विभागाचा निकाल ८८.७१ टक्के
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत नाशिक विभागाचा ८८.७१ टक्के निकाल लागला असून गतवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी उत्तीर्णतेत आघाडी घेतली. विभागात उत्तीर्णतेत धुळे जिल्ह्याने (८९.६५) प्रथम क्रमांकष तर जळगाव जिल्हा (८८.२९) पिछाडीवर राहिला. नाशिक जिल्ह्याची ८८.५६ टक्केवारी आहे. पुनर्परीक्षार्थीच्या (जुना अभ्यासक्रम) परीक्षेचा विभागातील निकाल ३२.३८ टक्के लागला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक नाशिक विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजता केवळ मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी शहरातील सायबर कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. यंदा नियमित परीक्षार्थी अर्थात नवीन अभ्यासक्रमाची टक्केवारी ८८.७१ आहे. त्यात नाशिक ८८.५६, धुळे ८९.६५, जळगाव ८८.२९ तर नंदुरबार जिल्ह्यात ८९.१६ टक्के आहे. विभागातील ७५१ कनिष्ठ महाविलयांतील १,३३,१४० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु त्यातील १७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही. विभागातून एक लाख ३२ हजार ९६१ प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एक लाख १७ हजार ९४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
जुन्या अभ्यासक्रमातील पुनर्परीक्षार्थीची उत्तीर्णतेची टक्केवारी ३२.३८ आहे. त्यात नाशिक जिल्हा (३५.५५) आघाडीवर असून नंदुरबार (२५.६३) पिछाडीवर आहे. धुळे (२६.५९) तर जळगावची (३०.८३) टक्केवारी आहे. या परीक्षेसाठी विभागातून १३ हजार ४९४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील ४३६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाल्यावर बहुतांश विद्यार्थ्यांनी त्याची प्रतही काढून घेतली. सायबर कॅफेचालकांनी निकाल व प्रत यासाठी २० ते २५ रुपये आकारून आपली चांदी करून घेतली. विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकांचे वाटप कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत १० जून रोजी अकरा वाजता केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यावर २० जूनपर्यंत मंडळाकडे अर्ज सादर करावा, असे सूचित करण्यात आले. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१४ मध्ये घेण्यात येणाऱ्या
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. त्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण
झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी-गुणसुधार योजनेंतर्गत सप्टेंबर-ऑक्टोबर २०१४ आणि मार्च २०१५ अशा दोन संधी उपलब्ध असल्याचे मंडळाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी म्हटले आहे.
उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकालानंतर २१ जून २०१४ पर्यंत अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची प्रथम छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी शुल्क भरून अर्ज सादर करावेत, असे मंडळाने म्हटले आहे.

मुलींची आघाडी
गतवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात उत्तीर्णतेत मुलींचे वर्चस्व राहिले. नाशिक विभागात ७६,३०६ मुले, तर ५६,६५५ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यात ६५,५८९ मुले तर ५२,३६० मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.९६, तर मुलींचे प्रमाण ९२.४२ टक्के आहे.

विज्ञान वरचढ, कला शाखा पिछाडीवर
बारावीच्या परीक्षेत विभागात उत्तीर्णतेच्या प्रमाणात विज्ञान शाखा वरचढ ठरली, तर कला शाखा पिछाडीवर राहिली. विज्ञान शाखेची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे ९४.८२ टक्के आहे. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा क्रमांक असून त्यांची ९१.४४ टक्केवारी आहे. कला शाखेची ही टक्केवारी केवळ ८३.३८, तर एमसीव्हीसी शाखेची ८४.७४ आहे.
नवीन अभ्यासक्रमात अधिक गैरप्रकार
बारावीच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत नवीन अभ्यासक्रमाच्या परीक्षेत नाशिक विभागात अधिक गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन अभ्यासक्रमात १३२ तर जुन्या अभ्यासक्रमात आठ गैरमार्ग प्रकरणे प्राप्त झाली होती. चौकशीअंती नवीन अभ्यासक्रमातील ८७ व जुन्या अभ्यासक्रमातील आठ विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यात आली आहे. त्यात नवीन अभ्यासक्रमातील नाशिकचे ३६, धुळे २६, जळगाव ५० व नंदुरबारच्या २०, तर जुन्या अभ्यासक्रमातील धुळ्याचे दोन, जळगाव पाच, तर नंदुरबारच्या एका विद्यार्थ्यांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे.