काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी वादग्रस्त विषयांवर मौन बाळगल्याने काही गोष्टींच्या आकलनात व त्या समजण्यात आमचा गोंधळ उडाला़  त्यामुळे आमचा पराभव झाला, अशी टीका करीत काँग्रेसच्या पुनरुत्थानासाठी राहुल यांनी सतत लोकांसमोर असले पाहिजे व नेहमी व्यक्त होत राहिले पाहिजे, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे.
लोकसभेतील काँग्रेसच्या पराभवानंतर तीन महिन्यांनी सिंग यांनी मौन सोडले असून राहुल गांधी नेमके कुठे कमी पडले यावर बोट ठेवले आहे. ‘द संडे एक्सप्रेस’ला त्यांनी सांगितले, की आम्ही आकलनाची व बोधाची लढाई हरलो. आम्हाला आमची कामे लोकांपर्यंत मांडता आली नाहीत, भाजपवाल्यांनी आमच्या या अपयशाचा फायदा घेतला. आधीच्या एनडीए राजवटीपेक्षा आमची कामगिरी प्रत्येक आघाडीवर चांगली होती, तरी लोकांचा पाठिंबा मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो.
जर राहुल गांधी जास्त बोलले असते, तर फायदा झाला असता का, असे विचारले असता ते म्हणाले, की हो, तसे झाले असत़े  कारण राहुल गांधी यांचे विचार आहेत, हे लोकांना त्यातून समजले असते. दुर्दैवाची गोष्ट अशी, की ६३ वर्षांच्या नरेंद्र मोदी यांनी युवकांना बोलण्यातून आकर्षित केले पण ४४ वर्षांचे राहुल गांधी युवकांना आकर्षित करू शकले नाहीत.