जिल्हय़ात लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढतच चालली असून, सरकारी कामकाजातील भ्रष्टाचार कमी होण्यासाठी प्रभावी जनजागृती होणे क्रमप्राप्त ठरले आहे. गेल्या ८ महिन्यांत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दोन फौजदारांसह वरिष्ठ श्रेणीतील दोन, कनिष्ठ श्रेणीतील तीन अशा १५ अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक म्हणून हरीष खेडकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोठय़ा संख्येने अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले. सरकारी काम करून घेण्यासाठी लाच देण्यात व घेण्यात कोणालाच गर वाटत नाही, अशा पद्धतीने व्यवहार केले जातात. या पाश्र्वभूमीवर लाचलुचपत विभागाने केलेली ही कामगिरी उल्लेखनीय ठरते. पथकाने ८ महिन्यांत १५ कारवाया करताना ५०० ते ५० हजार रुपयांपर्यंत लाच घेताना तलाठी, ग्रामसेवकापासून वरिष्ठ व कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांसह शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दोन फौजदार व अंमळनेर पोलीस ठाण्यातील हवालदाराला पकडण्यात आले.
लाचखोरीत पोलीस, महसूल व ग्रामविकास विभाग अग्रेसर आहे. एकाच पोलीस ठाण्याच्या दोन फौजदारांवर लाचलुचपत विभागाची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सेवानिवृत्त तलाठी व खासगी व्यक्तीही लाचखोरीत सापडल्याने महसूल व ग्रामविकासच्या कारभारातील खासगी व्यक्तींची घुसखोरी या निमित्ताने समोर आली आहे.