येथील स्वातंत्र्यसेनानी विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठानचे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार कवी दा. सु. वैद्य, स्वातंत्र्यसेनानी काशिनाथ कुलकर्णी व शुभांगी गोखले यांना प्रदान करण्यात आले. सेलू येथील स्वातंत्र्यसेनानी विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविले जाते. वसमतचे आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
सामाजिक क्षेत्रासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक काशिनाथराव कुलकर्णी, साहित्य क्षेत्रासाठी दा. सु. वैद्य, कला क्षेत्रासाठी शुभांगी गोखले यांचा गौरव करण्यात आला. आमदार सतीश चव्हाण, द. रा. मेडेकर, अ‍ॅड. अनंतराव कौसडीकर, माणिकचंद बिनायके यांची या वेळी उपस्थिती होती.
स्वातंत्र्यसेनानींच्या योगदानामुळेच निजामाचा पराभव होऊन मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला. त्यामुळे हे कार्य मोलाचे आहे, असे मत मान्यवरांनी या वेळी व्यक्त केले. स्वातंत्र्यसेनानींच्या कार्याचे महत्त्व अमर राहावे, या साठी चारठाणकर प्रतिष्ठान प्रयत्न करीत असल्याचे वर्षां देशपांडे यांनी या वेळी सांगितले. प्रतिष्ठानचे अ‍ॅड. श्रीकांत वाईकर यांनी आभार मानले. प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला.