वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वे प्रवाशांच्या सेवेत नेमकी कधी येणार याचे उत्तर हा प्रकल्प राबवणाऱ्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’कडेही नसले तरी मुंबईतील ही पहिली मेट्रो रेल्वे सुरक्षित असावी यासाठी चोख व्यवस्था करण्यात येत आहे. मेट्रोच्या स्थानकांवरील हालचाली, संशयास्पद व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील दक्षता पथक नेमण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वेच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे ‘मुंबई सुरक्षा पथक’ आणि स्थानिक पोलिसांच्या संपर्कात राहून हे दक्षता पथक कार्यरत राहील.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो रेल्वे मार्गाची एकूण लांबी ११.४० किलोमीटर आहे. मेट्रोला रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळाले आहे. आता मेट्रोच्या डब्यांसाठी रेल्वे बोर्डाच्या मान्यतेची प्रतीक्षा सुरू आहे. त्यानंतर मेट्रो रेल्वे मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमवीर मेट्रोच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी विविध पातळीवर सज्जता ठेवण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून मेट्रो स्थानकांवरील संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक स्थानकावर दक्षता पथकाचे दोन कर्मचारी तैनात केले जातील. त्यापैकी एक पुरुष असेल व दुसरी महिला. हे दोघे स्थानक व आसपासच्या परिसरात नजर ठेवतील. संशयास्पद हालचाली आढळल्यास त्या व्यक्तींची माहिती सुरक्षा यंत्रणेला देतील आणि परिस्थितीनुसार त्यांना ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांच्या हवाली करतील.
याचबरोबर मेट्रो स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे, धावत्या गाडीतील प्रत्येक डब्यातील घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी त्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अशी सज्जता असणार आहे. असे ७०० सीसीटीव्ही कॅमेरे मेट्रो रेल्वेत असणार आहेत. तसेच याच सुरक्षा यंत्रणेचा भाग म्हणून मेट्रोच्या सर्व १२ स्थानकांवर प्रत्येक एक श्वानपथक तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे स्फोटके, हत्यारे घेऊन कोणीही प्रवास करू शकणार नाही शिवाय स्थानकावर ती ठेवणे शक्य होणार नाही. त्याचबरोबर प्रवाशांच्या झटपट तपासणीसाठी ‘हँड हेल्ड एक्स्प्लोजिव्ह डिटेक्टर’ही असणार आहेत.