जनतेला गृहीत धरण्याची प्रवृत्ती वाढीस लागली असून इतिहासात जन चळवळीने अशा नाठाळांच्या माथी काठी हाणली आहे. त्यामुळे अशा नाठाळांना सरळ करण्यासाठी जनतेने आता जागता पहारा ठेवायला हवा, असे मत डॉ. दाऊद दळवी यांनी संकल्प यात्रेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
नव वर्षांचे औचित्य साधत ‘जाग’ या सामाजिक संघटनेने बुधवारी सायंकाळी ठाण्यातील राजकीय गुंडगिरीविरोधात संकल्प यात्रा काढली होती. पाचपाखाडी येथील डॉ. अरुणकुमार वैद्य यांच्या पुतळ्याजवळून निघालेली ही संकल्प यात्रा महापालिका मुख्यालयास वळसा घालून कचराळी तलाव परिसरात विसर्जित झाली. त्यानंतर या यात्रेचे रूपांतर एका सभेत झाले. त्यामध्ये डॉ.दळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासून होत असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ठाणे हे एक सुसंस्कृत नागरिकांचे शहर आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही ठाण्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पण राजकीय ठाणे अधिक समंजस आणि विकासाभिमुख करण्यासाठी नागरिकांचा एक सकारात्मक दबाब गट निर्माण झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांनी सभेत बोलताना व्यक्त केले. यंदा निवडणूक वर्ष असून इथून पुढे आम्ही चूक करणार नाही. यापुढे गुंडगिरीचे राजकारण आम्ही सहन करणार नाही आणि असे करणाऱ्यांना आम्ही थारा देणार नाही, असा संकल्प यावेळी करण्यात आला. या संकल्प यात्रेत डॉ. संजय मं.गो, अ‍ॅड. वंदना शिंदे, जगदीश खैरालिया, सत्यजित शहा, अ‍ॅड. पंचाक्षरी, भाऊ नानिवडेकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.