अनिरुद्ध आयरे
तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..
मी वाचलेल्या माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी स्टिफन कॉवे यांच्या ‘द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ या पुस्तकातली ही ओळ मला पटली आहे म्हणण्यापेक्षा मी ती जगलो आहे असं म्हणेन. या ओळीचा संदर्भ आजकालच्या तरुणाईमधल्या एकमेकांसोबतच्या नात्यांमध्ये दिसून येतो. हल्ली मुलंमुली खूप स्वकेंद्रित झाली आहेत. ही गोष्ट त्यांच्या प्रगतीसाठी निश्चितच चांगली असेल किंवा नसेलही. मात्र ते त्यांच्यावर आहे अवलंबून आहे. माणूस म्हटलं की कुठे तरी मर्यादा येतेच कारण माणसांत काही गोष्टींचा अतिरेक झाला की त्यांचा स्वभाव स्वार्थाकडे आणि अहंकाराकडे वळत जातो. त्याची सुरुवात अपेक्षा ठेवण्यापासून होते. आजकालची तरुण मुलं प्रमाणापेक्षा अपेक्षा ठेवतात. त्यांच्या रिलेशनशिपमध्ये जोडीदाराशी, घरी आई-बाबांशी, बाहेर नोकरीच्या ठिकाणी मित्रमैत्रिणींशी.. प्रत्येकाकडून अपेक्षा असतात. समोरच्या व्यक्तीने आपल्याला समजून घ्यावं अशी आपली अपेक्षा असते मात्र समोरच्या व्यक्तीचं काय मत असेल याचा विचारच केला जात नाही. सगळ्यांना गृहीत धरलं जातं आणि मग एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर चिडचिड सुरू होते. या ओळीत आपण हेच शिकायचंय की काहीही झालं तरी संयम महत्त्वाचा आहे जो आजच्या तरुणांमध्ये नाही. एखादी गोष्ट लवकरात लवकर वाट्टेल ते करून मिळालीच पाहिजे या हट्टामुळे गैरसमजही वाढतात. आत्मसन्मान म्हणजेच ‘सेल्फ रिस्पेक्ट’च्या बाबतीतही हेच घडतं. तरुण मुलं फार स्वाभिमानी असतातच परंतु आत्मसन्मानाच्या नावाखाली केव्हा त्यांचा अहंकार वाढेल हे काहीच सांगता येत नाही. मग हेवा, तिरस्कार अशा भावना ओघानेच स्पर्धा निर्माण करतात. इथे एक बाब कदाचित त्यांना कळत नसावी ती म्हणजे अहंकार आला की ‘सॉरी’ हा शब्द त्यांच्या शब्दकोशातून नाहीसा होतो कारण सॉरी म्हणणं म्हणजे त्यांना कमीपणाचं वाटतं. पण सॉरी म्हणून जर एखादं नातं तुटण्यापासून वाचत असेल तर बोलायला काय हरकत आहे? इतकी साधी गोष्ट त्यांना पटवून देणंही अवघड होऊन बसलंय. स्टीफन कॉवे यांचे इतकंच म्हणणं आहे की जर नातं जपायचं असेल तर भावनांचा विचार करा, संभावनांचा नाही. संयम ठेवला पाहिजे तो फारच महत्त्वाचा आहे आणि आजच्या धगधगत्या घडीला तर सर्वात जास्त!
viva@expressindia.com