दिगंबर शिंदे

दोन वर्षे सलग करोना, पुढील वर्षी बिघडलेल्या हवामानामुळे नुकसान, तर या वर्षी सर्व काही ठीक होत असताना अखेरच्या टप्प्यावर अवकाळीने हातातोंडशी आलेले द्राक्ष पीक हातचे गेले आहे. या अवकाळीने यंदा द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणात ‘करपा’च्या विळख्यात सापडल्या आहेत. संकटाच्या या मालिकेने द्राक्ष उत्पादकांपुढे बागा जगवण्याचे आव्हान उभे केले आहे.

sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे

दोन वर्षे करोनाने द्राक्ष हंगाम नुकसानीत गेल्यानंतर गतवर्षी रेंगाळलेल्या पावसाने द्राक्षामध्ये अपेक्षित साखरच भरली नाही म्हणून ग्राहकांनी पाठ फिरवली. यंदा सर्व काही अनुकूल असताना अवकाळी पावसाबरोबरच विचित्र हवामानामुळे द्राक्ष पिकाच्या पक्वतेच्या अवस्थेत करपा या विषाणुजन्य रोगाची लागण झाली आहे. यामुळे बाजारात माल पाठविण्याच्या स्थितीत असलेल्या बागांचे २५ टक्के नुकसान झाले आहे. या नव्याने आलेल्या रोेगामुळे लाखो रुपयांचा जुगारी पिकाचा खेळखंडोबाच नको या मनस्थितीत द्राक्ष उत्पादक आला आहे.

तळहातावरचा फोड जपत तव्यावर भाकरी भाजत असताना सुगरणीच्या हातालाही दाह होतो. मात्र, घरची माणसं पोटभरून जेवावीत या इच्छेने ती त्या दाहकतेकडे दुर्लक्ष करीत आपले भाकरी भाजण्याचे नित्याचे काम करीतच असते. तसेच कधी करोनाचे चटके, कधी बाजाराचे चटके बसूनही जिल्ह्यातील जिद्दी शेतकरी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणूक करीत ग्राहकाला गोड द्राक्षे पिकवत असतात. मात्र, यंदा या दाहकतेला बसत असलेले निसर्गाचे चटके सहनच नव्हे तर उध्वस्त करणारे ठरत आहेत. कधी नव्हे ते यंदाच्या विचित्र हवामानामुळे पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत द्राक्षे रोगाच्या कचाट्यात सापडली असून यंदा तर पक्वतेच्या स्थितीतही नवीनच विषाणूजन्य रोगाचा घाला बसल्याने द्राक्ष उत्पादक पुरता कोलमडून गेला आहे. या बेभरवशाच्या द्राक्ष शेतीपासून पळ काढत असल्याचे चित्र द्राक्ष पंढरीत गावोगावी पाहण्यास मिळत आहे.

ज्या रानात मटकी, बाजरी येणार नाही अशी खोकडंफळी रानं हेच जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचे एकेकाळचे विदारक चित्र होते. १९७२ च्या दुष्काळात गर्ती समजल्या जाणाऱ्या कुटुंबातील महिलाही एकवेळच्या भुकेल्या पोटाची सोय सुकडीने होते म्हणून दुष्काळी कामावर जात होत्या. अशावेळी तासगावच्या शिवारात द्राक्ष पिकाचा प्रयोग झाला. मिरज तालुक्यातील खंडेराजुरीच्या पाचोरे बंधूने तर मडकी झाडाखाली ठेवून द्राक्ष शेतीचा प्रयोग केला. आणि त्याला बियाची असलेली ‘सिलेक्शन’ ही द्राक्षाची गोड जात बाजारात आली. तासगावच्या द्राक्ष तज्ज्ञ आर्वे यांनी द्राक्षावर संशोधन करीत इथल्या रानाला, निसर्गाला मानवतील, परवडतील अशा विकसित जाती केल्या. आजच्या स्थितीत जिल्ह्यात वेगवेगळ्या जातीची द्राक्षे पिकवली जातात. मात्र, बदलत्या निसर्गामुळे द्राक्ष शेतीच अडचणीत आली आहे.

पाण्याची उपलब्धता आठमाही पिकासाठी पुरेशी झाली की द्राक्षाची बाग लावली जाते. एकरी पाच ते सहा लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक करून द्राक्ष पिकाची उभारणी केली जाते. यात चर खुदाई, खत-मातीची व्यवस्था, ठिबक सिंचनाची सोय हे केल्यानंतर एकदा का रोपांची लागण केली की, अकरा महिन्यांनंतर पुन्हा जर वनरूट असेल तर फळाला अन्यथा, कलम केले असेल तर रिकटिंग करून मांडवाला बाग आणेपर्यंत निम्मा जीव खालीवर झालेला असतो. सोसायटीतून कर्ज मिळते, मात्र पुरेसे नसल्याने पदरमोड करून कधी उसनवारी करून बाग फळापर्यंत आणली की, पुन्हा फळछाटणीनंतर चार महिने तळहाताच्या फोडासारखे जपत व्यापाऱ्याच्या हाती माल द्यायचा आणि पैशासाठी प्रतीक्षा करायची ही अवस्था दर वर्षाचीच.

