स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या वर्गामध्ये गणली जाते.

ब्रिटिश प्रशासकांना विकास कामे करताना त्यांच्या भ्रमंतीच्या काळात एक अत्यावश्यक गरजेचा भाग म्हणून आवश्यकता भासल्याने देशभर वेगवेगळ्या ठिकाणी अल्पकालीन वास्तव्यासाठी जी विश्रामगृहे उभारली गेली त्याला नैसर्गिक परिसराचे कोंदण लाभल्याने, ती आजही वनपर्यटनाच्या वास्तव्यासाठी आवश्यक भाग झाली आहेत. त्यातील काही विश्रामगृह-वास्तूंनी शंभरीही पार केलीय. इतके त्यांचे बांधकाम सुरक्षित आणि भलेभक्कम आहे.

ब्रिटिश जमान्यात रस्ते, पूल, रेल्वे मार्गाची उभारणी करताना त्यांचे अधिकारीवर्ग आणि प्रत्यक्ष काम करणारा कर्मचारी वर्ग यांना ठरावीक अंतरावर अल्पकालीन वास्तव्यासाठी प्रारंभीच्या काळात मजबूत कापडी तंबू आणि कालांतराने सुरक्षित आडोसा असलेली दगडी घरांची निर्मिती झाली. असल्या प्रकारच्या वास्तूंना त्या काळी ‘पडाव’ असे संबोधले जायचे. कालांतराने त्याला रेस्ट हाऊस (विश्रामगृह) हे नाव रूढ झाले.

आधुनिकतेची कास धरलेल्या ब्रिटिशांनी या विश्रामगृहासभोवतालचे निसर्गसंवर्धन साधत विश्रामगृह वास्तूत प्रशस्तपणाबरोबर आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यात सुधारणा करून ते स्वयंपूर्ण करण्यावर भर दिला. उदा. मुदपाकखाना, स्नानगृह, शयनगृह यांची निर्मिती होऊन खानसामा आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी जवळच निवसव्यवस्थाही केली गेली. या सोयीसुविधांमुळे सामान्य जनांना विश्रामगृहाबद्दल आकर्षण वाटायला लागले.

असल्या वास्तूंना ‘डाक बंगले’ म्हणूनही संबोधले जाते. कारण परिक्षेत्राची पोस्टामार्फत जी पत्रे यायची आणि त्यांचा ‘बटवडा’ होण्याचे काम या वास्तूत होत असल्याने त्याला ‘डाक बंगले’ म्हटले जायचे (डाक म्हणजे पोस्टामार्फत आलेली पत्रे). कोणत्याही प्राचीन धार्मिक पाश्र्वभूमीच्या बांधकामांना सरसकट ‘हेमाडपंती’ वास्तुशैली संबोधण्याची सवय आपल्याकडे आहे. तसेच गेस्ट हाऊस, रेस्ट हाऊस आणि सर्किट हाऊस हे एकाच आर्थी वापरले जातात. हे काही खरे नाही.. कारण रेस्ट हाऊस म्हणजे काही तासांच्या वास्तव्यासाठी तर गेस्ट हाऊस म्हणजे एक-दोन दिवसांच्या निवासासाठी आणि सर्किट हाऊस म्हणजे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या तात्पुरत्या मुक्कामासाठी सुसज्ज आणि स्वयंपूर्ण अशी निवास व्यवस्था उपयोगात आणण्यात येते.

शहरी जीवनाच्या सुविधा पुरवणारी सर्किट हाऊस या निवासाची शान अलिशान आणि सुसज्ज, स्वयंपूर्ण असते. पण येथे आरक्षण मिळणे तसे कठीणच. लोकप्रतिनिधींच्या ओळखीनेच येथे प्रवेश मिळणे शक्य आहे. हजार-पंधराशे फुटांपेक्षाही अधिक जागेच्या निवासातील सर्व सोयीयुक्त न्हाणीघर, स्वच्छतागृह म्हणजे शहरी जीवनातील एक खोली आणि स्वयंपाकगृहाची जागा त्यांनी व्यापलेली असते. वातानुकूलित शयनगृहासह दर्शनीच अंभ्यागतांसाठीचे आकर्षक दालन या सर्वच ठिकाणी मुलायम कार्पेटने जागा सुशोभित केलेली असते.

