अस्वच्छ गटारी, तुंबलेल्या नाली यांनी भरलेल्या नगर शहरात चक्क २१ दुर्मिळ प्रजातींचे १४२ वृक्ष आहेत. त्यांचे संगोपन करण्याचा व आणखी दुर्मिळ जातींचे वृक्ष शहरात लावण्याचा निर्णय मनपाने घेतला.
मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. आयुक्त विजय कुलकर्णी यांनी हरियाली या संस्थेला शहरातील दुर्मिळ प्रजातींच्या वृक्षांची गणना करण्यास सांगितले होते. त्यांनी संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करून २१ दुर्मिळ जातींचे वृक्ष शोधले. तसा अहवाल वृक्ष प्राधिकरणाच्या समितीत जाहीर केला. समितीने या अहवालाला मान्यता दिली व आहे त्या वृक्षांची जोपासना करण्याचा, तसेच आणखी वृक्ष लावण्याचा निर्णय घेतला. वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी सूचवण्यात आलेल्या विविध उपायांवर समितीत चर्चा झाली व त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे ठरण्यात आले.
वसुंधरा महोत्सवात शहरामध्ये लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. ते मिळाले नाही तर लागवड झालेल्या वृक्षांची रोपे तग धरणार नाहीत व उद्दीष्टपूर्ती होणार नाही असे समितीचे सदस्य सुरेश खामकर यांनी सदस्यांच्या निदर्शनास आणले. यासाठी दरवर्षी लागवड झालेले वृक्ष, त्यातील जगले किती, मेले किती, कशामुळे असे सविस्तर ऑडिट करावे, अशी सूचना खामकर यांनी केली. असे ऑडिट करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
वाहतुकीला अडथळे ठरणारे, तसेच धोकादायक झालेले वृक्ष तोडण्याची परवानगी मिळावी यासाठी आलेल्या अर्जांवर चर्चा होऊन त्यावरही निर्णय घेण्यात आले. बेकायदा वृक्षतोड प्रकरणात मनपाकडून कायदेशीर कारवाई होत नाही, अशी तक्रार सदस्यांनी केली. कोणालाही पाठीशी न घालता दोषी आढणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करावी, असे यावेळी प्रशासनाला सांगण्यात आले. बैठकीला अशासकीय सदस्य मालनताई ढोणे, प्रा. बी. एन. शिंदे, मंदार साबळे, नगररचनाकार विश्वनाथ दहे, सहायक आयुक्त संजीव परशरामे, मनपा शिक्षण मंडळाचे पठाण आदी उपस्थित होते.