महापुरुषांना त्यांच्या अनुयायांनी प्रार्थनास्थळात बंद केले असून, त्यांच्या विचाराची सावली समाज हरवत चालला आहे, अशी खंत दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी रविवारी व्यक्त केली. या सर्व महापुरुषांना प्रार्थनास्थळातून मुक्त करण्याची जबाबदारी साहित्यिकांनी पार पाडावी असे आवाहनही त्यांनी केले.  
गुंडेवाडी (ता. मिरज) येथे २४वे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन कविवर्य विठ्ठल वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष धनंजय सोलंकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. कांबळे यांनी सांगितले, की जीवनानुभवाला ज्ञानानुभवाची जोड दिली तर सकस आणि सक्षम साहित्यनिर्मिती होऊ शकते. साहित्यिकांनी परिणामकारक साहित्यासाठी अनुभवसमृद्ध व्हायला हवे. आपला धर्म न सोडता सत्याची बाजू लावून धरली, तर समाज असे साहित्य डोक्यावर घेते. शाहू, फुले, आंबेडकर चळवळीचा वारसा साहित्यिक क्षेत्रात जपला जातो हे अभिमानास्पद आहे. तथापि या सर्व महापुरुषांना त्यांच्या अनुयायांनी प्रार्थनास्थळामध्येच बंदिस्त केले आहे. त्यांचे विचार मुक्त करण्याची वेळ आली आहे. ही जबाबदारी नवसाहित्यिक समर्थपणे पार पाडतील असा विश्वास वाटतो.
सांगली जिल्ह्यातील थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानाची म्हणावी तशी दखल तत्कालीन साहित्यिकांनी घेतली नाही. समाजातील कुसवाबाहेरील जिणं जगणा-या लोकांची दु:खे अण्णा भाऊंनी साहित्यात आणली. म्हणूनच समाजाचा या दु:खाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. हे लक्षात घेतले तर साहित्याची ताकद लक्षात येते. अलीकडच्या काळात ढाबा संस्कृतीमुळे खेडी रोगट बनत चालली आहेत. कुटुंबव्यवस्था त्यामुळे बदलत चालली आहे. अशा वेळी साहित्यिकांनी गप्प बसून चालणार नाही. या क्षेत्रातही नेतृत्वाची भूमिका पार पाडावी लागेल अशी अपेक्षा प्रा. कांबळे यांनी व्यक्त केले.
उदघाटनाच्या भाषणात कविवर्य विठ्ठल वाघ म्हणाले, की ज्या साहित्यात मानवी सुखदु:खाच्या भावना व्यक्त होतात तेच साहित्य सर्जनशील असू शकते. ‘चले जाव’ हीच साहित्यनिर्मितीची गंगोत्री आहे. अनेक लोक खूप लिहितात, परंतु ते कोणासाठी लिहितात हाही प्रश्नच आहे. शहरी वातावरणात राहून गावाकडच्या मातीशी निगडित केलेले लिखाण विकते म्हणून खपते या पद्धतीने लिहिण्यापेक्षा सभोवताली असणा-या स्थितीचे वर्णन प्रामाणिकपणे साहित्यात प्रतिबिंबित केले पाहिजे. नवलेखकांनी अनुकरण टाळून नवनिर्मितीचा ध्यास बाळगला पाहिजे.
या वेळी चंद्रकुमार नलगे, प्रा. व. भा. बोधे, बंडा जोशी, कवी भीमराव धुळुबुळु, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष महावीर कागवाडे, गावच्या सरपंच उज्ज्वला सरगर  आदी उपस्थित होते. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी साहित्यिक चळवळीचा वार्षकि आढावा घेतला. प्रारंभी गावातून ग्रंथिदडी काढण्यात आली.