यावर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने कडक उन्हाळ्याच्या एप्रिल व मे महिन्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना नैसर्गिक साठय़ांमधून मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. यासोबतच कृत्रिम पानवठय़ांमध्ये सुध्दा दर दोन दिवसाने पाणी टाकले जात आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर यंदा पाण्यासाठी वाघांची भटकंती होणार नाही, अशी परिस्थिती आहे.
गेल्या कित्येक वर्षांंपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला अत्यल्प पावसामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. इरई धरणासह जिल्ह्य़ातील छोटे-मोठे सिंचन प्रकल्प, मामा तलाव, गाव तलाव, हातपंप, टय़ुबवेल कोरडय़ा पडल्या की, चंद्रपूर जिल्ह्य़ासह ताडोबातील वन्यप्राण्यांना सुध्दा पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे, परंतु गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने ताडोबातील वन्यप्राण्यांना नैसर्गिक पाणवठय़ांमधून पाणी मिळत असल्याचा आनंद त्यांच्या बघायला मिळत आहे. ताडोबा, मोहर्ली व कोळसा अशा तीन वनपरिक्षेत्रात विभागल्या गेलेल्या प्रकल्पात सात उपक्षेत्र व ३४ नियतक्षेत्रे आहेत. प्रकल्पात छोटे-मोठे मिळून आठ तलाव आहेत. यात ताडोबा, कोळसा, जामणी, पांगडी, कारवा, पिपरहेटी, बोटझरी, पिपरी, तेलिया, महालगाव, मोहर्ली, जामून झोरा, शिवणझरी, फुलझरी, आंभोरा हे महत्वाचे तलाव आहेत. दरवर्षी हे तलाव मे महिन्यात काहीसे कोरडे पडलेले असतात. मात्र, यंदा या सर्व तलावात मुबलक पाणी आहे. अंधारी नदीला ताडोबाची जीवनवाहिनी म्हटले जाते.
खातोडा गेटजवळील नाला म्हणजे या नदीचे उगमस्थान आहे. ही नदी मोहर्ली, कोळसा, मूल मार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते. या नदीमुळे ताडोबातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना नवसंजीवनी मिळाली असून ही नदीच या प्रकल्पातील पानवठय़ांचे मुख्य स्त्रोत आहे. दरवर्षी अत्यल्प पावसामुळे या नदीच्या पात्रात पाणीच शिल्लक राहत नव्हते, परंतु यावर्षी ही नदी पाण्याने तुडूंब भरलेली आहे. दरवर्षी मे मधील तीव्र उन्हाळ्यात या नदीवर वन्यप्राण्यांची गर्दी बघायला मिळते. अंधारी नदीच्या प्रवाहातील वाघडोह, मोहाचा खड्डा, कळंबाचा डोह, उमरीचा पाटा, तुलाराम पानवठय़ाला पाणी आहे. या प्रकल्पातील वन्यजीवांची तहान भागविणारे अनेक छोटे-मोठे नैसर्गिक नाले सुध्दा आहेत. यात उपाशा नाला, जामून झोरा, तेलिया डॅमचा प्रामुख्याने समावेश आहे. पंचधारा झऱ्यावर मे महिन्याच्या उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाणी पिण्यासाठी गर्दी बघायला मिळते. यंदा वन्यप्राणी गर्दी येथे बघायला मिळत आहे.
कोसेकणार, आंबट हिरा, काटेझरी, काळा आंबा, चिखलवाही, सांबर डोह, कासरबोडी, जांबून झोरा, आंबेडोह बंधारा, चिचघाट, आंबेगड, गिरघाट, वसंत बंधारा या नाल्यांना सुध्दा चांगले पाणी आहे. ताडोबा आणि कोळसा या दोन मोठय़ा तलावात मुबलक पाणी आहे. पाण्याअभावी दरवर्षी व्याघ्र प्रकल्पातून वाघ व बिबटय़ासारखे हिंस्त्र प्राणी जंगलातून बाहेर पडून गावात प्रवेश करून गावकऱ्यांवर हल्ले करतात. मात्र, यंदा अजून तरी पाण्याच्या शोधात वन्यप्राणी प्रकल्पातून बाहेर पडलेला नाही. ताडोबात मुबलक नैसर्गिक पाणी पुरवठा असल्याचा दावा ताडोबा कोरचे उपवनसंरक्षक एम.एस.कळसकर यांनी लोकसत्ताशी बोलतांना केला.