मत्रिणीला घरी सोडताना तिच्या गालाचे चुंबन घेऊन तिला निरोप देणाऱ्या कबीर सरूप या तरुणावर सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याचा आरोप ठेवत गेल्या वर्षी पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र आपण कुठलेही असभ्य वर्तन केले नसल्याचे सांगत कबीरने पोलिसांच्या या निर्णयाला आव्हान दिले. त्यात तो यशस्वीही झाला. सार्वजनिक ठिकाणी कबीरने असभ्य वर्तन केले, असा कुठलाही पुरावा पुढे न आल्याचे स्पष्ट करीत महानगरदंडाधिकाऱ्यांनी त्याला निर्दोष ठरवताना पोलिसांना चपराक लगावली. कबीरकडून वसूल केलेला १२०० रुपयांचा दंडही परत करण्याचे आदेश दिले. या घटनेमुळे पोलिसांच्या ‘मोरल पोलिसिंग’वर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे. यासंदर्भात जुना कायदा आणि बदललेला काळ यामुळे हा गोंधळ उडत असून काळानुसार कायद्यात बदल करण्याची गरज कायदेतज्ज्ञांनी बोलून दाखवली.
‘मोरल पोलिसिंग’च्या नावाखाली पोलीस अक्षरश मनमानी करीत आहेत, असे अॅड. हेमंत केंजाळकर यांना वाटते. ‘बॉम्बे पोलीस अॅक्ट’ने पोलिसांना वाटेल तसे अधिकार बहाल केल्याने त्याच्या नावाखाली आपल्याला मनमानी करण्याचा परवानाच मिळालेला आहे, अशा अविर्भावात ते वावरत असतात. कबीर सरूप प्रकरण हे त्याचेच उदाहरण आहे. ‘बॉम्बे पोलीस अॅक्ट’ हा जुना कायदा आहे. त्यातील काही तरतुदी या काळानुसार, परिस्थितीनुसार बदलण्याची गरज आहे. पोलीसही कायद्यातील तरतुदींचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावून कारवाई करीत असल्याचे केंजाळकर यांचे म्हणणे आहे. सार्वजनिक ठिकाणी अमूक एक असभ्य वर्तन करीत आहे, अशी तक्रार नागरिकांनी करायला हवी. त्याची दखल घेत मग पोलिसांनी कारवाई करायला हवी. परंतु कायद्याचे हत्यार हाती असल्याने कुणी तक्रार करण्याआधीच ‘मोरल पोलिसिंग’च्या नावाखाली पोलीस कारवाई करतात. परंतु जेथे कायद्याने दिलेल्या अधिकारांचा प्रभावीपणे वापर करायला हवा, तेथे मात्र पोलीस हातावर हात धरून गप्प बसतात, असा आक्षेप केंजाळकर यांनी घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तनाबाबतच्या बॉम्बे पोलीस कायद्यातील कलम ११० या तरतुदीत काळानुसार बदल करायला हवा आणि लोकांना असभ्य वाटले तरच पोलिसांनी कारवाई करावी, अशी त्याची व्याख्या करायला हवी, असेही केंजाळकर म्हणाले.
अॅड. मनीषा तुळपुळे यांनीही कबीर सरूपप्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले. बॉम्बे पोलीस कायद्याने पोलिसांना अशाप्रकारे चुकीची कारवाई करण्याचा अधिकारच दिलेला आहे. या कायद्याच्या आधारे पोलीस लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. गुडबाय किस वा मित्र-मत्रिणी भेटल्यावर गळाभेट ही आजच्या पिढीची पद्धत आहे. त्याला कुणी असभ्य वर्तन ठरवू शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी असभ्यतेची व्याख्या व्यक्तीसापेक्ष बदलत असते. कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी ‘असभ्य वर्तन’ म्हणजे ते केले जात असल्याची तक्रार लोकांकडून येणे. पण जर संबंधित मुलीची वा अन्य कुणाची तक्रार नसेल, तर पोलिसांनी कारवाई का करावी, असा प्रश्नही तुळपुळे यांनी उपस्थित केला. एखाद्याला आक्षेपार्ह वाटणारी बाब दुसऱ्याला आक्षेपार्ह वाटेलच असे नाही. परंतु पोलीस कायद्याच्या या तरतुदींचा चुकीचा अर्थ काढून सरसकट कारवाई करीत असल्याचे त्यांनी म्हटले.
