ता मिळनाडूतील राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकणाऱ्या मुथुवेल करुणानिधी यांचे मूळ नाव दक्षिणामूर्ती. त्यांचा जन्म तिरुवरूरमधील थिरूकुवलै या खेडय़ातला. द्रविडी राजकारणाची चळवळ पुढे नेऊन त्यांनी आपली पकड सतत कायम ठेवली. द्रविडियन प्रोग्रेसिव्ह फेडरेशन (द्रविड मुन्नेत्र कळघम) या राजकीय पक्षाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. आजतागायत ते पक्षाचे अध्यक्ष राहिले.

अगदी कमी वयात त्यांनी शाळा सोडली व नंतर तामिळ चित्रपटांचे पटकथा लेखक म्हणून नाव कमावले. नंतर त्यांनी ब्राह्मण्यविरोधी द्रविडियन चळवळीचे नेतृत्व करताना राजकारणात लोकप्रियता संपादन केली. त्याच्याही आधीच्या काळात ते हिंदी विरोधी आंदोलनात सहभागी होते. स्थानिक विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करून त्यांनी एक वृत्तपत्र चालवले त्याचे नाव मुरासोली. तेच पुढे द्रमुकचे मुखपत्र ठरले. द्रमुकचे संस्थापक सी. एन. अण्णादुराई यांचे निकटचे सहकारी असल्याने त्यांचा प्रभाव करुणानिधी यांच्यावर होता. १९५३ मध्ये एका कल्लकुडी या रेल्वे स्थानकाला उत्तर भारतीय उद्योजकाचे नाव रेल्वेने दिल्यावरून वाद झाला, त्यातील लढय़ात  करुणानिधी अग्रभागी होते. या स्थानकाला रेल्वेने दिलेले ‘दालमियापुरम’ हे नाव खोडून तेथे ‘कल्लकुडी’ हे नाव आंदोलकांनी लिहिले आणि पुढल्या काळातील अशा अनेक आंदोलनांचा पाया रचला गेला.

द्रमुकला निराळे निवडणूक चिन्हही नसताना, करुणानिधी हे १९५७ मध्ये तामिळनाडू  विधानसभेवर पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले. नंतर ते सातत्याने विधानसभेवर निवडून येत गेले. काही काळ ते पक्षाचे विश्वस्त होते; नंतर विधानसभेत विरोधी पक्षनेते बनले. १९६७ मध्ये द्रमुकने काँग्रेसला हरवून सत्ता काबीज केली त्यावेळी अण्णादुराई मुख्यमंत्री बनले तर करुणानिधी सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. १९६९ मध्ये अण्णादुराई यांचे निधन झाल्यानंतर करुणानिधीच त्यांचे उत्तराधिकारी व मुख्यमंत्री झाले. त्यांचा पहिला कार्यकाळ जानेवारी १९७१ पर्यंत होता. नंतर पुन्हा द्रमुक विजयी होऊन ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. १९७२ मध्ये एम. जी. रामचंद्रन यांचा अण्णा-द्रमुक हा पक्ष वेगळा झाला. त्यानंतर दोन पक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाले. १९९६ मध्ये करुणानिधींच्या द्रमुक सरकारने अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता जयराम यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले. जयललितांना तुरुंगवासही झाला. २००१ मध्ये अद्रमुक सत्तेवर येताच करुणानिधी यांना अटक करून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले पण तो खटला नंतर रद्दबातल ठरला. २००६ मध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी ते पाचव्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यावेळी स्वस्तात तांदूळ व फुकट टीव्ही देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. २०११ मध्ये पुन्हा अद्रमुकने मुसंडी मारली. करुणानिधी यांनी त्यांची जागा वाचवली पण त्यांचे केवळ २२ उमेदवार निवडून आले. त्यावेळी त्यांची प्रकृती वाईट असूनही ते अध्यक्ष राहिले. अखेपर्यंत जयललिता यांच्याप्रमाणेच त्यांची तामिळनाडूच्या राजकारणातील लोकप्रियता टिकून होती.

