भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडले असतानाच आज सायंकाळी ७ वाजता काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ओझर बंधाऱ्याजवळ प्रवरा डावा व उजव्या कालव्याचे दरवाजे उघडले. त्यामुळे कालव्याला पाणी आले असून ते बंद करण्यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न चालविले आहेत. दरम्यान, आंदोलकांविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
जायकवाडीच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी प्रवरा कालव्यातून आवर्तन सोडावे, अन्यथा ओझरचा प्रवरा डावा कालवा फोडण्याचा इशारा दोन दिवसांपूर्वी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून दिला होता. आज सायंकाळी आमदार कांबळे, तालुकाध्यक्ष सचिन गुजर, विश्वनाथ मुठे, बाजार समितीचे सभापती दिपक पटारे, राधाकृष्ण आहेर, शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुभाष पटारे, शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे (रघुनाथदादा पाटील) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पटारे यांच्यासह १०० ते १५० लोकांनी कुलूप तोडून प्रवरा कालव्याचे दरवाजे उघडले. जलसंपदा विभागाचे दोन व दोन पोलीस त्या ठिकाणी होते. कार्यकर्त्यांना त्यांनी विरोध केला. पण काही कार्यकर्त्यांनी आम्हाला गोळ्या घाला, काय करायचे ते करा, असे सांगत दरवाजे उघडले. त्यानंतर सर्वजण निघून गेले.
कांबळे यांनी आंदोलन केले त्यावेळी प्रवरा नदीपात्रात पाणी ओझर बंधाऱ्यापासून दहा ते १२ किलोमीटर अंतरावर होते. हे पाणी बंधाऱ्यात पोहचल्यानंतर कालव्यातून बाहेर निघाले. त्यामुळे जलसंपदा विभागाचे कर्मचारी प्रवेशद्वार बंद करण्याच्या कामाला लागले.
रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. अधीक्षक अभियंता मनोहर पोकळे, कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ, उपअभियंता एस. के. थोरात, उपअभियंता नजन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. पाण्याबरोबर आता २०० पोलिसांचा ताफा तैनात ठेवण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस अधिक्षिका सुनीता ठाकरे-साळुंके यांनी सांगितले की, पाण्याबरोबर मोठा पोलीस बंदोबस्त असून जलसंपदा विभागाचे अधिकारी याबाबत फिर्याद देणार आहेत. त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात येईल. कायदा हातात घेण्याचा कुणी प्रयत्न केला तर पोलीस कठोर कारवाई करतील. दरम्यान, सेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही आज भंडारदरानजिक आंदोलन होते. पोलिसांचा फौजफाटा, तसेच जलसंपदाचे अधिकारी तिकडे गुंतले असल्याने त्याचा फायदा आमदार कांबळे व आंदोलनकर्त्यांना झाला. कांबळे नंतर मुंबईला एका बैठकीसाठी निघून गेले. कार्यकर्ते मात्र गनिमी कावा करण्यासाठी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर फळ्या टाकण्यासाठी निघाले होते.