सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई, पनवेल भागात रेल्वेचे जाळे तयार करण्यात आल्याने रेल्वे मंत्रालयाकडून या झपाटय़ाने वाढणाऱ्या क्षेत्राला नेहमीच सापत्नाची वागणूक दिली जात असल्याची भावना नवी मुंबईतून दररोज मुंबई, ठाण्यात ये-जा करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केली आहे. या भागातील रेल्वे गाडय़ामध्ये आता गर्दीचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढू लागल्याने दरवाज्यातून प्रवाशी पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. तरीही रेल्वे या मार्गावर गाडय़ांची फ्रीक्वेन्सी वाढवत नसल्याची या प्रवाशांची तक्रार आहे. कल्याण पनवेल किंवा उरण पनवेल तसेच अलीबाग, पेणपर्यंतच्या रेल्वे विस्ताराचा अर्थसंकल्पात उल्लेख नसल्याने या भागाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे चित्र आहे.
नवी मुंबईतील रेल्वे सिडकोने ६७ टक्के खर्चाचा हिस्सा उचलल्यानंतर सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील रेल्वेच्या बाबतीत सिडकोने खर्च करावा असे रेल्वे मंत्रालयाला नेहमीच अपेक्षित आहे. सिडको रेल्वेचे जाळे तयार करण्यास राजी असली तरी रेल्वे रूळ आणि रेल्वे मार्ग सुरू करण्याचा सर्वस्वी निर्णय रेल्वे मंत्रालयाचा आहे. त्यामुळे सिडकोचा उरण पनवेल महामार्ग लांबणीवर पडला आहे. नवी मुंबईतील रेल्वे स्थानके रेल्वेने स्वत:कडे घेऊन त्यांची डागडुजी करावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, पण रेल्वे प्रशासन त्याला सकारात्मक साद देत नसल्याचे समजते. त्यामुळे नवी मुंबईतील अनेक स्थानकातील लाद्या, वीज, पंखे, तिकीट खिडक्या यांची दुरवस्था झाली आहे. हार्बर मार्गावर कुर्ला ते पनवेल रेल्वे गाडय़ा सुरू कराव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे, पण ती गेली अनेक वर्षे पूर्ण केली जात नाही. त्यामुळे मुंबईत कामानिमित्ताने येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता ही गाडी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय प्रवासी सेवा संघाचे सचिव हरिचंद्र ठाकूर यांनी केली आहे. महामुंबईचा वाढता पसारा लक्षात घेता मध्य रेल्वेचा विस्तार पेण आणि अलीबागपर्यंत होण्याची आवश्यकता ठाकूर यांनी व्यक्त केली. महामुंबईत येणाऱ्या मानखुर्दे ते पनवेल आणि ठाणे ते तुर्भे या मार्गावर सध्या सात ते दहा मिनिटाची वेळ दोन गाडय़ांमधील आहे. ही फ्रीक्वेन्सी वाढविण्याची आवश्यकता आहे. या मार्गावर आता विद्यार्थी, नोकरदार यांची संख्या खूप मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच दरवाज्यात उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे.
रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी सिडकोला रेल्वे मंत्रालयावर अवलंबून राहावे लागत असल्याने सिडकोने एमएमआरडीएच्या माध्यमातून पनवेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर असे मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्याचे ठरविले असल्याची माहिती सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य शासनाला सादर करण्यात आलेल्या वाहतूक आराखडय़ात ही बाब स्पष्ट करण्यात आली असून लवकरच त्याचे सव्र्हेक्षण सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाशी जास्तीत जास्त कनेक्टीव्हिटी वाढविण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2014 रोजी प्रकाशित
रेल्वेला महामुंबई नावडतीच
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई, पनवेल भागात रेल्वेचे जाळे तयार करण्यात आल्याने रेल्वे मंत्रालयाकडून या झपाटय़ाने वाढणाऱ्या क्षेत्राला नेहमीच सापत्नाची वागणूक दिली जात असल्याची भावना नवी मुंबईतून दररोज मुंबई, ठाण्यात ये-जा करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

First published on: 09-07-2014 at 07:06 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway budget disappointing navi mumbai