शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाच्या राजकीय पडद्यावर अटलबिहारी वाजपेयी यांचे वेगळे स्थान होते. त्यांच्यात एक वेगळा सुसंस्कृतपणा होता. आम्ही वेगवेगळ्या पक्षांमध्ये किंवा वेगळ्या विचारसरणीचे असलो तरी त्यांनी कधीही संबंधांमध्ये अंतर पडू दिले नाही. त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. आमचे अत्यंत चांगले संबंध होते. २००१ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या भूकंपानंतर पुनर्वसनाचे काम जिकिरीचे होते. १९९३ मध्ये लातूर भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाचा अनुभव असल्यानेच वाजपेयी यांनी बोलावून घेतले. आपत्कालीन प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे काम आपल्याकडे सोपविले होते. समितीने सादर केलेल्या शिफारसीनुसार पुढे देशात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची (एनडीआरएफ) स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय प्रश्नावर ते नेहमीच विरोधी पक्षातील नेत्यांना विश्वासात घेत. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर विरोधकांशी चर्चा करीत असत. १९९८ मध्ये वाजपेयी हे पंतप्रधान असताना आपण लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावर होतो. काँग्रेस पक्षाने तेव्हा वाजपेयी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडला होता. लोकसभेत झालेल्या मतदानात वाजपेयी यांचे सरकार अवघ्या एका मताने पराभूत झाले. वाजपेयी यांना पायउतार व्हावे लागले. विरोधी पक्षनेते या नात्याने सरकारच्या पराभवाकरिता आपणच सारी व्यूहरचना आखली होती. राजीनामा द्यावा लागला त्याच रात्री वाजपेयी यांचा दूरध्वनी आला होता. पंतप्रधानपदाच्या काळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच अविश्वास ठरावावर आपण केलेल्या भाषणाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. एवढा मोठेपणा अन्य कोणत्याही नेत्याकडे क्वचितच असावा. सरकार अवघ्या एका मताने पडल्यावरही विरोधी पक्षनेत्याचे आभार मानण्याचा मोठेपणा त्यांच्यात होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp president sharad pawar pay tribute to atal bihari vajpayee
First published on: 17-08-2018 at 03:05 IST