असल्या निवासव्यवस्थेवर प्रारंभी पी. डब्ल्यू. डी. आणि नंतर वनखात्याचे नियंत्रण – व्यवस्थापन होते.

ब्रिटिश संस्कृतीची मोहोर उमटलेल्या बऱ्याच विश्रामगृहांच्या उभारणीत दगडी बांधकाम आढळते. त्यासाठी परिसरातील निसर्ग-वातावरणाशी सुसंगत हे बांधकाम असावे याबाबतीत ते दक्ष होते. निसर्गाचे तडाखे सहन करत त्यातील काही विश्रामगृहांची बांधकाम संरचना अद्याप जैसे थे आहे. जंगल परिक्षेत्रातील विकासकामे करताना निसर्गाचे मोल जाणणाऱ्या ब्रिटिशांनी जंगल संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी लॉर्ड डलहौसीच्या काळात येथील निसर्गसंवर्धनासाठी नियमावली तयार केली होती. त्यामागील उद्देश साध्य करण्यासाठी विश्रामगृह निवासाची आवश्यक त्यांना होतीच. परिणामत: आजही अस्तित्वात असलेल्या विश्रामगृहस्वरूप पुरातन वास्तू या नैसर्गिक वातावरणातील हिरवाईत आपले अस्तित्व टिकवून आहेत.

महाराष्ट्राचा विचार केल्यास निसर्ग फिदा असलेल्या विदर्भ वनक्षेत्रातील उभारलेली अनेक विश्रामगृहे ही जिवंत उदाहरणे आहेत. या प्रदेशातील सुमारे पंचवीसपेक्षा अधिक संख्या असलेल्या या सर्वच नेत्रदीपक विश्रामगृहांची दखल घेणे जागेच्या मर्यादेत शक्य नाही. परंतु त्यातील नागझिरा, मेळघाट, भामरागड, नवेगांव बांध, सोमाडोह, परतवाडा येथील वनराईतील विश्रामगृहातील वास्तव्यात अंतर्मुख होऊन निसर्गवाचन करता करता जणू परमेश्वराचे विराट स्वरूप दर्शन घडवतात. ही आज अस्तित्वात असलेली बरीच विश्रामगृहे वनखात्याच्या अखत्यारीत असून, त्यांचे आरक्षणांसहित व्यवस्थापन प्रादेशिक तसेच वनक्षेत्रपाल दर्जाच्या अधिकारीवर्गाच्या कक्षेत आहे. नीरव शांततेच्या वातावरणातील या वास्तूंचे बांधकाम बऱ्याच ठिकाणी दगडी आहेत. त्याच्या अंतर्गत रचनेत प्रशस्त स्वागतकक्ष, एक-दोन शनयगृह मुदपाकखाना, भोजनगृह, स्नानगृह – स्वच्छतागृह या सुविधा असतातच. त्याचप्रमाणे परिसरातील नैसर्गिक वातावरणाशी सुसंगत, प्रचलित पारंपरिक भोजन प्रबंध करण्यात ही विश्रामगृह प्रसिद्ध आहेतच. बऱ्याच विश्रामगृहात तेथील स्थानिकांच्या चवीचे भोजन पुरवण्यात विश्रामगृहाचे खानसामे वाकबदार असल्याने येथे वास्तव्यास आलेला अतिथी येथील भोजन- न्याहरीची चव कायम स्मरणात ठेवणार.

