कोल्हापूर : हिमालयाच्या कुशीत पिकणारे सफरचंद आता सह्याद्रीच्या पायथ्यालाही पिकू लागले आहे. ही किमया केली आहे यळगुळ (तालुका हातकणंगले ) येथील अनिल माणगावे या हरहुन्नरी शेतकऱ्याने. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड असलेल्या माणगावे यांनी उसाच्या पट्ट्यात सफरचंदाची शेती करण्याचे ठरवले तेव्हा त्यांना खूप कुचेष्टेला सामोरे जावे लागले. पण आता त्यांच्या शेतात रसरशीत, गोड सफरचंद पिकल्यानंतर त्यांची पाठ थोपटण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सफरचंदाची शेती फुलतेच कशी खुलते कशी हे पाहण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतामध्ये गर्दी करीत आहेत.
   
गडद लाल रंगाचे, आंबट गोड चवीचे सफरचंद सर्वानाच आवडणारे फळ. आरोग्यासाठी सफरचंद हे अत्यंत फलदायी फळ आहे. इंग्रजीत तर रोज एक सफरचंद खा आणि डॉकटर पासून दूर राहा असा निरामय सल्ला दिला जातो. वेगवेगळ्या आजारांवर सफरचंद हे गुणकारी मानले जाते. हृदय विकार, मेंदू विकार, मुतखडा, डोळ्याची दृष्टी यासाठी हे फळ उपयुक्त असते. मूळचे युरोपमधील हे फळ इतर देशांमध्ये जात जात भारतात हिमाचल प्रदेशात आले. तेथे ते अधिक प्रमाणात पिकते. तेथील थंड हवामान यासाठी पोषक आहे.  
 
काश्मीर, हिमाचलमध्ये सफरचंद पिकात होअसले तरी ते अन्य भागातही पिकवण्याचे काही प्रयत्न झाले. सफरचंद महाराष्ट्रात पिकवण्याची काही प्रयोगही झाले. यळगूड येथील अनिल माणगावे यांनी सफरचंदाची शेती करण्याचा धाडशी निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला. त्यासाठी त्यांना समाज माध्यमाने प्रवृत्त केले. फावल्या वेळेत ते शेतीतील वेगवेगळे प्रयोग यु ट्यूब या समाज माध्यमात पाहत असत. सफरचंदाची शेती याबाबतची एक चित्रफीत त्यांच्या पाहण्यात आली. ती पाहून त्यांना प्रेरणा मिळालाय आणि ठरवले की आपल्याही शेतामध्ये सफरचंद पिकवायचे. ती कशी पिकवायचे यासाठीचा त्यांनी अभ्यास सुरू केला. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज जवळ असणाऱ्या दहिगाव येथे सफरचंदाची शेती केली जाते. तेथून त्यांनी दोन वेगवेगळ्या जातींची रोपे आणली होती. त्यापासून त्यांनी अर्धा एकरामध्ये सफरचंदाची ५० झाडे लावली.

साधारणतः सफरचंदाच्या काही जातीच्या झाडांना अधिकाधिक ४५ अंश सेल्सिअस इतके तापमान चालते. कोल्हापूरमध्ये इतके अधिक तापमान नसते. शिवाय थंडीचा कालावधीही अधिक असतो. त्यामुळे सफरचंद पीक घेताना कोणतीही अडचण आली नाही, असे माणगावे सांगतात.  अण्णा आणि जी नऊ या जातीची सफरचंदाची रोपे त्यांनी आपल्या शेतात लावली. कोल्हापूरचे वातावरण सफरचंदसाठी पूरक असल्याचे त्यांची एकूण वाढ चांगल्या प्रमाणात झाली.
 
शिवाय शेतामध्ये गारवा राहावा यासाठी त्यांनी लसूण, कांदा, भुईमूग, शेवगा आदी आंतरपिके घेतली. जमिनीची धूप होणार नाही याची दक्षता घेतली. या वातावरण निर्मितीमुळे सफरचंदाचे झाडे नैसर्गिक पद्धतीने वाढू शकतील अशी शक्कल माणगावे यांनी लढवली. याचे दोन फायदे झाले. एक तर सफरचंद लागवड, खत यासाठी जो खर्च आला तो आंतरपिकाची विक्रीतून भरून निघाला. आणि शेतात आवश्यक तो गारवा राहिला.  
   
डिसेंबर महिन्यात शेतात खड्डे काढून सफरचंद रोपांची लागवड केली. सुरुवातीपासूनच शेणखत वापरण्यावर भर दिला. डिसेंबर महिन्यापासून झाडांना पाणी देणे थांबवले. त्यानंतर उगवलेल्या पिकांची पानगळ होऊन झाडांना पालवी फुटली. फुले आल्यानंतर मार्च महिन्यात फळधारणा होण्यास सुरुवात झाली. एप्रिल, मे महिन्यात झाडांना सफरचंद लागतात. केवळ सातवी पर्यंत शिकलेल्या माणगावे यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांनी लावलेल्या एका झाडाला सुमारे ३० ते ३५ फळे लागली आहेत. एका झाडापासून सुमारे पाच किलो सफरचंदाचे उत्पादन मिळाले आहे. फळाचा आकार मोठा आहे. त्याचा रंग चव हिमाचल प्रदेशातून येणाऱ्या सफरचंदासारखाच आहे. त्यामुळे हिमालयाच्या कुशीतली आणि सह्याद्रीच्या पायथ्याची माती, मातीचे गुणधर्म वेगळे असले तरी सफरचंदाचा गोडवा मात्र एकसारखाच राहिला आहे. एकूणच उसाच्या पट्ट्यामध्ये सफरचंदाचे पीक घेणेही फायदेशीर ठरू शकते असे अनुभवांती मानगावे सांगतात.

त्यांनी पिकवलेल्या सफरचंदांना बाजारात चांगली मागणी आली. पण सुरुवातीची फळे त्यांनी मित्र, नातेवाईक, शेजारी यांना देण्यात धन्यता मनाली. यापुढे सफरचंदाची शेती व्यापारी तत्वावर करण्याचा करण्याकडे त्यांचा कटाक्ष आहे. त्यांच्या या सफरचंद शेतीसाठी भावाच्या दोन मुलांनीही मदत केली आहे. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यात सफरचंद शेतीचा नवा प्रयोग मूळ धरताना दिसत आहे. माणगावे यांचा हा प्रयोग कोल्हापूर सारख्या भागातील शेतकऱ्यांना उत्तेजन देणारा, वेगळ्या वाटेनें नेणारा ठरला आहे.  ऊस एके ऊस प्रकारची शेती करणाऱ्या या पट्ट्यात वेगळे काही प्रयोग केले तर त्याला भरगोस यश येऊ शकते हे मानगावे यांच्या प्रयोगाने दाखवून दिले आहे. कमी क्षेत्र असूनही विविध पिकांची योग्य लागवड करून वर्षभर काही ना काही उत्पादन घेता येते हेही त्यांनी दाखवून दिले आहे. हवामान, जमीन व पाणी उपलब्धता याचा योग्य प्रकारे अभ्यास केला तर चौकटीच्या पल्याड जाऊन शेतीचे नवे प्रयोग कसे साकारता येतात याचाच हा वस्तूपाठ म्हणायचा. आजच्या आधुनिक शेती धोरणाशी माणगावे कुटुंबीयांनी या नव्या प्रयोगाला गवसणी घातली आहे. त्यांना मिळालेले यश अन्य तरुण शेतकऱ्यांनाही प्रेरणादायी असेच ठरले आहे.

ऊसापासून सफरचंदापर्यंत

खरे तर माणगावे यांची गावांमध्ये वडिलोपार्जित साडेतीन एकर शेती आहे. प्रामुख्याने ते ऊस शेती लागवड करत असतात. तर काही एकरामध्ये विविध प्रकारची पिके घेण्याकडे माणगावे कुटुंबीयांचा कल आहे. त्यांचे गावांमध्ये किराणा दुकान आहे.  शिवाय शेती करण्याकडेही कुटुंबीय अधिकाधिक वेळ देतात. शेतामध्ये केशर आंबा, पेरू, चिकू यासारखी फळ झाडे त्यांनी लावली आहेत. उसातून चांगले उत्पन्न मिळत असते पण तरीही काही वेगळा प्रयोग करायचा म्हणून त्यांनी सफरचंदाची लागवड केली. आणि या प्रयोगाला चांगले यश आले आहे.

dayanandlipare@gmail.com