बनावट कागदपत्रांच्या आधारे लेआऊट टाकण्याच्या मोठय़ा गैरव्यवहारात आता नवाच प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एका शेतमालकास अटक झाली असून भूमाफि या फ रार झाला आहे.
बनावट कागदपत्रे सादर करून लेआऊट विकण्याचा गोरखधंदा जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याचे अनेक प्रकरणात यापूर्वीच निदर्शनास आले आहे. अशा अनेक बनावट प्रकरणांची माहिती लोकसत्तातून वेळोवेळी चव्हाटय़ावर आणण्यात आल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले, पण तरीही भूमाफि यांची फ सवेगिरी संपत नसल्याचे दिसून आले आहे. वध्र्यालगत एका शेताचा सौदा शेतमालक शालिग्राम गेडाम यांनी लेआऊटमालक रवी बारहाते (रामनगर, वर्धा) यांच्याशी केला. ६० लाख रुपयाच्या या खरेदी व्यवहारात शेतमालकास २० हजार रुपये ईसार म्हणून देण्यात आले. त्याने सर्व व्यवहार खरा असल्याचे लेआऊटमालक बारहाते यांना लिहून दिले, मात्र हा व्यवहार नायब तहसीलदार प्रीती मंगेश डिडूरकर यांच्यापुढे तपासणीसाठी आल्यावर त्यातील कागदपत्रे खोटी असल्याचे निदर्शनास आले. ही जमीन अकृषक झाल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडण्यात आले होते. त्यामुळे ही जमीन कायदेशीरपणे भूखंड पाडण्यास योग्य ठरली नव्हती. पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यावर शेतमालक गेडाम यांना अटक करण्यात आली. त्यांना मंगळवापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून भूमाफि या बारहाते फ रार असल्याचे तपास अधिकारी महाजन यांनी सांगितले.
शेतजमीन विकत घेऊन त्याचे लेआऊट पाडायचे. अकृषक मान्यतेसह सर्व सोपस्कार होण्यापूर्वीच त्याचे भूखंड पाडून विक्री करून त्यातून आलेल्या पैशाने शेतमालकाचा व्यवहार पूर्ण करायचा, असा हा लबाडधंदा सर्रास चालू आहे. त्यामुळे भूखंड विकत घेणाऱ्या सामान्यांना त्याचा भूखंड हा बेकायदेशीर असल्याचा थांगपत्ताही नसतो.
 या अशा बेकायदेशीर व्यवहारात पटवाऱ्याची भूमिका महत्वाची ठरते. पटवाऱ्यांनी ठिकठिकाणी असे गैरव्यवहार केल्याचे लोकसत्ताने निदर्शनास आणल्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी वर्धा तालुक्यातील सर्व पटवाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात फे रफोर कागदपत्रांमधे हेतूपुरस्कार सोडण्यात आलेल्या रिकाम्या जागांवर शिक्के मारण्याचे काम झाले आहे. कारण, अशा रिकाम्या जागांवर जुनी तारीख टाकून भूखंडांची विक्री केली जात होती. शेकडो भूखंडधारक यामुळे अडचणीत आले आहे. अशा प्रकरणांची चौकशी सुरू असतांनाच बनावट अकृषक प्रमाणपत्राची बाब पुढे आल्याने भूखंडधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.