जिल्ह्यातील ६१२ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी शांततेत मतदान पार पडले. मात्र, मतदान संपण्यास केवळ १० मिनिटे बाकी असताना वडवणी येथे मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकारात पाच जण जखमी झाले. या प्रकारानंतर गावात संचारबंदी लागू करण्यात आली. जिल्ह्यात इतरत्र शांततेत सुमारे ८० टक्के मतदानाची नोंद झाली. मतमोजणी उद्या (मंगळवारी) होणार असून, दुपापर्यंत निकाल हाती येतील, अशी माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे यांनी दिली.  
जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार होत्या. यातील ९२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ६१२ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी सकाळी मतदान सुरू झाले. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले. किरकोळ बाचाबाची वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. वडवणीत मात्र निवडणुकीला गालबोट लागले. मतदान संपण्यास १० मिनिटे बाकी असताना मतदान केंद्र क्रमांक चार येथे दोन गटांत वाद झाला. दोन्ही गटांची मारामारी झाली. या वेळी दगडफेक करण्यात आली. बंदोबस्तावरील जवानांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. तणाव वाढल्यानंतर बीडहून अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात आला. मारामारीत पाच जण जखमी झाले. पोलिसांनी सुमारे २० जणांना ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधव कारभारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.दरम्यान, मारामारीचा मतदान प्रक्रियेवर कसलाही परिणाम झाला नसून मतदान यंत्रे सुरक्षित आहेत. ही घटना वगळता जिल्हाभर शांततेत मतदान झाले.