जिल्ह्य़ातील प्रत्येक गावात बीएसएनएल मोबाइलची सेवा आणि सुविधा पोहचवावी, असे प्रतिपादन खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. दूरसंचार सल्लागार समितीच्या द्वितीय बैठकीत ते बोलत होते. खा. प्रतापदादा सोनवणे, बीएसएनएलचे वरिष्ठ महाप्रबंधक प्रवीण मल्होत्रा, तसेच दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य बैठकीला उपस्थित होते.
खा. चव्हाण आणि खा. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत बीएसएनएलची लँडलाइन, इंटरनेट, ब्रॉडबॅण्ड, मोबाइलची रेंज व त्यामुळे ग्राहकांची होणारी गैरसोय, कर्मचाऱ्यांची वर्तणूक या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत शिवाजी पाटील (मालेगाव), काळू सोनवणे (सटाणा), दादासाहेब जाधव (मालेगाव), अरुण मेढे (त्र्यंबकेश्वर), निवृत्ती डावरे (कोनांबे, सिन्नर), डॉ. मनोज हिरे (मालेगाव), मनोज दिवटे (येवला), प्रभाकर पवार (कळवण), शरद कुटे (सायखेडा), विजय गिते (आंबेगाव, ता. येवला), महेंद्र देशपांडे (नाशिक) यांनी सहभाग घेतला. स्वागत अतिरिक्त महाप्रबंधक नितीन महाजन यांनी केले. महाप्रबंधक प्रवीण मल्होत्रा यांनी नाशिक दूरसंचारच्या प्रगतीचा आढावा घेतला.
पुढील काळात नाशिक जिल्ह्य़ातील शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यास तत्पर असल्याचे सांगितले. साहाय्यक महाप्रबंधक (ग्राहक सेवा) डी. एम. रामटेके यांनी आभार मानले. विजय गोळेसर यांनी सूत्रसंचालन केले.