गेल्या वर्षी रेेंगाळलेल्या पावसाने द्राक्ष मण्यामध्ये अपेक्षित साखर भरलीच नाही. यामुळे बाजारात मालाकडे ग्राहकच येत नाही म्हणून व्यापाऱ्यांनी दर पाडला. अखेरच्या टप्प्यात तर दहा-पंधरा रुपये किलोने द्राक्ष घेण्यास कोणी राजी होईना अशी अवस्था झाली होती. त्याअगोदर करोनाच्या संकटामुळे सगळी बाजारपेठच ठप्प झाल्याने नाशवंत मालाचे काय करायचे याची चिंता मनाला पोखरून राहिली. आता यंदाचा हंगाम तर चांगला साथ देईल असे वाटत असतानाच नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष पिकाची अवस्था अतिदक्षता विभागातील रुग्णासारखी केली आहे.

बाजारात अगोदर माल गेला तर चार पैसे चांगले मिळतील या आशेने, मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील बरेच शेतकरी आगाप फळछाटणी घेतात. दरवर्षीची ही पध्दत आहे. हंगामाच्या सुरुवातीला जर माल तयार झाला तर चारशे रुपयांपर्यंत चार किलोच्या पेटीला दर मिळतो. माल जरी कमी निघाला तरी पैसे चांगले होत असल्याने अनेक शेतकरी आगाप छाटणीचे धाडस करतात. यंदाही या आशेने हे धाडस केले होते. ऑगस्टअखेर व सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत या छाटण्या घेण्यात आल्या होत्या. तर ऑक्टोबर छाटणी ही नियमाप्रमाणे घेतली होती. आगाप छाटणीचा माल पक्वतेच्या स्थितीत आला होता, तर ऑक्टोबर छाटणीचा माल फुलोऱ्याच्या अवस्थेत होता. यावेळीच अवकाळी पावसाने थैमान घालून सलग आठ दिवस ठाण मांडले. अवकाळीची रात्रपाळी, पहाटेचे दवबिंदू निर्माण करणारे धुके, दिवसा कधी ढगाळ तर कधी उन्हाचा कडाका अशा विचित्र हवामानाचा सर्वाधिक फटका द्राक्षाला बसला आहे.

द्राक्षावर करपा हा रोग छाटणीनंतर पहिल्या दहा ते पंधरा दिवसांपर्यंतच असतो. यानंतर फुलोऱ्यात असलेल्या द्राक्ष घडावर दावण्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर पक्वतेनंतर जर दमट हवामान असेल तर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. द्राक्ष मण्यामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली की द्राक्ष बागायतदार अल्पसा निवांतपणाचा अनुभव घेत असतो. यावर्षी मात्र निसर्गाच्या विचित्र लहरीपणामुळे घडात मणी सेटिंग होउ लागल्यापासून पाणी भरण्याच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष घडावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. हा करपा नसल्याचे सांगण्यात येत आहे. नवीनच विषाणुचा हा प्रसार असल्याचेही सांगितले जात आहे.

गेल्याच आठवड्यात पुणे येथील द्राक्ष संशोधन केंद्रातील डॉ. डी.एस. सावंत, द्राक्षतज्ञ एन.डी. पाटील आदींनी कवलापूर येथील बाधित द्राक्ष बागेची पाहणी केली. या रोगाचे पृथक्करण केल्यानंतर द्राक्ष घडावर नव्याने आलेल्या रोगामध्ये दोन प्रकारचा बुरशीजन्य करपा व बॅक्टेरियल करपा असल्याचे निदान त्यांनी केले आहे.

करप्यावरील उपाय

संशोधन केंद्राच्या अधिकृत संकेतस्थळावर यावरील उपचारही विषद करण्यात आले आहेत. यानुसार पहिली फवारणी शंभर लिटर पाण्यासाठी कोनिका १०० ग्रॅम, दुसरी फवारणी कॉन्टाप १०० मिली आणि तिसरी फवारणी व्हीपी ९६-४०० ग्रॅम एम ४५ – २०० ग्रॅम यांचे मिश्रण करून फवारणी करावी. तापमान कमी झाल्यास या रोगाचा प्रादुर्भाव नैसर्गिकरीत्या कमी होऊ शकतो. मात्र, बागेत हवा खेळती राहण्यासाठी पानांची विरळणी करावी. निर्यातीसाठी तयार केलेल्या द्राक्षासाठी प्रतिलिटर दोन मिलीप्रमाणे बॅसिलस सबटीलस अथवा ट्रायकोडर्माचा वापर कराव असे सुचविण्यात आले आहे.

यावर्षी पाऊसमान कमी असतानाही उपलब्ध पाण्यावर चांगले पीक घेतले होते. फुटवाही चांगला होता. मात्र, निसर्गाच्या लहरीमुळे विक्रीसाठी तयार झालेली द्राक्षे खराब झाल्याने व्यापारीही फिरकेना झाले आहेत. आर्थिक नुकसान तर झाले आहेच, पण नेहमीच येतो पावसाळा या प्रमाणे दरवर्षीच्या संकटामुळे द्राक्ष उत्पादनच नको अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दादासो चौगुलेखंडेराजुरी

Digambar.shinde@expressindia. com