करुणानिधी यांचे प्रेरणास्थान अळगिरीस्वामी हे होते. तमिळवादी नेते अळगिरीस्वामी यांनी जस्टिस पार्टीच्या माध्यमातून जी भाषणे दिली ती करुणानिधींना भावली त्यातून ऑल तमिळ स्टुडंट्स क्लब ते द्रमुक अशी वाटचाल करुणानिधी यांनी  केली. चित्रपट क्षेत्रात करुणानिधी यांनी पटकथा लेखक म्हणून सुरुवात केली. त्यांचे वक्तृत्वही चांगले होते. द्रविडियन चळवळीत त्यांनी ऐतिहासिक व सामाजिक कथांना सामाजिकता व विवेकवादाची झालर दिली.

साहित्यिक अंग

चित्रपटांतून त्यांनी राजकीय संकल्पना मांडल्या. पराशक्ती हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यातून त्यांनी द्रविडियन चळवळीची तत्त्वे मांडली. त्याला सवर्ण हिंदूंनी विरोध केला. त्या चित्रपटावर बंदी येऊनही नंतर तो ‘हिट’ झाला. पनाम व थंगरतनम हे चित्रपटही विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता यावर आधारित होते. तब्बल ३९ चित्रपटांच्या पटकथा लिहिणारे करुणानिधी हे साहित्यिकही होते. त्यांनी क विता, पटकथा, कादंबऱ्या, नाटके लिहिली. पुढे त्यांच्या पत्रसंग्रहांचीही पुस्तके निघाली. त्यांच्याच कार्यकाळात कन्याकुमारी येथे थिरुवल्लुवर यांचा १३३ फुटी पुतळा उभारला गेला. आजही हा पुतळा पर्यटकांचा आकर्षणबिंदू आहे.

करुणानिधी हे १९५७ ते २०१६ दरम्यान १३ वेळा विधानसभेवर निवडून गेले. वयाच्या पंचेचाळिशीत पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढे आणखीही चार वेळा त्यांना राज्यातील हे सर्वोच्च पद मिळाले. एम.जी. रामचंद्रन यांच्यानंतर करिष्मा असलेल्या नेत्यांपैकी ते एक होते. आणीबाणी, राष्ट्रपती राजवट, आर्थिक घोटाळे, आरोप-प्रत्यारोप असे अनेक चढउतार त्यांनी पाहिले. त्यांनी द्रमुकला असे आदेश दिले होते की, जयललिता आजारी असताना त्यांच्या असहायतेचा राजकीय फायदा घ्यायचा नाही, झटपट राजकीय यशाच्या मागे न लागता वारे बदलण्याची वाट पाहायची, वेळप्रसंगी राष्ट्रीय पक्षांशी आघाडी करायची. त्यांची ही तत्त्वे अखेपर्यंत कायम होती. केंद्र सरकार नेहमी राज्यांवर जो धाकदपटशा करून अधिकारांचे केंद्रीकरण करते त्याविरोधात त्यांनी नेहमीच आवाज उठवला. उत्तर भारताचे हिंदी वर्चस्व दक्षिणेत चालणार नाही हे त्यांनी ठासून सांगितले.

आता त्यांचा वारसा त्यांचे पुत्र एम.के. स्टालिन व कन्या एम. के. कनीमोळी हे कसा पुढे नेतात हा प्रश्न आहे. एक मात्र खरे की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेल्या द्रविडवादी राजकारणातील अखेरचा मोठा नेता आज निवर्तला आहे.

कलैनार म्हणजे काय?

