तंत्रज्ञानामुळे चित्रपटसृष्टी इतकी पुढे गेली आहे, चित्रपट बनविण्याचा कालावधी खूप कमी झाला आहे. म्हणूनच आजच्या काळात अभिनेत्री बनणे मला खूप आवडले असते. हल्ली टीव्ही लावला की जवळपास दर आठवडय़ाला पुरस्कार सोहळे पाहायला मिळतात. आमच्या काळात आम्हाला पुरस्कार स्वीकारण्याची संधी खूप कमी वेळा मिळाली. म्हणूनच आजच्या जमान्यातील अभिनेत्री असते तर मीही तुम्हाला पुरस्कार स्वीकारताना पाहायला मिळाले असते, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांनी व्यक्त केले.
दादासाहेब फाळके अ‍ॅकॅडमी पुरस्कार सिने आणि टीव्ही असोसिएशन हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला असून त्या पाश्र्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी चित्रपटसृष्टीचा काळातील फरक स्पष्ट केला. आजचा जमाना तंत्रज्ञानाचा आहे. चित्रपटसृष्टीत झालेले बदल सर्वाच्याच हिताचे आहेत. आजच्या या तंत्रज्ञानाने पुढारलेल्या काळात अभिनेत्री म्हणून काम करणे मला खूपच आवडले असते.
‘प्यासा’, ‘धूल का फूल’, ‘गुमराह’, ‘हिमालय की गोद में’ यांसारख्या चित्रपटातील अभिनयामुळे गाजलेली अभिनेत्री माला सिन्हा यांनी ५०-६०च्या दशकातील चित्रपटाची प्रक्रिया खूप धीमी होती असे सांगितले. पहिल्यांदा आपण स्टुडिओत चित्रीकरणासाठी गेले तेव्हा स्टुडिओ म्हणजे एखाद्या गोदामासारखा दिसला. इथे राहून चित्रीकरणाचे काम कसे करावे हा प्रश्नच मला पडला होता. परंतु, नंतर हळूच स्टुडिओत डोकावले तर सुंदर महालाचा सेट उभारलेला दिसला. अतिशय सुंदर पद्धतीचे फर्निचर दिसले आणि मग चित्रीकरणाचे खूपच कुतूहल वाटले. आनंदही झाला, अशी आठवण माला सिन्हा यांनी सांगितली.
माझ्या पहिल्या चित्रीकरणाच्या वेळी चित्रपटाची प्रक्रिया माहीत नव्हती त्यामुळे कॅमेऱ्यासमोर काम करताना कॅमेरा कधी रोल झाला, कधी चित्रीकरण संपले काहीच जाणवले नाही. पण खरे सांगायचे तर दिग्दर्शकाला हवे तसे, त्यांनी सांगितले तसे मी काम करीत गेले. मी त्या काळी खूप ‘बिनधास्त’ वागायचे. कॅमेरा, त्याचा कोन, आपण कसे दिसतोय कॅमेरासमोर याचा कधी विचार करायचे नाही.
फक्त अभिनय कसा होतोय याकडे लक्ष द्यायचे म्हणूनच चांगले काम करू शकले. कारण अभिनय नैसर्गिकरीत्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनयाचे शिक्षण घेता येत नाही. सहजपणे कॅमेऱ्याकडे दुर्लक्ष करून तुमचा अभिनय खुलला तर तो नैसर्गिकपणे कॅमेरा टिपतो, असे मला जाणवले, असेही माला सिन्हा म्हणाल्या. फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलताना त्यांनी खूप आनंदी असल्याचे मत मांडले. फिल्म इंडस्ट्रीमुळे आम्ही पडद्यावर येऊ शकलो, फिल्म इंडस्ट्री नसती तर आम्हाला रसिकांचे प्रेम मिळू शकले नसते. आपण आपल्या कारकिर्दीबद्दल खूप समाधानी असल्याचेही त्या म्हणाल्या.