अॅड. उदय वारुंजीकर यांनी याबाबत सांगितले की, कायदा हा समाजाचा आरसा असतो. त्यामुळे जेव्हा समाजामध्ये घडणाऱ्या कृत्यांना नियंत्रित वा प्रतिबंधित करताना कायदा कमी पडतो तेव्हा त्यात दुरुस्ती करणे आवश्यक बनते. सार्वजनिक ठिकाणी असभ्यपणे वागण्याच्या संदर्भातील कायदा हा देखील काळानुरूप बदलण्याची गरज आहे. सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे पोलिसांनी ही कारवाई केली असावी, असे या प्रकरणावरून दिसून येते. परंतु प्रत्येक कारवाई कायद्याच्या चौकटीत सिद्ध करणे शक्य नसते. त्यामुळे अनेकदा न्यायाधीशांनादेखील आरोपींना सोडून देण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे कायदा, अंमलबजावणी करणारी यंत्रणा आणि समाजमन या तिघांनाही अशा घटनांच्या बाबतीत गांभीर्याने चिंतन करून नवीन दिशा ठरवली पाहिजे. अन्यथा कायदा आणि अंमलबजावणी करणारी यंत्रणा यांचे हसे होण्याची भीती आहे, असेही अॅड्. वारुंजीकर यांनी सांगितले.
सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी मुला-मुलीने आलिंगन देणे, चुंबन घेणे अथवा प्रेम प्रगट करणे हे असभ्य वर्तन मानायचे का, असा प्रश्न अलीकडेच कबीर सरूप या तरुणाला याच कारणावरून पोलिसांनी दंड केल्यामुळे उद्भवला. न्यायालयाने त्याला निर्दोष मानत सोडून दिले असले तरी हा प्रश्न संपलेला नाही. सभ्य-असभ्यतेच्या कल्पना काळानुसार बदलत असतात. त्यानुसार कायद्यांमध्ये बदल व्हायला हवेत ही अपेक्षा वाजवीच आहे. परंतु त्याचबरोबर आलिंगन, चुंबन या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी ठेवताना आपला समाज, आपल्या नितीअनितीच्या कल्पना, सभ्यतेचे सर्वमान्य संकेत यांचेही भान ठेवण्याची आवश्यकता आहे. तरुणाईला मोकळीक मिळायलाच हवी, परंतु या स्वातंत्र्यालाही चौकट हवीच!
‘आक्षेपार्ह नसेल पण सामाजिक व संस्कृतीत बसत नाही’
कायद्याच्या दृष्टीने जाहीरपणे चुंबन घेणे आक्षेपार्ह नसले तरी आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेत ते बसत नाही. त्यामुळे असे वर्तन आक्षेपार्ह आहे. सध्या मुले आणि मुली यांच्यातील अती मोकळेपणाच्या संस्कृतीला प्रसारमाध्यमांबरोबरच पालकही तितकेच जबाबदार आहेत. मर्यादा किंवा लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही, हे प्रत्येकाला समजले पाहिजे. आपल्याकडे लैंगिक शिक्षणाचाही अभाव आहे. हा विषय वज्र्य समजला जातो. खरे तर पालकांनी आपल्या पाल्याला विश्वासात घेऊन तो योग्य वयाचा झाल्यानंतर त्याला हे सर्व समजावून सांगितले पाहिजे. मूल वयात येण्यापूर्वी त्याला लैंगिक शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. पालक, शाळा आणि महाविद्यालय स्तरावर याचे शिक्षण मिळावे. लहानपणी आपल्यावर झालेले संस्कार, शिकवण याचा तसेच सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांचाही विसर पडू देऊ नये. ते अबाधित ठेवावेत.
प्रा. सुरेश कवाणे,
मानसशास्त्र विभाग प्रमुख, के. वि. पेंढरकर महाविद्यालय,डोंबिवली
यात असभ्य ते काय?
शारीरिक जवळीकीबद्दल आताच्या पिढीत जास्त मोकळीक आहे. एखाद्याला मिठी मारणे किंवा अगदी मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या गालांवर ओठ टेकवणे, या सध्याच्या ‘प्लेझण्टरीज’ आहेत. त्यात असभ्य असे काहीच नाही. मात्र एक गोष्ट नक्की की, आम्हीही स्थलकालाचे भान बाळगायला हवे. आजूबाजूला लहान मुले असतील, तर त्यांच्यावर नक्कीच परिणाम होतो. त्यामुळे तरुणाईने थोडय़ा जबाबदारीने या मोकळीकीचा वापर करायला हवा. पण यात पोलिसांनी कारवाई करावी, असे काहीच नव्हते, हेदेखील तेवढेच खरे.
