एजाजहुसेन मुजावर
सोलापूर म्हटले, की केवळ दुष्काळ आणि ज्वारी, बाजरीसारखी दुष्काळी पिके डोळय़ांपुढे येतात. याच सोलापुरात आता सफरचंद, निळय़ा रंगाची केळी, काजू, सुपारीच्या बागा अशी अन्य पिकेही येतात. सोलापूरच्या मातीने साधलेल्या या विविधतेत आता पिस्ता शेतीची भर पडली आहे.

एकेकाळी दुष्काळाचा शाप ठरलेल्या आणि अलीकडे काही वर्षांत साखर पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात शेतकरी दररोज नवनवीन धाडशी शेतीप्रयोग करीत आहेत. यातून अनेक यशकथांची निर्मिती होत आहे. वाळवंटात पिकणाऱ्या खजुरापासून काश्मिरातील सफरचंद, व्हेनिलासारख्या आईस्क्रिमचा स्वाद देणारी निळय़ा रंगाची केळी, कोकणातील काजू, सुपारीच्या बागा ते पारंपरिक ज्वारीपासून असंख्य प्रक्रियामालापर्यंत शेतीची विविधता सोलापूरच्या मातीने साधली आहे. यातच एका शेतकऱ्याने नवनिर्मितीचा ध्यास घेत सफरचंदाबरोबरच सुक्या मेव्यापैकी महत्त्वाचा घटक असलेल्या चक्क पिस्त्याची शेती यशस्वी केली आहे. यातून मजूर टंचाईवर मात करताना त्यावरील वाढत्या खर्चाला उत्तरही शोधले आहे. स्थानिक आणि आसपासच्या शेतकऱ्यांसाठी ही पिस्ता शेती जणू प्रयोगशाळा ठरली आहे.

सोलापूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मोहोळ तालुक्यातील पापरी गावात बळीराम राऊ भोसले यांच्या पिस्त्याच्या अभिनव शेतीविषयी प्रचंड कुतूहल असलेल्या शेतकऱ्यांची पापरी गावी गर्दी होत आहे.

बळीराम भोसले हे अल्पशिक्षित शेतकरी. परंतु शेतीवर प्रचंड निष्ठा. डोळस नजरेतून केवळ आजूबाजूचीच नव्हे तर दूरच्या उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब ते थेट काश्मीरमधील शेतीप्रयोग पाहण्याची इच्छा आणि त्यातून अनुकरणाचा ध्यास आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर शेती करण्याकडे वाटचाल, हीच भोसले यांची बाजू दिशादर्शक ठरते. पूर्वीच्या कोरडवाहू शेतीमध्ये हळूहळू सुधारणा करून बळीराम भोसले यांनी काही प्रयोग हाती घेतले. त्यात काहीवेळा यश आले तर काहीवेळा अडचणी. प्रयोग फसला की आसपासचे शेतकरी हसून चेष्टा करायचे. त्याची तमा न बाळगता तेवढय़ाच जिद्दीने, नव्या उमेदीने बळीराम भोसले यांनी अंगी बाळगलेले शेतीप्रयोगाचे वेड सोडले नाही. सुरुवातीला दहा एकर क्षेत्रात कोकणातील हापूस आणि केशर आंब्याची बाग निर्माण केली. ही बाग आज उत्तमप्रकारे बहरली आहे. आंबा बागेत आंतरपीक घेऊन शेतीवरील आर्थिक गुंतवणुकीचा भार कमी केला. त्यातूनच नवीन प्रेरणा घेत त्यांनी चक्क सफरचंदाची शेती करण्याचे ठरविले. सुमारे दीड एकर क्षेत्रात सफरचंदाची बाग सध्या फुलून गेली असून उत्पादन सुरू झाले आहे. सफरचंदाच्या पाठोपाठ भोसले यांनी चक्क पिस्त्याची शेती करण्याचा ध्यास घेतला. पिस्ता शेती सुरू करून आजघडीला चार वर्षे झाली. पिस्त्याचा पहिला बहार आला असता तो बाजारात विकायला न नेता भोसले यांनी आसपासच्या शेतकऱ्यांना, पै-पाहुण्यांना प्रेमाने खाऊ घातला. त्यातून त्यांच्या उत्कृष्ट दर्जाच्या पिस्ता शेतीची महती हळूहळू दूपर्यंत पसरली आहे. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही उत्सुकतेपोटी बळीराम साठे यांच्या पिस्ता शेतीप्रयोगाला भेट देऊन माहिती घेतली आणि अकलूजमध्ये स्वत:ची पिस्ता शेती करण्यासाठी पाऊल उचलले आहे. हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.

बळीराम भोसले यांच्या मध्यम प्रतीच्या शेतजमिनीत पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर प्रत्यक्ष पिकांना वेळोवेळी नियोजनाप्रमाणे पाणी देण्यासाठी अर्थात वीजपुरवठा महत्त्वाचा होता. दररोज कमी दाबाने आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ावर भोसले यांनी उपाय शोधला. स्वत:च्या शेतात सौरऊर्जा प्रकल्प उभारून वीज समस्या कायमची मिटवली आहे. शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जोखीम पत्करून रात्री-अपरात्री जावे लागत नाही. विजेसाठी एक पैशाचे बिलही भरावे लागत नाही. यातून भोसले यांची डोळस दृष्टी दिसून येते.

