जायकवाडीचे दरवाजे बंद
मुळा धरणातून जायकवाडीला ठरल्यानुसार दिलेले आवर्तन आज संपल्यानंतर उद्यापासून (गुरूवार) लगेचच लाभक्षेत्रात रब्बीची पिके व पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. आमदार चंद्रशेखर घुले व आमदार गडाख यांनी ही माहिती दिली. २५ ते २६ दिवस हे आवर्तन चालेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी दिली.
घुले व गडाख यांनी आज सकाळी मुंबईत जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची भेट घेतली. त्यानंतर लाभक्षेत्रात पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याचे घुले यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर झालेल्या निर्णयानुसार जिल्ह्य़ातील मुळा व भंडारदरा, तसेच नाशिक जिल्ह्य़ातील दारणा धरणातून प्रत्येकी तीन असे एकूण ९ टीएमसी पाणी जायकवाडीत नुकतेच सोडण्यात आले. लाभक्षेत्रातील रब्बीची पिके जळून चालली असताना व पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्याच्या तीव्र प्रतिक्रिया लाभक्षेत्रात उमटल्या होत्या. त्याची दखल घेऊन मुळा धरणातून उद्यापासून शेती व पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे घुले यांनी सांगितले. त्याला पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनीही दुजोरा दिला.
मुळा धरणातून जायकवाडीला २ हजार ८०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सुमारे २ हजार ७०० दशलक्ष घनफूट पाणी आज सकाळपर्यंत सोडण्यात आले असून उर्वरित १०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन आजच सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर हे आवर्तन लगेचच बंद करण्यात येणार असून उद्या सकाळी लाभक्षेत्रातील शेतीचे व पिण्याचे आवर्तन सुरू करण्यात येणार आहे.
मुळा धरणात लाभक्षेत्रातील या आवर्तनासाठी साधारणपणे ३ हजार २०० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे. धरणातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेता शेतीला एवढे एकच आवर्तन होऊ शकेल.
जायकवाडीला पाणी सोडण्यापूर्वी मुळा धरणात १६ हजार ८२५ दशलक्ष घनफूट (सुमारे १७ टीएमसी) पाणी होते. जायकवाडीत २ हजार ८०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. ते गेल्यानंतर मुळा धरणात सुमारे १४ हजार २९० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहील. त्यातील साडेचार दशलक्ष घनफूट हा मृतसाठा आहे. तो वजा जाता ९ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी धरणात उपलब्ध होईल. निकषानुसार १५ टक्के (१ हजार ३३४ दशलक्ष घनफूट) पाण्याचे बाष्पीभवन होईल असा अंदाज आहे. ते, तसेच धरणावरील विविध पाणी योजनांना सुमारे २ हजार दशलक्ष घनफूट, कालव्यांवरील पाणी योजनांना १ हजार ५६० दशलक्ष घनफूट असे सर्व वजा जाता सुमारे ३ हजार २०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहू शकेल.
धरणाच्या लाभक्षेत्रात एका आवर्तनाला सुमारे पाच हजार दशलक्ष घनफूट पाणी लागते. मात्र, आता ३ हजार २०० दशलक्ष घनफूट एवढेच पाणी उपलब्ध होऊ शकेल. सुमारे १ हजार ३०० ते १ हजार ८०० दशलक्ष घनफूट पाण्याची ही तूट धरणातील मृतसाठय़ांमधून भरून काढता येऊ शकेल, मात्र राज्य सरकारला त्यासाठी खास बाब म्हणून तसा निर्णय घ्यावा लागेल.
भंडारदरा बंद, निळवंडेतून सुरू
अकोले/वार्ताहर – भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात येणारे पाणी आज बंद करण्यात आले, मात्र निळवंडेतून जायकवाडीचे आवर्तन सुरु आहे. भंडारदऱ्यातून आजपर्यंत १ हजार ९४१ दलघफू पाणी सोडण्यात आले असून उर्वरित पाणी निळवंडे धरणातून सोडण्यात येणार आहे. धरणातून पाणी सोडण्यास असणाऱ्या मर्यादा लक्षात घेता उर्वरित १ टीएमसी पाणी सोडण्यासाठी सहा ते सात दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. जास्त कालावधीमुळे पाण्याचा नाशही वाढणार आहे. २९ नोव्हेंबर पासून भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी विशेष आवर्तन सोडण्यात आले. जायकवाडीला पाणी सोडण्यास सुरुवात झाली तेव्हा भंडारदरा धरणात ८ हजार ४१५ दलघफू पाणीसाठा होता. आज सायंकाळी धरणात ६ हजार ४७४ दलघफू पाणी शिल्लक होते.