पुणे शहराच्या पर्यावरण अहवालाबाबतचे आक्षेप आता नागरिकांना जाहीरपणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपुढे मांडता येणार आहेत. आक्षेप घेण्यासाठी नागरिक  आणि अधिकारी यांच्यात वाद-संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यातून समोर येणाऱ्या मुद्दय़ांच्या आधारे नवा अहवाल तयार करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांनी दिले आहे. नागरिक आणि अधिकारी यांच्यातील वाद-संवाद कार्यक्रमाचे आयोजन १५ डिसेंबर रोजी ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या प्रबोध सभागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळात करण्यात आले आहे. प्रज्ञा शिदोरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.  पुणे शहराचा पर्यावरण अहवाल मंजूर झाल्यानंतर या अहवालाच्या परिपूर्णतेविषयी वाद उपस्थित केले जाऊ लागले आहेत. हा अहवाल शहराचे काल्पनिक चित्र रंगवीत असून त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी लपवून ठेवल्या गेल्याचा आक्षेपही काही संस्था- संघटनांकडून घेतला जात आहे.  काही नागरिकांनी झुरमुरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता, अहवालाविषयीचे मतभेद जाहीर वाद-संवादाद्वारे सोडविले जावेत, असा उपाय समोर आला. त्यातून अशा प्रकारचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला