डेंग्यू व मलेरियासदृश रोगांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी मनमाड नगर परिषदेने कंबर कसली असून शहरात विविध भागांत स्वच्छता मोहीम तसेच धूरफवारणी यंत्राद्वारे डासांचा नायनाट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील सर्व भागांत ही मोहीम पुढील आठ दिवस सुरू राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिली.

मनमाड शहरात डेंग्यूचे सात रुग्ण आढळल्यानंतर व काहींना लागण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच नगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रभावीपणे कामाला लागली आहे. नगरपालिकेतील कचरा उचलण्याचे ट्रॅक्टर्स, घंटा गाडय़ा, कचराकुंडय़ा यांच्यासह साफसफाई कामगारांद्वारे शहर कचरामुक्त करण्याची मोहीम सुरू झाली आहे. शहराला प्रामुख्याने सध्या आठ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. दररोजच्या पिण्याचे व वापरण्याचे पाणी नागरिक घरात साठवून ठेवतात, मात्र अनेकदा त्यावर झाकण नसते. अशा साठवलेल्या उघडय़ा स्वच्छ पाण्यावर डेंग्यूच्या अळ्यांची वाढ होते असे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छ घरातील पाण्याचे साठे झाकून ठेवावेत तसेच बाहेर उघडय़ावर कोठेही स्वच्छ पाणी साठलेले आढळणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच कचरा हा गटारीत न टाकता कुंडय़ांमध्येच टाकावा, असे आवाहन नगराध्यक्ष पाटील व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांनी केले आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचे विशेष मलेरिया निर्मूलन पथक त्या त्या भागांतील नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून प्रत्येक प्रभाग व वॉर्डाची सफाई मोहीम सध्या जोरदारपणे सुरू आहे. कचऱ्याचे ढिगारे व तुंबलेल्या गटारी स्वच्छ करण्याची मोहीमसुद्धा युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. तरीही नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी तातडीने पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता यामुळे मलेरियासदृश रोगांची लागण व डेंग्यूची साथ शहरात निर्माण झाली असून त्यावर नियंत्रण ठेवण्यात यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख संतोष बळीद यांनी केला आहे.
शहरात साथीच्या रोगाने धुमाकूळ घातला असून सर्वसामान्य जनतेच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सध्याचे मुख्याधिकारी हे भुजबळांच्या दावणीला बांधलेले असून त्यांचे सगळे लक्ष येवल्याकडे असताना मनमाडची प्रभारी सूत्रे त्यांच्याकडे आहेत. मात्र येथे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही, असा आरोपही बळीद यांनी केला. अखेर शिवसेनेने स्वखर्चाने मलेरिया प्रतिबंधक औषध फवारणी सुरू केली असल्याचे बळीद म्हणाले.