खंडकरी शेतकरी जमीन मिळविण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या काळात धरणे आंदोलनास बसणार आहेत, अशी माहिती भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने एका पत्रकाव्दारे प्रसिध्दीस दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होऊन व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात खंडकरी शेतकऱ्यांच्या ज्यांच्या त्यांच्या मूळ ७/१२ प्रमाणे दिवाळीपूर्वी जमिनी परत करणार असल्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे शासकीय पातळीवर सर्व पूर्तता होऊन कोल्हापूर जिल्हा सोडून इतर जिल्ह्य़ातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत परत केल्या. परंतु कोल्हापुरातील खंडकऱ्यांच्या जमिनी परत देण्यास शेती महामंडळाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे.
    याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील, शेकाप पक्षाचे राज्य सहचिटणीस माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही वर्षे लढा सुरू आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नाबाबत विधान भवनात आवाज उठवून प्रश्नाची तीव्रता सरकारच्या निदर्शनास आणून न्याय हक्क मिळविण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज शेकापच्या कार्यालयात झालेल्या खंडकरी शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.     
आज झालेल्या बैठकीला खंडकरी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान काटे व प्रा.जालिंदर पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला. बैठकीचे प्रास्ताविक खंडकऱ्यांचे नेते विक्रम भोसले यांनी केले. सविस्तर माहिती दिगंबर लोहार, मोहन पाटील, चंद्रकांत चव्हाण यांनी दिली. आभार प्रदर्शन जगदीश इंगवले यांनी केले.