पण एक ध्यानात घ्यायला हवे की, असली विश्रामगृहे म्हणजे शहरी वातावरणातील तत्पर सेवा उपलब्ध करून देणारी हॉटेल निवासव्यवस्था नव्हे. रानावनातील विश्रामगृहाचा सुखद अनुभव घ्यायचा असेल तर संयम हवा, प्रतीक्षा करण्याची सवय हवी. कारण प्रत्येक विश्रामगृह हे शहरापासून बरेच लांबवर असल्याने दैनंदिन गरजेच्या वस्तू सहज उपलब्ध न झाल्याने खासाम्याला आधी कल्पना द्यावी लागते. पण बरीच प्रतीक्षा केल्यावर पुढय़ात येणाऱ्या खाद्यपदार्थाच्या स्वाद-आस्वादाने पर्यटक खूश होणारच.

शहरी भागातून आलेल्यांना रानावनातील विश्रामगृहातील शांतता ही दैवदुर्लभ भासते. कारण सभोवतालातील अफाट निसर्गाचा नजारा आणि त्याच्या वास्तव्यातील वावरणारे पशू-पक्षी यांच्या मुक्त संचाराने, आवाजाने आपल्याला श्रवण आणि दृष्टिसुखाचा दुर्मीळ लाभ होतो. म्हणूनच ज्याला आजच्या वनपर्यटनाचा अनुभव घ्यायचा असेल त्याने रानातील विश्रामगृहात एक-दोन दिवस वास्तव्य केल्यास निसर्गवाचनाचासुद्धा परस्पर लाभ घेता येईल.

गेस्ट हाऊस-रेस्ट हाऊस ही निवासव्यवस्था सर्किट हाऊसच्या दर्जापेक्षा निश्चितच कनिष्ठ स्वरूपाची आहे. येथे वास्तव्यासाठी येणाऱ्यांच्या प्राथमिक गरजा भागवल्या जातात. उपरोक्त तीनही प्रकारच्या निवास व्यवस्थेत तफावत असली तरी येथे उपलब्ध होणारे खाद्य पदार्थ आणि भोजनव्यवस्थेबाबतीत मात्र एकसूत्रीपणा जाणवतो.

खाद्यपदार्थाना जो रुचकरपणा जाणवतो त्यात खानसामा आणि सभोवतालचे सुखद वातावरण हे घटक आहेतच. खानसामे स्थानिक पद्धतीचे भोजन प्रबंध करण्यात निष्णात आहेतच.

औरंगाबाद हे तर आता पर्यटन क्षेत्र झाल्याने तेथे सर्व प्रकारची निवास व्यवसथा आहे. तरी नजीकची विश्रामगृहे आपले वेगळेपण सांभाळून आहेत. वेरूळनजीकचे ब्रिटिशकालीन सर्किट हाऊस निजामाच्या काळापासून शाही आदब राखून आहे. सभोवतालचे पहाड, नजीकची वेरूळ लेणी, मशिदी आणि सुखद शांततापूर्ण वातावरणात येथील वास्तव्य स्मरणात राहणारे आहे. औरंगाबाद-जळगाव मार्गावरील फर्दापूरचे पर्यटकनिवास जरी सुसज्ज असले तरी समोरच्या वाहतुकीने शांतता लाभत नाही. रेस्ट हाऊस, गेस्ट हाऊसची शान याला नाही.

मुंबई-ठाण्याला नजीक असलेले बारवी धरणाच्या पाश्र्वभूमीवरील विश्रामगृह हे एम. आय. डी. सी.च्या अखत्यारीत असून, त्याची बांधणी मोठय़ा कल्पकतेने केली आहे. विश्रामगृहातूनच प्रचंड बारवी जलाशयाचे होणारे नेत्रसुखद दर्शन असेच आहे. कोणत्याही आवाजाचा उपद्रव नाही. विविध वनसंपदेची हिरवाई सौंदर्यात भर घालते.