नेहा शिंदे सोमय्या महाविद्यालय
प्रेम तुमच्यापर्यंतच ठेवा!
आमच्या पिढीला स्वातंत्र्याचा ओव्हरडोस झाला आहे. अनेकदा जास्त मोकळीक मिळाल्यानंतर त्याचा गैरफायदा घेतला जातो. आमच्या बाबतीतही नेमके तेच झाले आहे. तुमच्यात कितीही जवळीक असू दे, ती तुमच्यापर्यंतच ठेवा ना! कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जरुरीपेक्षा जास्त जवळीक कशाला करायची? एखादा अनुचित प्रकार घडला की, पोलीस काहीच करत नसल्याची टीका होते. मग काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली, तर कुठे बिघडले? पोलिसांनी केलेल्या कारवाईचे मी नक्कीच समर्थन करेन.
सुप्रिया चव्हाण, ठाकूर महाविद्यालय, कांदिवली
‘असभ्य वर्तणुकी’ची व्याख्या व्यक्तिसापेक्ष!
या सगळ्याच प्रकरणाला काय म्हणावे, हेच कळत नाही. मुळात ‘असभ्य वर्तणुकी’ची व्याख्या व्यक्तिसापेक्ष आहे. आता बँडस्टँडसारख्या ठिकाणी अशा गोष्टी सर्रास घडतात. पोलिसांनी या आधी कधीच कोणावरही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. आजकाल आमची पिढी सकाळी महाविद्यालयात भेटल्यावरही एकमेकांना मिठी मारूनच दिवसाची सुरुवात करते. त्यामुळे आमच्यासाठी मिठी मारणे, ही गोष्ट शुल्लक आहे. दोन सज्ञान व्यक्ती अशी गोष्ट करत असतील, तर इतरांनी त्याला हरकत घेण्याचा प्रश्नच येत नाही. आता या गोष्टी चव्हाटय़ावर न करण्याचे भान सज्ञान व्यक्तींनी बाळगायलाच हवे. अशा गोष्टी जाहीरपणे केल्यावर इतरही त्यांचे अनुकरण करतील. मग त्या वेळी जबाबदारी कोणाची?
कौस्तुभ बांबरकर रुईया महाविद्यालय
ही खूप छोटी गोष्ट!
माझ्या मते पोलिसांनी एवढय़ा शुल्लक गोष्टीसाठी आपला वेळ आणि श्रम वाया घालवण्याची गरज नव्हती. अगदी कायद्याप्रमाणे बघायला गेले, तर मुलांची चूक आहे. पण दुसऱ्या बाजूला इतर देशांपेक्षा आपल्याकडे याबाबत खूपच मर्यादा सांभाळल्या जातात. भारत खूपच परंपरावादी आणि सांस्कृतिकदृष्टय़ा वरचढ आहे. महासत्ता बनण्याच्या गोष्टी करणाऱ्यांनी अशा शुल्लक गोष्टींकडे जास्त लक्ष देता कामा नये. पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडले असते, तरी भागण्यासारखे होते.
अश्विनी शिंदे, ठाकूर महाविद्यालय, कांदिवली.
पोलिसांची वर्तणूक पटली नाही!
कायद्याने सज्ञान असलेल्या दोन व्यक्तींनी काय करावे, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्यात बँडस्टँड, मरिन ड्राइव्ह अशा ठिकाणी या गोष्टी सर्रास होतात. आता या गोष्टींना असभ्य वर्तणूक म्हणण्याऐवजी मला पोलिसांचेच वर्तन पटत नाही. दोघांपैकी कोणालाच आक्षेप नव्हता, तर पोलिसांनी हस्तक्षेप करण्याची गरजच नव्हती. त्यात ‘असभ्य वर्तणूक’वगैरे काहीच नाही. आजकाल आम्हा तरुणांमध्ये एकमेकांना मिठी मारणे, हा प्रकार अत्यंत सर्रास होतो. या मुलांवर कारवाई करणारे पोलीस बॉलिवूडच्या पाटर्य़ाकडे कसे दुर्लक्ष करतात?
विक्रांत पांडे रुईया महाविद्यालय