माढा लोकसभा मतदारसंघात भाजपअंतर्गत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील यांच्यातील सत्तासंघर्ष पेटलेला असताना त्यात शिवसेना शिंदे गटाचे  सांगोल्याचे आमदार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांनी खासदार निंबाळकर यांच्या बाजूने उतरले आहेत. यातून एकमेकांविरुद्ध कुरापती काढण्याचे प्रकार वाढले आहेत. वास्तविक पाहता कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प हा मोहिते-पाटील कुटुंबीयांच्यादृष्टीने अतिशय आस्थेचा आणि जिव्हाळयाचा विषय. त्याची मोठी राजकीय किंमत मोहिते-पाटील यांनी पूर्वी राष्ट्रवादीत असताना चुकविली आहे. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करताना दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: अकलूजच्या जाहीर सभेतच मोहिते-पाटील कुटुंबीयांविषयी आदर व्यक्त करताना त्यांच्या स्वनातील कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या पाच-दहा वर्षांत भाजपच्या काळात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासन पातळीवर फारशा हालचाली झाल्या नसल्या तरी दुसरीकडे कृष्णा-भीमा फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट या इंग्रजी नावाने हालचाली सुरू आहेत. यात मोहिते-पाटील कुटुंबीय कोठेही नाहीत. खासदार रणजितसिंह निंबाळकर हे मात्र कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प आपण मार्गी लावत असल्याचा दावा करीत आहेत. या मुद्दयावर सांगोल्याचे आमदार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील हे कृष्णा-भीमा स्थिरीकरण मोहिते-पाटील यांच्यामुळे नव्हे तर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यामुळे साकारत असल्याचा दावा करून दोन्ही गटांतील संघर्षांत भर टाकली आहे. निंबाळकर-मोहिते संघर्षांत शहाजीबापूंनी मोहिते-पाटील यांना डिवचल्यामुळे मागील सांगोला विधानसभा निवडणुकीत कसेबसे काठावर निवडून आलेल्या शहाजीबापूंना पुढील काळात मोहिते-पाटील शिंगावर घेतील आणि त्यांना त्यांच्या आवडत्या  झाडी, डोंगरातह्ण परत पाठवतील, अशा कडवट तयारीची भाषा मोहिते समर्थकांनी जाहीरपणे बोलायला सुरुवात केली आहे. 

घोडयावरून पडून गाढवावर रुसण्याचाच हा प्रकार !

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता त्याचे पडसाद जिल्हा  व तालुका पातळीवर  दिसत आहेत. सांगली जिल्ह्यातही याचे पडसाद आता दिसू लागले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार जयंत पाटील यांना ‘चेकमेट’ करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचे अजितदादांचे नातेसंबंध आहेत. मात्र, जोपर्यंत ते महापौर पदावर होते तोपर्यंत त्यांची भूमिका आ. पाटील यांच्या समर्थनाचीच होती. अगदी कालपरवापर्यंत आमचे नेते जयंत पाटील साहेबच असे ते सांगत होते. हीच भूमिका साहेबांच्या गटातून दादा गटात  जात असलेल्या कार्यकर्त्यांचीच दिसून येते. यदा कदाचित इस्लामपूरचे साहेबच बाहेर पडून दुसऱ्या पक्षात गेले तर गोची होणार हे ओळखून अनेकजण  परतीचे दोर कायम असावेत यासाठी पक्षातून बाहेर पडण्याचे कारण शहर जिल्हाध्यक्षांची कार्यपद्धती असल्याचे सांगत आहे. म्हणजे घोडयावरून पडून गाढवावर रुसण्यातलाच हा प्रकार !

