अनादी काळापासून, अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शिर्डीपासून अंदाजे २० कि.मी. अंतरावर कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठी असलेल्या ‘संवत्सर-कोकमठाण’ या दोन गावांदरम्यान येत्या १३ मे पासून ५ दिवसांचे ‘गोफण-गुंडा’ नावाचे (दगडाचे) युद्ध खेळले जाते. ही प्रथा अतिशय जुनी आहे. हे युद्ध बंद करण्यासाठी ब्रिटिश राजवटीपासून आतापर्यंत खूप प्रयत्न झाले परंतु त्याचा काडीमात्र उपयोग झाला नाही. उलटपक्षी या युद्धाची आख्यायिका गावोगाव पसरत राहिली.
दक्षिण गंगा काशी मानल्या गेलेल्या गोदावरी नदीच्या तिरावर नगर जिल्ह्य़ातील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर तर दुसऱ्या  तिरावर कुंकुंमस्थान (कोकमठाण) ही गावे वसली आहेत. या दोन्ही गावांच्या दरम्यान दगड युद्धाची परंपरा असलेले युद्ध खेळले जाते. गोफण या अस्त्राने दगड मारून प्रतिपक्षास पराभूत करणे हीच मुख्यत्वे भावना असते.
 नदीपात्राच्या मधोमध हे युद्ध अक्षयतृतीयेपासून ५ दिवस दररोज सायंकाळी ४ वा. सुरू होऊन सूर्यास्तापर्यंत चालते. युद्ध थांबावे यासाठी कोणीही एका पक्षाने पांढरे निशाण वर करून दाखविणे हा या युद्धबंदीचा संकेत होय. तद्नंतर दोन्ही गावातील मंडळी खेळाडू आपआपल्या दैवतांचा म्हसोबा की जय, लक्ष्मी माता की जय असे म्हणत घरी परततात. गावातील प्रतिष्ठित पुढारी पट्टीचे खेळाडू या खेळात हिरीरिने भाग घेतात त्यामुळे साहजिकच सर्वाना स्फुरण चढते. हे युद्ध बंद करण्यासाठी ब्रिटिशकाळापासून तर आताच्या शासनाच्या वतीने बरेचे प्रयत्न झाले परंतु त्यात त्यांना अपयश आले. ब्रिटिश काळात तर अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागले. काही वेळेस तर पोलीस अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी चोप दिल्याचे ऐकिवात आहे. सन १९९६ मध्ये गोफणगुंडा लढाईचे झी टीव्हीच्या वतीने चित्रीकरण करण्यात आले होते. ते जगात दाखविण्यात आले त्यामुळे असंख्य ज्ञात-अज्ञात प्रेषकांना याची माहिती मिळाली व साऱ्या जगात गोफण गुंडा युद्ध काय आहे हे सर्वाना माहीत झाले. त्यामुळे संवत्सर कोकमठाण ही गावे जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहचली. या गोफण गुंडय़ासाठी पूर्वी तीन-तीन महिने अगोदर तयारी होत असे. वेळप्रसंगी गोफण गुंडय़ाकरिता ट्रॅक्टरने खडी आणू टाकली जात असे. ५ व्या दिवशी या खेळाची सांगता सत्यनारायण महापूजेने होऊन महाप्रसाद ग्रहण केला जातो. या प्रसंगाला अनुसरून ग. ल. ठोकळ यांनी गोफण-गुंडा नावाची कादंबरी लिहिलेली आहे.