इन फॅक्ट, अशा पारंपरिक साजात नटणाऱ्या मुलींवर ‘काकूबाई’ स्टाइल असा शिक्का बसायचा; पण परिस्थिती बदलली आहे आता. एथनिक ड्रेसवर नथ किंवा नथनी घालायची आता फॅशन आली आहे. वेगवेगळ्या फॅशन्सची बिंदीसुद्धा सध्या ट्रेण्डमध्ये आहे.
खरं तर या ट्रेण्डला सुरुवात झाली गेल्या वर्षीपासूनच. म्हणजे गेल्या वर्षीदेखील काही तरी हटके या नावाखाली काही फॅशन डिझायनर्सनी आपल्या मॉडेल्सना रॅम्पवर उतरताना नथ किंवा नथनी घालायला लावली. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फॅशन शोमध्येही हा प्रकार बघायला मिळाला. आपल्याच देशात नाही तर परदेशातसुद्धा ही एथनिक भारतीय स्टाइल म्हणून नथनीची फॅशन गाजली. एकदा ही फॅशन रॅम्पवर उतरल्यावर याकडे ‘नवीन फॅशन’ म्हणून जगाचं लक्ष गेलं.
ही फॅशन अधोरेखित करताना आपला एथनिक इंडियन लूक जपण्यासाठी गेल्या वर्षी अभिनेत्री विद्या बालननं फ्रान्समधल्या कान महोत्सवात जाताना नथनी घातली होती. भारतामधल्या एका फॅशन शोमध्ये सोनम कपूरनंही मोठय़ा खडय़ांची नथनी घालून स्टाइल स्टेटमेंट केलं होतं. जुही चावलादेखील एका फॅशन शोदरम्यान रॅम्पवर मराठमोळी नथ घालून अवतरली.
हल्ली रॅम्पवरची स्टाइल बाजारात यायला वेळ लागत नाही. त्या न्यायानं बाजारपेठेनंदेखील या स्टाइलची दखल घेतली. आता पुन्हा एकदा आपल्याकडच्या बाजारात म्हणूनच नथ आणि नथनीला मागणी आली आहे. अनेक ब्रॅण्डेड ज्वेलरीच्या दुकानांमधून पारंपरिक तसंच आधुनिक स्टाइलच्या नथ आणि नथनीचं कलेक्शन दिसतं. नथनीबरोबरच बिंदीदेखील पुन्हा एकदा फॅशनमध्ये आली आहे. केवळ मोठय़ा समारंभांमध्ये आणि तेही उत्सवमूर्तीपैकी एक असेल तरच पूर्वी मुली बिंदी घालायच्या. आता मात्र बिंदी हेवी ज्वेलरीमध्ये नाही, तर कॅज्युअल ज्वेलरीमध्येदेखील मोडली जातेय. अर्थात त्याला आता बिंदी नाही, तर मांगटिका म्हणतात. मांगटिका आता सर्वमान्य फॅशनचा एक भाग झाला आहे.
तीच कथा कपाळावरच्या टिकलीची. कुंकू किंवा टिकली ही मधल्या काळात भारतीय फॅशनच्या पटावरून पार फेकली गेली होती. विशेषत: आपल्याकडे वेस्टर्न वेअरचं प्रमाण वाढलं आणि टिकली हद्दपार झाली. वेस्टर्न वेअरवर कुंकू किंवा टिकली सूट होत नाही. त्यामुळे हे सौंदर्य आभूषण थेट हद्दपार झालं होतं. आता पुन्हा एकदा टिकलीला फॅशनेबल करण्याची जबाबदारी रॅम्पवरच्या मॉडेल्सनी घेतली आहे. यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमधल्या अनेक शोमध्ये मॉडेल्स कपाळावर टिकली लावून अवतरल्या. साधीच गोल टिकली त्यांनी फॅशनेबल करून टाकली. फॅशन फिरून परत येते, असं म्हणतात. सध्याच्या पारंपरिक बाजाची फॅशन बघता हेच पुन्हा जाणवतेय.