‘कलैनार’ हे बिरूद करुणानिधी यांना कधीपासून लागले, हे कुणालाच सांगता येत नाही. पण एवढे नक्की की, त्यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या त्यांच्या राजकीय स्पर्धक जयललिता ‘पुरच्चि तलाइवी’ असे म्हणवून घेऊ लागण्याआधीच करुणानिधी हे ‘कलैनार’ म्हणून प्रख्यात होते. त्यांच्या आधी, द्रमुकचे प्रमुख संस्थापक व सरचिटणीस अण्णादुराई हे ‘तलाइवार’ म्हणून परिचित होते. तलाइवार/ तलाइवी ही ‘नेता’ या अर्थाच्या तमिळ शब्दाची पुल्लिंगी/ स्त्रीलिंगी रूपे, पण ‘कलैनार’ यापेक्षा निराळे! त्या शब्दाने नेतेपद नव्हे, तर कलाकार असणे अधोरेखित होते. ‘कलैनार’ म्हणजे कलेचे वरदान लाभलेला, कला-वंत. तमिळ भाषेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या, कवितांपासून पटकथांपर्यंतची साहित्यनिर्मिती याच भाषेत करणाऱ्या करुणानिधींनी स्वत:ला ‘कलैनार’ म्हणवून घेणेच नेहमी पसंत केले.

पक्ष प्रमुखपदाचे अर्धशतक.. 

पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या एम. करुणानिधी यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) या पक्षाचे प्रमुखपद तब्बल ५० वर्षे भूषविण्याचा आगळावेगळा विक्रम केला होता. देशातील अन्य कोणत्याही नेत्याला एवढी संधी मिळालेली नाही.

तमिळनाडूच्या राजकारणावर पेरियार रामस्वामी, अण्णादुराई, करुणानिधी, एम. जी. रामचंद्रन आणि जे. जयललिता यांचे वर्चस्व राहिले आहे. अण्णादुराई यांनी १९४९ मध्ये द्रमुकची स्थापना केली. १९६९मध्ये अण्णादुराई यांच्या निधनानंतर द्रमुकमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला. करुणानिधी यांनी अन्य नेत्यांच्या मदतीने पक्षाचे नेतृत्व स्वत:कडे घेतले. २७ जुलै १९६९ पासून सतत ४९ वर्षे करुणानिधी हे द्रमुक पक्षाचे अध्यक्ष आहेत. गेल्याच महिन्यात करुणानिधी यांनी द्रमुकचे अध्यक्ष म्हणून ५०व्या वर्षांत पदार्पण केले. देशात अनेक राजकीय पक्ष आहेत किंवा होऊन गेले. पण सतत ५० वर्षे एकाच पक्षाचे अध्यक्षपद सांभाळण्याचा करुणानिधी यांनी आगळावेगळा विक्रम केला. द्रमुकच्या स्थापनेनंतर पक्षाच्या घटनेत ‘अध्यक्ष’ हे पदच नव्हते. अण्णादुराई हे सरचिटणीस होते. १९६०मध्ये द्रमुकमध्ये अध्यक्षपदाची तरतूद करण्यात आली. अण्णादुराई यांच्या निधनानंतर नेंदुचेळियन यांनी पक्षाची नेतृत्वे हाती घेण्याचा प्रयत्न केला, पण करुणानिधी यांनी तो हाणून पाडला.

करुणानिधी-एमजीआर संघर्ष

करुणानिधी हे चित्रपट कथाकार म्हणून प्रसिद्ध होते; तर एमजीआर किंवा एम. जी. रामचंद्रन हे आघाडीचे नायक होते. करुणानिधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे आल्यावर त्यांच्यात आणि रामचंद्रन यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. करुणानिधी हे आपली गळचेपी करतात, असा एमजीआर यांचा समज झाला. करुणानिधी हे पक्षाचे प्रमुख झाल्यावर तीनच वर्षांत एमजीआर यांनी वेगळा मार्ग पत्करला. रामचंद्रन यांना द्रमुकचा राजीनामा द्यावा लागला होता. करुणानिधी यांना आव्हान देण्यासाठीच रामचंद्रन यांनी अण्णा द्रमुक पक्षाची स्थापना केली. पुढे करुणानिधी आणि एमजीआर यांच्यात निवडणुकीच्या राजकारणात संघर्ष झाला. करुणानिधी आणि एमजीआर यांनी आलटून पालटून मुख्यमंत्रीपद भूषविले. एमजीआर यांच्या निधनानंतर त्यांची राजकीय वारस जे जयललिता आणि करुणानिधी यांच्यात संघर्ष सुरू राहिला.

