महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपी करणाऱ्या केवळ ३५६ विद्यार्थ्यांंवर कारवाई करण्यात आल्याचा शिक्षण मंडळाचा दावा असला तरी प्रत्यक्षात मात्र मोठय़ा प्रमाणात कॉपी बहाद्दर पकडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. बारावीच्या परीक्षेत सर्वात जास्त गडचिरोलीत ८९ कॉपीबहाद्दर पकडण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत कॉपीमध्ये विदर्भाचे प्रमाण सर्वात जास्त असल्यामुळे यावर्षी कमीतकमी आकडेवारी राज्य मंडळाला दाखवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असे शिक्षण वर्तुळात बोलले जात आहे.
बारावीची परीक्षा २२ फेब्रुवारीपासून, तर दहावीची ३ मार्चपासून सुरू झाली आहे. बारावीचे चार ते पाच आणि दहावीचे आठ पेपर शिल्लक आहेत. त्यामुळे कॉपीबहाद्दरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बारावी आणि दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून विविध जिल्ह्य़ात भरारी पथक पाठविण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत कॉपीबहाद्दर मोठय़ा प्रमाणात सापडत असले तरी यावर्षी मात्र प्रमाण बरेच कमी झाले आहे. ही मंडळाने विद्याथ्यार्ंमध्ये केलेली जागृती आहे की बदनामी नको म्हणून कमीतकमी संख्या प्रसार माध्यमांना सांगायची नवीन पद्धत आहे? गोंदियात सर्वात जास्त संवेदनशील केंद्र असताना त्या ठिकाणी मात्र कॉपीचे प्रमाण खूपच कमी दाखवण्यात आले. शिवाय, वर्धामध्ये काही केंद्रावर पोलिसांदेखत शाळांमध्ये कॉपी पुरवण्याचे प्रकार सुरू होते.  
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कॉपीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे त्या भागात भरारी पथकाशिवाय बैठे पथक पाठविण्यात आले होते. यावर्षी कॉपीबाबत मंडळाने ग्रामीण भागातील मुख्याध्यापक व केंद्राधिकाऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन जागृती करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ग्रामीण भागात काही कॉपीचे प्रकार उघडकीस आले. बारावी आणि दहावीत जी केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली होती त्या केंद्रांवर कडक बंदोबस्त असताना मोठय़ा प्रमाणात कॉपीचे प्रकार आढळून आले आहेत. बारावीच्या परीक्षेत गोंदियात ४७, भंडारात २५, नागपूर ६८, चंद्रपूर ४१, वध्र्यात ४८ कॉपी बहाद्दरांना पकडण्यात आले. दहावीचे तीन पेपर झाले असून केवळ सहा जिल्ह्य़ात ३८ विद्यार्थ्यांंना कॉपी करताना पकडण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. या संदर्भात शिक्षण मंडळाचे सचिव पारधी म्हणाले, गोंदिया जिल्हा सोडला तर अन्य जिल्ह्य़ात गेल्या वर्षांच्या तुलनेत कॉपीचे प्रमाण कमी झाले आहे. विद्यार्थ्यांंमध्ये जागृती झाली असून आणि मंडळाने कॉपी संदर्भात कडक धोरण केले असल्यामुळे कॉपीचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकार रोखण्यासाठी मंडळाने व्यवस्था केली होती. त्याउपरही काही केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.