होळीच्या दिवशी दर्याचा राजा असलेले कोळी बांधव मच्छीमारी बोटी सजवून त्या समुद्रात बंदराशेजारीच घिरटय़ा मारून बोटीवरच रंगाची उधळण करीत नाचत, गाणी गात आनंदाने कुटुंबीयांसोबत होळी साजरी करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही जतन करीत भर समुद्रातच होळी साजरी केली. होळी हा तसा देशात मोठय़ा प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. मात्र या सणाला कोळी व आगरी समाजात वेगळेच स्थान आहे. विशेषत: समुद्रकिनारी वास्तव्य करणाऱ्यांसाठी हा सण महत्त्वाचा आहे. रायगड जिल्ह्य़ातील उरण व अलिबाग तालुक्यातील मच्छीमारांची महत्त्वाची बंदरे असलेल्या करंजा व रेवस या दोन्ही बंदरातील कोळी समाजाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यानुसार होळीच्या सणाच्या आदल्या दिवशीच मच्छीमार बोटी समुद्रातून किनाऱ्यावर आणल्या जातात. त्यांची सफाई करून त्यांना रंगरंगोटी केली जाते. पताका बांधून व साडय़ांच्या झालरी लावून बोटीला सजविले जाते. बोटीवर डी.जे. स्पीकरचीही सोय केली जाते. त्याचप्रमाणे पंधरा ते वीस किलो वजनाचे मोठे मासे बोटीच्या समोर नवेद्य म्हणून बांधले जातात. सायंकाळी या माश्यांचा प्रसाद गावकऱ्यांना वाटण्यात येतो. त्यांची पूजा करून बोटीला मान म्हणून बांधण्याचीही प्रथा आहे. यासाठी मासे खरेदी करावे लागले तरी चालतात, मात्र मान म्हणून हा मासा बांधला जात असल्याचीही माहिती कोंढरी येथील आकाश भोईर यांनी दिली.