बोगस दस्तावेज आणि बनावट लेखे करून शासनाचा सव्वा चौदा कोटी रुपयांचा कर बुडविणे आणि महाराष्ट्र मुल्यवर्धित कर नियमांचे उल्लंघन करणे, या आरोपाखाली वणी पोलिसांनी आदिलाबाद येथील कोटय़धीश जी.एस. मिल ऑईल कंपनीच्या तीन संचालकांना आणि त्यांच्या एका दिवाणजीला अटक केली आहे. या सर्व आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
यवतमाळ येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, आंध्रच्या आदिलाबाद येथील अग्रवाल बंधूंची वणी येथील भालर रोडवर गौरी शंकर (जी.एस.) ऑईल मिल आहे. यात सोयाबीनवर प्रक्रिया करून तेल आणि इतर उत्पादने घेतली जातात. या कंपनीने निर्माण केलेले सोयाबीनचे तेल देशभर विकले जाते. कंपनीने खोटे दस्तावेज आणि लेखे सादर करून सरकारचा १४ कोटी १५ लाख रुपयांचा कर बुडवला, अशी तक्रार विक्रीकर उपायुक्त टी.के. पाचारणे यांनी केली आहे. ११ जुलै २०१२ ला वणी पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या या तक्रारीचा शोध घेताना आरोपींना पकडण्यासाठी आदिलाबादला गेलेले पोलीस अनेकदा परत आलेले होते. कारण, या प्रकरणातील आरोपी मनोज अग्रवाल, अजय अग्रवाल, उमेश अग्रवाल हे फरार असल्याचे पोलीस निरीक्षक एस.के. अंभोरे यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे, आपल्या विरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द व्हावेत, एफ.आय.आर. सुद्धा रद्द करण्यात यावा आणि आपल्याला जामीन मिळावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आरोपींनी दाखल केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या, मात्र त्यासाठी छत्तीस वेळा पोलिसांना उच्च न्यायालयात तारखांवर आपली बाजू मांडावी लागली. आरोपींच्या याचिका फेटाळल्यानंतर वणी पोलिसांनी आदिलाबादला जाऊन तीनही आरोपींना अटक करून वणीत आणले. आरोपींना मारेगावच्या न्यायालयात प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आल्यावर त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
उल्लेखनीय म्हणजे, आंध्रात कोटय़वधीचा कापसाचा धंदा असलेल्या आणि जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचे मालक असलेल्या गौरीशंकर अग्रवाल यांच्या नावाने वणीत जी.एस.ऑईल मिल असून त्यांची मनोज, अजय आणि उमेश ही मुले ऑईल मिलचे संचालक आहेत. मनोज अग्रवालला तर पोलिसांनी तो बाथरूममध्ये लपून बसलेला असतानाच अटक केली. या प्रकरणातील विशेष महत्वाची बाब अशी की, या संचालकांसोबत त्यांचा दिवाणजी असलेला संतोष झिलपीलवार यालाही अटक करण्यात आली आहे. कारण, त्याच्या नावाने अग्रवाल बंधूंनी एक बोगस कंपनी स्थापन करून संतोषला त्याचे संचालकपद दिले आहे. या घटनेने आंध्र आणि विदर्भात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.