तालुका गटविकास अधिका-यांच्या दालनातील समता अधिकार आंदोलन समितीचे ठिय्या आंदोलन बुधवारी तिस-या दिवशीही सुरूच होते. आंदोलन तीव्र करण्यासाठी मंगळवारी नगर-सोलापूर रस्त्यावर मिरजगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र आजही कोणताच तोडगा निघू शकला नाही. संघटनेच्या मागण्यांवर कार्यवाही होईपर्यंत आंदोलन न सोडण्याचा निर्धार अंकुशराव भैलुमे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पंचायत समितीत आज सभापती, उपसभापती या पदाधिका-यांसह कोणीच अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे ही पंचायत समिती रामभरोसेच चालते अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत सदस्य सचिन घुले, विजय घालमे, भाऊ तोरडमल, भास्कर भैलुमे, गोदड समुद्र, महेश अखाडे, महेंद्र हिरवे, आशा वाघ, बाळासाहेब उबाळे, राखी सावंत आदी या वेळी उपस्थित होते.
भैलुमे म्हणाले, पंचायत समितीकडे अधिकारी व पदाधिका-यांचे दुर्लक्ष काळजीत टाकणारे आहे. पाणीपुरवठा विभागाचा अधिकारी सतत गायब असतो, तर तालुका आरोग्य अधिकारी व त्याच्या कार्यालयातील अनेक कर्मचारी हजर नाहीत. पदाधिकारीही येथे केवळ शोभेसाठी आहेत. सभापतींच्या दालनात कोणी नसताना लाईट-पंखे सुरू असतात. या संस्थेचा कारभार कसा चालतो याचेच हे द्योतक आहे.