मुंबई-ठाण्यानजीकचे घोडबंदरचे विश्रामगृह हे तर वारसा स्थळच. हा पोर्तुगीजकालीन गव्हर्नरचा बंगला. त्यावर पोर्तुगीज वास्तुशैलीचा प्रभाव आहेच. किल्लास्वरूप वास्तूकडे जाताना तीस पायऱ्या चढून जावे लागते. या स्वयंपूर्ण निवासातून घोडबंदर खाडीसह वसईपर्यंतचा परिसर आपल्या नजरेत भरतो. या विश्रामगृहावर राज्य पर्यटन महामंडळाचे नियंत्रण आहे, त्यांच्यामार्फत याचे आरक्षण करता येते.

सिंधुदुर्गातील सागराच्या पाश्र्वभूमीवरचे पहाडावरील वेंगुर्ला विश्रामगृह म्हणजे सागर सान्निध्याचा संस्मरणीय अनुभव देणारा आहे. सोसाटय़ाचा भन्नाट वारा आणि सागराची अखंड गाज अंतर्मुख करणारी आहे. दिवसाच्या प्रत्येक प्रहरी येथील वास्तव्यात निसर्गाची विविध रूपं अनुभवता येतात.

महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील घोलवड येथील सागरकिनाऱ्यावरचे रेल्वेच्या अखत्यारातील डाकबंगला म्हणजे ब्रिटिशकालीन आदर्श डाकबंगला वास्तूचा नमुना आहे. सभोवतालच्या झाडोऱ्यातील या डाकबंगल्यात प्रशस्त व्हरांडा, स्वागतकक्ष, भोजनगृह, शयनगृह सारे काही नीटनेटकेपणाने आणि स्वयंपूर्ण असल्याने येथील वासतव्यातील काळ स्मरणात राहणारा ठरतो. समोरचा दर्या जरी उथळ असला तरी भरती-ओहोटीचा खेळ अनुभवता येतो. या डाकबंगल्याच्या आवारातील महाकाय  (गोरखचिंच) वृक्ष बघितल्यावर सृष्टीचे  वेगळेच रूप अनुभवायला येते.

प्रवास-पर्यटनात विश्रामगृह, डाकबंगले या निवासव्यवस्थेचा खूप मोठा आधार आहे. कारण त्याला वेगळ्याच संस्कृतीसह ऐतिहासिक मोलही आहे. मात्र सध्या ही निवासव्यवस्था आपल्या उद्देशासह, मूळ चेहराच हरवत चालली आहे. कारण त्याच्या देखभालीसाठी निधी नाही. हायफाय जीवन शैलीच्या सुविधा पुरविणाऱ्या सर्किट हाऊसपासून सर्वसामान्यजन तर दूरच आहेत.

शहरातील माणसाला निसर्गसहवासासह तेथील स्थानिकांची जीवनशैली अनुभवण्यापेक्षा शहरी सोयींचा अट्टहास असतो. म्हणूनच शंभर-दीडशे वर्षांच्या या वास्तुशास्त्रीय मोल असलेल्या या नैसर्गिक वातावरणाच्या  इमारतीत एसी, फ्रिज, गीझर, टी.व्ही. इ.नी आक्रमण केल्याने मूळ संकल्पनेसह त्याचा चेहराच बदललाय हे नाकारता येत नाही.. रानावनातील वन्खात्याच्या नियंत्रणातील बऱ्याच विश्रामगृहांनी मात्र ब्रिटिशकालीन नजाकत बऱ्यापैकी सांभाळली आहे.. कदाचित रानावनाची माहेरओढ असलेला प्रशिक्षित अधिकारी आणि सेवकवर्गाचे नियंत्रण

हे कारण असू शकेल. आणि बहुसंख्य विश्रामगृहे ही वनखात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी उपयोगात आणली जातात. त्यामुळे असंस्कृत पर्यटक – प्रवाशांचा त्याला उपद्रव होत नाही.