कधी भाजप तर कधी काँग्रेसशी मैत्री

करुणानिधी यांच्या राजकीय विचारसरणीत कधीच एकवाक्यता नव्हती. आणीबाणीच्या विरोधात करुणानिधी यांनी भूमिका घेतली होती. यामुळे इंदिरा गांधी या सत्तेत परतल्यावर त्यांनी करुणानिधी यांचे सरकार बरखास्त केले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये द्रमुक सहभागी झाला होता. पुढे वाजपेयी सरकारचा पाठिंबा द्रमुकने काढून घेतला होता. २००४ मध्ये काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारमध्ये द्रमुक पक्ष सहभागी झाला होता. २००४ ते २०१४ या काळात द्रमुक हा काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारचा मित्र पक्ष होता. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी द्रमुकने काँग्रेसशी असलेले संबंध संपुष्टात आणले होते.

शोकसंदेश

थिरू एम. करुणानिधी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. करुणानिधी हे सार्वजनिक जीवनाचे अध्वर्यू होते. तमिळनाडू आणि भारताच्या विकासात त्यांच्याइतके योगदान खूप कमी जणांचे असेल.

– रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

कलैनार करुणानिधी यांच्या निधनाने खूप दु:ख झाले. ते भारताच्या पितामह नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या निधनाने आपण जनसामान्यांत घट्ट मुळे रुजलेला नेता, विचारवंत, थोर लेखक आणि समाजातील वंचितांच्या विकासासाठी जीवन वेचणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांनी प्रादेशिक अस्मितांसह देशाच्या विकासाचा पुरस्कार केला. तमिळ नागरिकांच्या कल्याणासाठी ते सदैव खंबीरपणे उभे राहिले आणि तमिळनाडूचा आवाज ऐकला जाईल याची खात्री केली. मला अनेक वेळा त्यांच्या भेटीची संधी मिळाली. त्यांचे धोरणविषयक आकलन आणि समाजहिताविषयीची कळकळ अजोड होती. लोकशाही मूल्यांवरील त्यांची गाढ श्रद्धा आणि आणीबाणीला केलेला विरोध कायम स्मरणात राहील.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

तमिळ जनांचे लाडके व्यक्तिमत्त्व कलाइग्नार यांनी तमिळ राजकारणाचा पट गेल्या सहा दशकांहून अधिक काळ गाजविला. त्यांच्या जाण्यामुळे देशाने एक सुपुत्र गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि या नेत्याच्या निधनानंतर शोकाकुल झालेल्या लाखो भारतीयांना माझ्याकडून सांत्वना.

– राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

कलैनार करुणानिधी यांचे निधन झालेला आज काळा दिवस आहे. तो मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

– रजनीकांत, कलाकार-राजकारणी 

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि पटकथाकार म्हणून करुणानिधी हे एक दिग्गज नेतृत्व होते. त्यांच्या अमर संवादांमधून त्यांनी द्रविडी चळवळीला आवाज प्रदान केला. त्यांच्याविना तमिळ राजकारण बदललेले असेल.

– शशी थरूर, काँग्रेस नेते

करुणानिधी यांच्या निधनाने तमिळनाडू आणि देशाचे मोठे नुकसान झाले आहे. भाजप आणि माझ्या वतीने मी त्यांना आदरांजली वाहतो.

– राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री