अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांसाठी घराची मर्यादा ४८४ चौरस फुटांवरून ३५० चौरस फूट करण्याच्या म्हाडाच्या निर्णयाविरोधात सार्वत्रिक नाराजी व्यक्त होते आहे.
म्हाडावासीयांची सरकारने नव्या धोरणानुसार घोर फसवणूकच केली आहे. त्यामुळे म्हाडावासीयांमध्ये सरकारच्या विरोधात तीव्र भावना तयार झाली आहे. पूर्वी म्हाडाच्या इमारतींना २.५ चटई क्षेत्र मिळत होते. त्या वेळेस रहिवाशांना किमान ४८४ चौरस फुटांचे घर देण्याची मर्यादा म्हाडाने घालून दिली होती. त्याचा फायदा पंतनगर, घाटकोपर व इतर म्हाडाच्या वसाहतींना मिळाला. आता चटई क्षेत्र वाढविण्यात आले आहे. त्यामुळे खरे तर घराची किमान मर्यादा वाढवायला हवी होती; परंतु म्हाडाने किमान घराची मर्यादा कमी करून ३५० वर आणली. सरकारचे हे धोरण न्यायाला धरून नाही. म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून हा निर्णय घ्यायला लावला आहे. या धोरणाविरोधात सर्व म्हाडा वसाहतींच्या रहिवाशांनी संघर्ष करावा, असे आवाहन बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेने केले आहे.
सरकारने आपल्या धोरणाचा फेरविचार करावा, यासाठी रहिवाशांनी नव्या धोरणाविरोधात संघर्ष करण्याची गरज आहे. रहिवाशांनी या धोरणाविरोधात संघटित होऊन तीव्र निदर्शने करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. म्हाडाच्या रहिवाशांसाठी संपर्क- ९८६९९२८१८१.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada residents againts government new policy
First published on: 29-10-2013 at 06:33 IST