जीवघेण्या वेदनेची कळ विसरून जगण्याला बळ देण्याचा विचार देणारी, उपहास मांडत असताना चिंतनशील असणारी आणि विनोदाची झालर नाचवत असली तरी, तत्त्वज्ञानासह प्रचंड गांभीर्य असणारी विविधांगी गझल उस्मानाबादकरांनी अनुभवली. नववर्षांच्या पूर्वसंध्येला संडे कल्चर उपक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ, लोक प्रतिष्ठान, सरस भारत अकादमी, निर्मिती बहुउद्देशीय संस्था, जागृती सामाजिक व सांस्कृतिक मंडळ आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने या मफलीचे आयोजन करण्यात आले होते.
गझलकार वैभव देशमुख (पुणे), सतीश दराडे (अकोला) तर गझल गायक प्रा. राहुलदेव कदम (परभणी) यांनी उस्मानाबादकरांना गझलोत्सवाची अनुभूती मिळवून दिली.
मंदिरापाशीच िहसाचार झाला,
देव नसतो आज साक्षात्कार झाला,
रंग कर्जाने दिला शेतास आम्ही,
देश मग टीव्हीत हिरवागार झाला.
ही गझल अकोला येथील सतीश दराडे यांनी सादर केली.  शेतकऱ्यांच्या वेदना आपल्या गझलमधून व्यक्त करताना सतीश दराडे यांनी
ना सुखी प्राणी, ना चारा वाढतो,
फक्त हल्ली शेतसारा वाढतो,
नेहमी झाकून कुपी ठेवू नये,
अत्तराचा कोंडमारा वाढतो,
या वेदना व्यक्त केल्या.
कवी वैभव देशमुख यांनी
कुठे पक्षी कुठे झाडी,
कुठे तेथे झरे आता,
जिथे भेटायचो आपण,
तिथे झाली घरे आता
या शहरीकरणावर व वृक्षवल्लीवर होणाऱ्या काँक्रीट अतिक्रमणावर नेमके बोट ठेवले. त्यासोबतच त्यांनी
पुढे सरू की मागे, काय करू
द्विधा द्विधा या हृदयाचे काय करू,
तिफन थांबवून विचार करतो आहे मी,
पेरू की खाऊ हे दाणे, काय करू,
या वैभव देशमुख यांच्याच रचनेने शेतकऱ्यांच्या फाटक्या अर्थकारणाचे मर्म विशद केले.
प्रा. कदम यांनी आपल्या सुरेल आवाजात शेखर गिरी यांची  ‘हवा वाहताना जरा काळजी घे’ आणि रवींद्र केसकर यांची ‘काळजाला जाळतो हा पावसाळा’ या गझल सादर केल्या. संतोष नारायणकर यांनी सादर केलेली
जराशी भेट तू गळ्याला,
बरे वाटेल या खुळ्याला
 ही रचना दाद देऊन गेली.
या मफलीतच देगलूरचे एनोद्दीन वारसी यांची बासरी प्रत्येक वेळी टाळ्यांची मानकरी ठरली. बासरीच्या आवाजात त्यांनी सादर केलेला राग पहाडी प्रचंड दाद मिळवून गेला.
डॉ. स्मिता शहापूरकर यांनी प्रास्ताविक केले. दौलत निपाणीकर यांनी संडे कल्चरची भूमिका मांडली. अॅड. राज कुलकर्णी यांनी कवींचा परिचय करून दिला. पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत आडसुळ, मसापचे नितीन तावडे, माधव इंगळे, इनरव्हील क्लबच्या मेहता यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कवी रवींद्र केसकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.