अरुण मळेकर

आता तापमानात वाढ होताना तहान भागवण्याचे अनमोल काम करणाऱ्या पुरातन पाणपोयांची आवश्यकता भासते. मुंबईच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्वधर्मीयांनी पाणपोया उभारून समाजऋण व्यक्त केलेय. परंतु वारसा-संस्कृतीचा मापदंड असलेल्या या पाणपोयांना बेवारशी शिलालेख आणि स्तंभ-विरगळांची अवस्था आली आहे.

जगातल्या सर्वच धर्मीयांनी निसर्ग संवर्धन सूयरेपासनेबरोबर पाण्याची अनन्यसाधारण महत्त्व मानले आहे. इतकेच नव्हे, तर त्याला देवस्वरूप देऊन त्याच्या उपासनेची महतीही सांगितली आहे. जगातील प्राचीन संस्कृतीचा उगम आणि विकासही जलस्रोताचा शोध घेऊनच झालाय. धार्मिक अधिष्ठान असलेल्या कोणत्याही प्राचीन संस्कृतीत जलदानाला पुण्यकर्म मानले गेलेय. तहानलेल्या कुणाचीही तहान भागवायची हे सूत्र त्यापाठीमागे अभिप्रेत आहे.

याच विचारसरणीतून रस्तेमार्गावर अनेक ठिकाणी नि:स्वार्थ सेवाभावीपणे ज्या ‘प्याऊ’ निर्माण झाल्या त्याला सामाजिक बांधिलकीबरोबर पुण्यकर्मासह इतिहासही आहे. या पुण्यकर्मात सर्वच धर्मीयांचा सहभाग जाणवतो. या ‘प्याऊ’द्वारे जलदानाचे पवित्र काम करता करता निधर्मी-एकसंध समाज उभारणीची जणू शिकवणच दिली गेली. हा परिपाठ पूर्वापारपासूनचा आहे.

‘प्याऊ’ म्हणजेच पाणपोई. वाटसरू, प्रवासी, पर्यटक तथा अन्य कुणा पांथस्थाची तहान भागवण्यासाठी उभारण्यात आलेल्या अनेक पाणपोया (प्याऊ) आजच्या गतिमान जीवनातही काही ठिकाणी आपले अस्तित्व टिकवून सत्कार्य तथा पुण्य कर्म नि:स्वार्थपणे करताहेत.. प्राचीन काळापासून जगातील बऱ्याच साम्राज्यकाळात दळणवळणासाठी रस्ते, पुलाची उभारणी करताना प्रवासी, पांथस्थांसाठी पाणपोया उभारल्याचे दाखले आहेत. फ्रान्सचा बादशहा नेपोलियन यांनी आपल्या प्रशासन काळात महामार्गाच्या उभारणीबरोबर जोडीला पाणपोयाही उभारल्या.

‘प्याऊ’ हा शब्दच मुळी पाण्याची तहान भागवण्याशी निगडित आहे. पाण्याची कमतरता असल्याने राजस्थान, गुजरात प्रदेशात पाणपोयांचे प्रमाण जास्त आहे. रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या तहानलेला वाटसरू, पांथस्थांची तहान भागवण्यासाठी झोपडपट्टीसदृश मोक्याच्या जागी रांजणस्वरुप साठय़ातून पाणीपुरवठय़ाची व्यवस्था स्थानिकांकडून एक पूण्यकर्म म्हणून केले जाण्याचा प्रघात आजही या प्रदेशात आहे. कुणाही भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे हे एक पुण्य कर्म मानले जाण्याची त्यामागे भावना आहेच.

राजस्थान प्रदेशात आजही बस स्टँड, रेल्वे स्थानकानजीक आधुनिक पद्धतीचे वॉटर कुलर आणि हवाबंद बाटलीतून पाणी उपलब्ध होत असले तरी बऱ्याच ठिकाणी विनामूल्य पाणपोया व्रतस्थपणे आपले काम करताहेत. हे सेवाभावी काम अखंडपणे चालण्यासाठी पावसाळ्यात जे काही पाणी प्राप्त होईल त्याचे नियोजनपूर्वक संवर्धन करण्याचे सामाजिक भानही येथील लोकांमध्ये आहे.