खरे तर ज्या त्या भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीनुसार म्हणजे हवामान, पाणी, जमितीची प्रत बघूनच शेती करणे रास्त ठरते. परंतु यापैकी एखाददुसरा पोषक घटक विचारात घेऊन नवनवीन शेतीप्रयोग करण्याचे धाडस वाढले असताना बळीराम भोसले यांनी सफरचंदाच्या यशस्वी शेतीपाठोपाठ पिस्ता शेतीचा ध्यास घेताना यू टय़ूबवरील पूरक माहिती जाणून घेतली. पिस्ता शेतीसाठी अतिथंड हवामानाबरोबरच अतिउष्ण हवामान असावे लागते. या भौगोलिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून भोसले यांनी आपल्या गावशिवारातही असेच भौगोलिक वातावरण असल्यामुळे त्यांनी पिस्ता शेती करण्याचा निर्णय घेतला आणि दूरवरच्या उत्तर प्रदेशातील साहरनपूरच्या एका नर्सरीशी संपर्क साधला. तेथून पिस्त्याची ४० रोपे आ?नलाइन खरेदी केली. प्रत्येकी दोनशे रुपये दराने खरेदी केलेल्या पिस्ता रोपांची १५ गुंठे क्षेत्रात लागवड केली. ही सर्व रोपे शंभर टक्के जिवंत राहून यशस्वी झाली आहेत.

माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करताना यू टय़ूबच्या आधारे बळीराम भोसले यांनी शेतात पिस्ता रोपांची लागवड केली. त्यासाठी हलक्या आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत १२ फूट बाय १४ फूट अंतरावर खोल खड्डा मारून त्यात रोप लागवड केली. त्यावर देखभालीचा जास्त खर्च झाला नाही. शेणखताचा वापर करून रोपे वाढवली. एकेका झाडाला ठरवून २० लिटर पाणी ठिबक सिंचनाद्वारे दिले. मात्र ठिबक सिंचन झाडाजवळ फूटभर अंतर ठेवले. कोणतीही औषध फवारणी केली नाही. मजूरही लागले नाहीत. तीन वर्षांनंतर पिस्ता झाडांना फुलोरा आला. पहिल्यांदाच बहार आल्यानंतर एकेका झाडावर एक किलो पिस्ता मिळाला. हा पहिलाच बहार असल्याने शेती संस्कृतीप्रमाणे उत्पादित पिस्ता पै-पाहुणे, शेतकऱ्यांना मोफत दिला. यंदा मार्चमध्ये पिस्ता झाडांना दुसरा बहार आला आहे. पुढे दीड महिना बहार चालतो आणि जून-जुलैपर्यंत पिस्ता बाजारात विकता येतो. पुढे एकेका झाडातून १० किलोपर्यंत पिस्ता तयार होतो. त्यानंतर १०-१२ वर्षांनी झाड आणखी वाढते आणि एका झाडामागे पिस्ता उत्पादन तेवढय़ाच जोमाने घेता येते. पिस्ता झाड ६० ते ७० वर्षांपर्यंत टिकून राहते. बळीराम भोसले यांच्या सांगण्यानुसार एकरी ४०० पिस्ता झाडे लावून वार्षिक चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेता येते. जगात पिस्त्याचे मूळ उगम तुर्की, इराण, सिरिया, लेबना?न, दक्षिण रशिया आणि अफगाणिस्तानात मानले जाते. इटली, क?ॅलिफोर्निया आदी भागात पिस्त्याची लागवड होते. पिस्त्याचे भिन्न प्रकार ज्या त्या देशांच्या नावाने ओळखले जात असताना पिस्ता हे नाव मूळ इराणी भाषेतून आले आहे. पिस्त्याच्या वंशात एकूण दहा वाण आहेत. त्यापैकी भारतात केरमन, चिको, पीटर, रेड अलेपो आणि जोली या नावाचे वाण आढळून येतात. भारतात इराण, आफगाणिस्तानमधून पिस्त्याची आयात होते. काश्मीरसह उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणाच्या काही भागांत पिस्त्याची शेती होते. परंतु आता राकट दगडांच्या देशात अर्थात महाराष्ट्रातही पिस्ता शेतीचे प्रयोग होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतात आईस्क्रिमसारखे थंड पदार्थ केवळ उन्हाळी हंगामात नव्हे वर्षांतील बारा महिने खाल्ले जातात. आईस्क्रिमसह श्रीखंड, मिठाई, खीर, आदी खाद्य पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी सुक्या मेव्यासह चवीला उत्तम ठरणाऱ्या पिस्त्याचा वापर वाढत आहे. मुखशुध्दीसाठी पिस्ता खारवून, भाजून खातात. पिस्त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. पिस्त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आयर्न, कॅल्शियम, प्रथिने इत्यादी अनेक पोषक तत्त्वे आढळतात ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. पिस्ता खाल्ल्याने चयापचय वाढते. सर्दी आणि इतर आजारांपासून वाचवण्यास मदत करते. शारीरिक वजन घटविणे, रक्तातील घातक कोलेस्ट्रॉल कमी करणे, हृदय, त्वचा, डोळे, केस आणि नखांसाठी देखील पिस्ता खूप फायदेशीर मानला जातो. यामुळे पिस्त्याला सर्वत्र वर्षभर मागणी राहाते.