बाळासाहेब विखे यांचा सवाल
नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पूर्वी दुष्काळी जनतेचा आवाज बनत होती, आता हा आवाज का बुजला, तो का उठत नाही, असा आक्षेप घेतानाच माजी खासदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी जिल्ह्य़ातील दुष्काळी जनतेचे दु:ख पक्षीय मतभेद, गट-तट विसरुन एका सूर-तालात मांडले जात नाही, याबद्दलही तीव्र नापसंती व्यक्त केली.
विखे यांनी आज दिवसभर नगर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत दुष्काळी परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव व गोरक्षनाथ गाडिलकर यांच्याकडे त्यांनी पाणी, चारा, छावण्या, रोहयोची कामे यासंदर्भातील प्रश्न मांडले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, पक्षाचे तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, युवकचे अध्यक्ष राहुल झावरे, बन्सीभाऊ म्हस्के, माजी आमदार बाळासाहेब नागवडे, दत्ता नारळे तसेच विविध गावांतील पदाधिकारी, खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ऐन दुष्काळात सरकारने दुधाचे दर कमी केले, यातून दुष्काळी भाग वगळावा, नळ पाणी योजना झाली तरी वाढत्या लोकसंख्येमुळे ती पुरत नाही, तेथे टँकरने पुरवठा करावा, थकित चालू बील भरले तरी योजनांचा वीजपुरवठा सुरु करावा, टँकर वेळेवर येत नसल्याने लोकांचा रोहयोवरील दर बुडतो आहे, मागणी तेथे जनावरांसाठी छावण्या सुरु कराव्यात, परप्रांतातून चारा आणण्याचे नियोजन आताच करावे, मागेल त्याला काम उपलब्ध करावे, छावण्यांतील मजुरांना रोहयोतून वेतन द्यावे, छावण्यांत इतरांनी घोटाळे केले असल्यास इतरांचे पेमेंट अडवून धरण्याचे कारण नाही आदी मागण्या व सूचना त्यांनी केल्या.    
लोकसभा लढवणार नाही!
दुष्काळी दौऱ्यांमुळे तुम्ही आगामी लोकसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा होऊ लागली आहे, याकडे लक्ष वेधले असता, विखे यांनी त्यास जोरदार हरकत घेतली, अजिबात लढवणार नाही, असे स्पष्ट करत ते म्हणाले, मी लोकांचे प्रश्न मांडत असताना, तुम्हाला राजकारण कसे सुचते, याच राजकारणात सध्या रोज दुष्काळ मरतो आहे, प्रश्न बाजूला पडत आहेत. पुढाऱ्यांनीही प्रश्न टांगून ठेवले आहेत, कृपा करा आणि त्याला खतपाणी घालू नका.
‘पारनेर रोहयोत दलाल’
पारनेर तालुक्यात रोहयोच्या कामात दलाल निर्माण झाले आहेत, असा आरोप करताना त्यांनी चौकशीची मागणी केली. काही ठिकाणी कुटुंबातील प्रत्येकाला जॉब कार्ड दिले गेले तर काही ठिकाणी कुटुंबाला एक जॉब कार्ड दिले गेले आहे, कुटुंबाच्या नावाने जॉब कार्ड देताना घरातील एकच काम करतो आणि इतर चौघे रिकामे फिरतात, प्रत्यक्षात वेतन मात्र सर्वाचे काढले जाते, नगर तालुक्यात अनेकांकडे आधार कार्ड नसल्याने त्यांना कामे नाकारली जात आहेत, याकडे विखे यांनी लक्ष वेधले.