परंतु आज शहरीकरणाबरोबर औद्योगिक विकास साधताना, पाणपाोईचा प्राचीन पवित्र ठेवा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तहानलेल्यांना वाटेवरच्या एखाद्या उपाहारगृहाचा आधार घ्यावा लागतोय.. मुंबई महानगरी आता दिवसागणिक आकाराने विस्तारतेय. वाढत्या लोकसंख्येबरोबर आधुनिकीकरण, औद्योगिकीकरण असा इतिहास असलेल्या महानगरीतील वारसा-संस्कृतीचे मापदंड असलेल्या अनेक घटकांपैकी बऱ्याच पाणपोया आता केवीलवाण्या अवस्थेत उभ्या आहेत. इतिहासाचे साक्षीदार असलेल्या बेवारशी शिलालेख-विरगळाची त्यांना अवकळा आली आहे.

पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने आता तापमानात वाढ होत चालली आहे. अशा वेळी तहान भागवण्याचे अनमोल काम करणाऱ्या पुरातन पाणपोयांची आवश्यकता तीव्रतेने भासते. मुंबईच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या गुजराती, जैन, कोळी, पारसी, सिंधी समाजाने अनेक ठिकाणी पाणपोया उभारून समाजऋ ण व्यक्त केले आहेत. वारसावास्तूंचे मोल लाभलेल्या अनेक पाणपोया पारसी बांधवांनी आपल्या आप्तेष्टांच्या स्मरणार्थ बांधल्या आहेत. त्यापाठीमागे हीच धारणा आहे.

मुंबईतील दक्षिण मोहल्ल्यात या पुरातन पाणपोयांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यातील अनेक पाणपोयांचे संवर्धन महापालिका प्रशासन करतेय. परंतु त्यांची संख्या अल्प असून, बहुसंख्य पाणपोया तशा अलक्षित, नावापुरत्याच असून त्यांची पडझड झालेली दिसते.

अशा परिस्थितीतही मुंबई शहरात ज्या पाणपोया आपले अस्तित्व टिकवून आहेत, त्यातील काहींना कलात्मक चेहरा आहे. तर बऱ्याच पाणपोयांनी गरजूंची सोय भागवण्यासाठी उपयुक्ततेवर भर दिला आहे. दादर परिक्षेत्रातील गोखले मार्गावरील आनंद विठ्ठल कोळी पाणपोई जरी दुर्लक्षित-उपेक्षित असली तरी तिच्या मूळ बांधकामाची कल्पना येते. दोन्ही बाजूस घुमटधारी सिमेंटच्या बांधकामाचे खांब आणि मध्यभागी कमान आजही शाबूत आहे. मात्र कमानीसमोरील जागेत अस्वच्छता जाणवते. कुणा एकेकाळी ही पाणपोई होती इतकीच तिच्याबद्दल लोकांना माहिती आहे.

भातबाजार म्हणजे मुंबईतील व्यापारी मोहोल्ला. दिवसभर येथे व्यापारी वर्गाप्रमाणेच श्रमजीवी कामगारांचीही वर्दळ असते.

समाजऋण मानणाऱ्या सेवाभावी केशव भिकाजी नाईक यांनी ही पाणपोई इ. स. १८७६ मध्ये बांधली. नुकतेच या पाणपोईचे नूतनीकरण करण्यात आले आहे. वारसा वास्तूत समावेश व्हावा असेच या पाणपोईचे बांधकाम आहे. दगडी बांधकाम उभारलेल्या या पाणपोई चौथऱ्यावर दगडी नंदी असून, पांथस्थाची तहान भागवण्यासाठी भले-मोठे पाण्याचे रांजण येथे ठेवलेले आहेत. तसेच पाणी देण्यासाठी एक सेवक दिवसभर कार्यरत असतोच.

त्याच्या नजीकच्याच आणखीन एका पाणपोईचा चेहरा सौंदर्यपूर्ण आहे. त्याचे सर्व बंधकाम दगडाचे आहे. हे बांधकाम छोटेखानीच असले तरी मंदिर प्रवेशद्वाराप्रमाणेच अशा गोलाकार खांबावरील चौफेर कलाकुसर वाखाणण्यासारखी आहे. सभोवतालच्या गोलाकार कट्टय़ावर विसावा घेण्यासाठी श्रमिकांना त्याचा उपयोग होतो.

गजबजलेल्या हार्निमन सर्कल येथील पाणपोई इ. स. १८७३ मध्ये बांधण्यात आली आहे. नूतनीकरणानंतर या पाणपोईने आधुनिक चेहरा धारण केल्याचे प्रथमदर्शनीच  जाणवते. मनकुवर बाईगंगादास यांच्या नावाने ही पाणपोई ओळखली जाते. येथील वृक्षाच्या छायेत भल्यामोठय़ा रांजणात पाणीसाठा केला जातो.

दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील रामजी सेठिबा यांच्या स्मरणार्थ बांधलेली पाणपोई लहानशीच आहे. आयतकोनी आकाराच्या या पाणपोईला दर्शनीभागीच नळाची व्यवस्था आहे. ‘मुंबई प्याऊ प्रोजेक्ट’ उपक्रमांतर्गत या पाणपोईचे व्यवस्थापन-देखभाल केली जाते. परंतु पाणीपुरवठय़ाचे सातत्य नसल्याने या पाणपोईचा फारसा उपयोग होत नाही.

मुंबईतील एक जुनी पाणपोई म्हणून गणली जाणारी काळाचौकी येथील पाणपाोई ‘कावसजी जहांगीर’ यांच्या नावाने ओळखली जाते. ही लहानशी पाणपोई गोलाकार जोत्यावर उभारलेली असून तिच्या बांधकामासाठी लाल रंगाचा ग्रॅनाईट वापरला आहे. पाणपोईचा वरील भाग घुमटाकार आहे. पाणी पिण्यासाठी मध्यभागी नळाची सोय आहे. मात्र, दुर्दैवाने ही पाणपोईसुद्धा कशीबशी आपले अस्तित्व राखत आज उभी आहे.

लांबपल्ल्याच्या गाडय़ांवरील अनेक रेल्वे स्थानकांवर पाणपोया दिसतात. साधारणत: फलाटाच्या दोन्ही बाजूस गोलाकार आकाराच्या दोन-तीन लोखंडी नळ असलेल्या पाणपोयांना बरेचदा पाणीच नसते. तर काही पाणपोयांचे पाणी रेल्वे स्थानकानजीकच्या लोकांची दैनंदिन गरज भागवतात. बऱ्याच रेल्वे स्थानकांवर उंचवटय़ावरील पाण्याने भरलेल्या रांजणातून गरजूंना पाणी पुरवण्याची सोय आहे. त्यासाठी मनुष्यबळ असल्याने येथे स्वच्छता बऱ्यापैकी आढळते. ग्रामीण चेहरा असलेल्या अनेक गावांत सार्वजनिक विहिरीलगत भला मोठा हौद तयार करून गायी-गुरांप्रमाणे अन्य मुक्या प्राण्यांचीही तहान भागवली जाते. असल्या पाणीपुरवठय़ाची व्यवस्था ग्रामपंचायत स्वरूपाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असते. हा पाण्याचा हौद आयताकोणी असतो. त्याला कोणताच कलात्मक चेहरा नसतो.

गडकोट, किल्ले, जंजिरे, शिलालेख-विरगळ यांचे जतन करण्यासाठी  इतिहासप्रेमी, अशासकीय अस्थापना आहेत तशाच पाणपाोई संवर्धन, पुनरुज्जीवन करण्यासाठी काही संस्था मोलाचे काम करताहेत. पण त्यांचे एकाकी काम अपुरे पडतेय. इतिहासजमा होत असलेल्या पाणपोया (प्याऊ) म्हणजे आपल्या संस्कृतीचे अधिष्ठान असलेला प्राचीन वारसा आहेत. पण सामाजिक जाणिवेची उणीव आणि शासकीय उदासीनता असतानाही एसएनडीटीच्या वर्षां हिरगावकर आणि पुरातत्त्व शास्त्राच्या अभ्यासक स्वप्ना जोशी यांचे त्यासाठीच एकाकी काम खूपच बोलके आहे. त्यांच्या ध्यासपर्वामुळे ‘प्याऊ प्रोजेक्ट’ हा संवर्धन करण्यासाठी उपक्रम उभा राहिला. महापालिकेच्या सहकार्याने मुंबईतील इतिहासजमा होत असलेल्या पाणपोया कार्यरत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

मुंबईतील वारसास्थळांचे नूतनीकरण करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेने उपक्रम हाती घेतला आहे, हे त्याचेच फलित आहे. या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनसनजीकच्या ‘कोठारी प्याऊ’ने नवीन चेहरा धारण करून आपले अस्तित्व टिकवलेय. एका सामाजिक जाणिवेने या उपक्रमासाठी सातत्य राहण्यासाठी जनजागृतीचीही खचितच आवश्यकता आहे.

arun.malekar10@gmail.com