कर्जतचे प्रांताधिकारी संदीप कोकडे व प्रभारी तहसीलदार जैससिंग भैसडे हे दुष्काळाच्या नावाखाली पक्षीय राजकारण करीत आहेत, या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करताना कर्जत तालुक्याची अब्रु राज्याच्या वेशीबाहेर टांगली असा गंभीर आरोप भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी आज पंचायत समितीच्या सभागृहातील टंचाई बैठकीत करत या दोन्ही अधिकाऱ्यांचा निषेध केला व सुरू झालेली टंचाई आढावा बैठक मध्येच रद्द केली.
या संदर्भात केद्र सरकारला अहवाल पाठवताना या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडू असा इशाराही गांधी यांनी दिला. बैठकीस पक्षाचे तालुकाघ्यक्ष कैलास शेवाळे, सभापती सोनाली बोराटे, उपसभापती किरण ढोबेपाटील, अल्लाउदीन काझी, प्रसाद ढोकरीकर, बापुराव नेटके, बिभीषण खोसे, गणेश मुळीक, गटविकास अधिकारी कुलकर्णी, तसेच विविध
गावांचे सरंपच, उपसरंपच उपस्थित होते.
बैठकीपुर्वीे खा. गांधी यांनी मिरजगांव गटातील अनेक गांवाना व छावण्यांना भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे महसूल अधिकाऱ्यांविरूध्द अनेक तक्रारी केल्या. बैठकच्या प्रारंभीच शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी रोहयोची कामे, टँकर व पाणी टंचाई, जनावरांच्या चारा असे प्रश्न उपस्थित केले मात्र उत्तर देण्यासाठी प्रांताधिकारी व प्रभारी तहसीलदार गैरहजर होते. लोक काम मागतात, मात्र अधिकारी कामे सुरू करण्यास चालढकल करीत आहेत असा आरोपही अनेकांनी केला. गांधी यांनी प्रत्येक विभागाला किती कामे सेल्फवर आहेत याची माहिती घेतली, मात्र कामे कधी सुरू करणार यावर अधिकारी गप्प होते.
अधिकाऱ्यांविरुद्धच्या या तक्रारींमुळे गांधी संतप्त झाले. पुर्व सुचना देऊनही प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहीले आहेत, केंद्र सरकार दुष्काळ निवारणासाठी पैसे देते तरीही अधिकारी बैठकीला येत नाहीत. तालुक्यातील अधिकारी दुष्काळाबाबत गंभीर नाहीत. त्यांच्यात समन्यवय नाही, या अधिकाऱ्यांना वेळ काढूपणा केल्यास लोक व जनावरे उपाशी मरतील, याबाबत आपण केंद्र सरकाला अहवाल पाठवणार आहोत, असे सांगताना गांधी यांनी बैठकच रद्द केली.