kolhapur, rajekhan jamadar, satej patil, rajekhan jamadar criticses satej patil, kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, shivsena, congress, lok sabha 2024, election campaign, kolhapur news,
खासदार मंडलिक कुणाच्या नादाला लागलेले नसल्याने त्यांचा संसार टिकून; राजेखान जमादार यांची सतेज पाटील यांच्यावर घणाघाती टीका
Shinde Senas struggle in BJPs stronghold washim cm Eknath Shindes bike rally in Washim today
भाजपच्या बालेकिल्यातच शिंदे सेनेची दमछाक, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाशीममध्ये बाईक रॅली
Yavatmal Washim lok sabha seat, Bhavana Gawali, Rajshree Patil, Campaign for Mahayuti, bhavana gawali with Rajshree Patil, bhavana gawali Campaign, shivsena, lok sabha 2024, election 2024, mahayuti, yavatmal news, washim news, bhavan gawali news, marathi news,
दिल्लीवारी हुकलेल्या भावना गवळी म्हणतात, राजश्री पाटील यांना दिल्लीत पाठवा….
MLA Ganpat Gaikwads wife campaigns against Shinde attends rally with Vaishali Darekar
आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीचा शिंदेंविरोधात प्रचार, वैशाली दरेकरांसोबत रॅलीत सहभागी

उद्घाटन की लोकार्पण ?

इचलकरंजी महापालिकेसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून पाणी आणण्याची योजना प्रस्तावित आहे. त्यातून वादाचा प्रवाह वाहतो आहे. कागलमधील नेत्यांचा या योजनेला विरोध आहे. कागलचे लोकप्रतिनिधी हसन मुश्रीफ यांच्याकडे राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. ही बाब गृहीत धरून  इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नव्या वैद्यकीय चाचण्या करणाऱ्या यंत्रसामुग्री आणि काही सेवांचा शुभारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्याचे प्रशासनाने ठरवले होते. पण इचलकरंजीकरांनी मुश्रीफ यांच्या विरोधात भूमिका घेतली. काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला. पुढे नेमके काय झाले कळले नाही पण मुश्रीफ यांनी या कार्यक्रमास येण्याचे टाळल्याने तो होऊ शकला नाही.  ही कृती आंदोलनाला घाबरून केली का असा प्रश्न केल्यावर मुश्रीफ यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना बरोबर घेऊन कार्यक्रम लवकरच केला जाणार असल्याची माहिती दिली. पण, तत्पूर्वीच इचलकरंजीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी या यंत्रसामुग्रीचे उद्घाटन करण्यास भाग पाडले होते. हा मुद्दा निदर्शनास आणून दिला. त्यावर शब्दांची चलाखी करीत मुश्रीफ उत्तरले, त्यांनी केले ते उद्घाटन; आम्ही करू ते लोकार्पण !

खासदारांना दखल तरी घ्यावी लागली

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर, काही दिवसांपूर्वीच भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) आमदार संग्राम जगताप यांना जाहीर कार्यक्रमातून भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले होते. त्यासाठी त्यांनी माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचा संदर्भ दिला होता. कर्डिले हे आमदार जगताप यांचे श्वसुर आहेत. भाजप प्रवेशानंतर कर्डिले यांच्यामध्ये सुधारणा झाली, भाजप प्रवेशाचा तुम्हाला फायदाच होईल, असे खासदार विखे निमंत्रण देताना आमदार जगताप यांना दाखला दिला होता. खासदार विखे यांच्या या निमंत्रणामुळे भाजपमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याची दखल घेत आता विखे यांना आपली भूमिका बदलावी लागली.  मूळ भाजपमधील निष्ठावंत व आमदार जगताप गटात नगरमध्ये पारंपरिक वितुष्ट आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमधून व्यक्त झालेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे विखे यांना भूमिका बदलावी लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आता खासदारांना भाजपमधील प्रतिक्रियांची दखल घ्यावीशी वाटू लागली हेच महत्त्वाचे. कारण विखे-पाटील कुटुंबीय कोणत्याही पक्षात असले तरी स्वयंभू असते. यामुळेच खासदारांच्या बदलत्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते. (संकलन : दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे, एजाज हुसेन मुजावर, मोहनीराज लहाडे)