सिंचन प्रकल्पांसाठी लागणारा वाढता कालावधी आणि त्याचबरोबर वाढणाऱ्या किंमतीबाबतची कारणमिमांसा करण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाने श्वेतपत्रिकेमार्फत केला असला तरी सद्यस्थितीत केवळ तापी पाटबंधारे विकास महामंडळ आणि गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या अखत्यारीत सुरू असलेल्या २२० प्रकल्पांची उर्वरित किंमत तब्बल २५ हजार ६०६ कोटी इतकी महाप्रचंड असल्याचे पुढे आले आहे. पुरेसा निधी उपलब्ध होण्याची शक्यता नसताना केवळ राजकीय अट्टाहासापोटी मांडण्यात आलेला प्रकल्प मंजुरीचा डाव आता नियोजनाअभावी अध्र्यावरती मोडण्याच्या बेतात आहे. याआधी पूर्ण झालेल्या प्रकल्पाद्वारे तापी विकास महामंडळाने १.५१ लाख हेक्टर तर गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने २.६५ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाल्याचा दावाही केला जात आहे.
राज्याच्या वाटय़ास आलेल्या पाण्याचा विनियोग करणे व लोकप्रतिनिधींची मागणी पूर्ण करणे या दृष्टीकोनातून अनेक नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांची संख्या बरीच फुगलेली दिसते. राज्यातील पाच विकास महामंडळांमार्फत सुरू असलेल्या एकूण ६७० कामांपैकी ३० टक्क्यांहून अधिक कामे ही कमी-अधिक प्रमाणात उत्तर महाराष्ट्राशी संबंधित आहेत. गोदावरी मराठवाडा विकास महामंडळातंर्गत नाशिक जिल्ह्याचा परिसर येत असला तरी बांधकामाधीन प्रकल्पांची संख्या मराठवाडय़ाच्या तुलनेत बरीच कमी आहे.
सिंचनाच्या बाबतीत जलद विकास करण्यासाठी शासनाने राज्यात विविध भागात पाच पाटबंधारे विकास महामंडळांची स्थापना केली. त्यातील उपरोक्त दोन महामंडळ उत्तर महाराष्ट्राशी निगडीत आहेत.
स्थापनेनंतर तापी विकास महामंडळाने ७१ प्रकल्प पूर्ण केले तर, घळभरणी-द्वार उभारणीतून साठवण क्षमता निर्माण केलेले ८१ प्रकल्प आहेत. या माध्यमातून १२४९ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता आणि १.५१ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. तसेच गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने २८६ प्रकल्प पूर्ण केले तर घळभरणी-द्वार उभारणीतून साठवण क्षमता निर्माण केलेले २५४ प्रकल्प आहेत. त्या माध्यमातून ३५६१ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण आणि २.६५ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाल्याचे श्वेतपत्रिकेत म्हटले आहे.
तापी पाटबंधारे विकास महामंडळाने वाघूर व पुनंद या मोठय़ा प्रकल्पाची घळभरणी-द्वार उभारणी तसेच हिवरा, सोनवद, नाग्यासाक्या, मुक्ताईनगर, सुलवाडे, सारंगखेडा व प्रकाशा हे मध्यम प्रकल्प पूर्ण करण्यात आले.  तसेच जामखेडी, अमरावती, वाडीशेवाडी, शिवण, दरा, कोरडी, गुळ, मोर, बहुळा व माणिकपुंज, अंजनी व निम्न पांझरा (अंशत:) या मध्यम प्रकल्पांची घळभरणी-द्वार उभारणी झाली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागातील प्रकल्पांची संख्या अधिक असली तरी त्यात नाशिक जिल्ह्यातील कश्यपी व गौतमी-गोदावरी, नांदुर मध्यमेश्वर (मुकणे व भावली ) असे पूर्ण झालेले प्रकल्प आहेत.
तापी विकास महामंडळाच्या अंतर्गत सध्या १० मोठे, १८ मध्यम व ३६ लघू पाटबंधारे प्रकल्पांची कामे सुरू असून गोदावरी मराठवाडा विकास महामंडळांतर्फे १५ मोठे, १६ मध्यम व १२५ लघू पाटबंधारे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. प्रदीर्घ काळ रखडल्याने वेगवेगळ्या कारणांस्तव या प्रकल्पांची किंमत वाढत गेली. त्यांची अद्ययावत एकूण किंमत ३९, ७७२ कोटी इतकी आहे. त्यावर आतापर्यंत झालेला खर्च वजा जाता त्यांची उर्वरित किंमत २५, ६०६ कोटी असल्याचे श्वेतपत्रिकेत
म्हटले आहे. आर्थिक नियोजनाचा कोणताही सारासार विचार न करता प्रकल्पांना मंजुरी दिल्यावर मूखभंग कसा होऊ शकतो, त्याचे हे एक उदाहरण म्हणता येईल.